Skip to main content

समानी व आकूति: समाना हृदयानि व:|


समानी व आकूति: समाना हृदयानि व:|

                  गेल्या आठवड्यात युट्यूबवर एक लिंक पाहत होतो. जॉन विल्सन यांच्या वाद्यवृंदाने टाँम अँड जेरी  मालिकेसाठी तयार केलेल्या सुरावटीचे सादरीकरण होते. सुरावट व त्याचे सादरीकरण उत्तम होतेच पण त्याबरोबरचं ते पाचपन्नास वादक ज्या एकतानतेने , सुसूत्रतेने काम करत होते ते देखिल पाहण्यासारखे होते. एखादा वादक जेव्हा वादन करतो तेव्हा तो त्याच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक क्रियेत जी सुसूत्रता लागते तीच सुसूत्रता; तोच समन्वय सामुहिक सादरीकरणात  असावा लागतो. जणू एक व्यक्ती एक शरीर काम करत आहे अशी एकजीवता वादकांत निर्माण झाल्याशिवाय उत्तम सादरीकरण प्रकट होणे शक्य नाही. पाश्चात्य वाद्यवृंदांचे ५०-५० व्हायोलीनचे सादरीकरण ही  एकजीवता, एकरूपता ,एकतानता, ते ऐक्य अनुभवण्यासाठी जरूर पाहावेत.

          असे समूहमन तयार होणे शक्य आहे ? ते कसे होते ?

          असे समूहमन खरेतर सहज तयार होते. आपण रोजच्या जीवनात  त्याचा अनुभव घेतो. खचाखच भरलेली  बस जेव्हा बसस्टाॅपवर येते तेव्हा आतील लोकांचे एक समूहमन तयार होते, ते आत कमी माणसे येतील याची काळजी घेत असते; तर बाहेरच्या लोकांचे समूहमन आपण आत कसा प्रवेश करू याची काळजी घेत असते. रस्त्यावर भांडणे होतात तेव्हा असेच समूहमन तयार होते.

           एकत्र येण्याचे निमित्त काय ? हि विचार करण्याची गोष्ट आहे .त्या गर्दीला..., त्या समूहाला... काय साध्य करायचे आहे? त्यांचे उद्दिष्ट काय आहे? ते समान उद्दिष्टाने एकत्र आले आहेत का ? या गोष्टींचाही विचार केला पाहिजे.

          पुण्यात दसऱ्यानंतर  एका उद्दिष्टाने एकत्र आलेल्यांची मोठी गर्दी लक्ष्मी रस्त्यावर, तुळशीबागेत गोळा होईल. सर्वांचे उद्दिष्ट एकच असणार आहे,  खरेदी करणे. असा समूह आणि दोन महिन्यांपूर्वी वारीच्या वेळी अनुभवलेला, एका उद्दिष्टाने एकत्र आलेला वारकऱ्यांचा समूह !

           एकत्र येण्याचे निमित्त काय ? साध्य काय ?  यानुसार समूहशक्तीचे प्रगटीकरण होत असते. एका विधायक उद्दिष्टाने एखादा मोर्चा निघतो. हजारो नागरिक त्याच्यात समाविष्ट होतात. एक सामुहिक  ताकद प्रगट होते, पण त्या समुहातील सदस्यांच्या मनात साध्य-साधन स्पष्ट नसेल तर मोर्चेतील एखादा सदस्य एक दगड उचलतो आणि क्षणार्धात त्या समुहशक्तीचे रुपांतर विध्वंस ,जाळपोळ करणाऱ्या टोळीत होते.

          एक कथा आठवते. चाफळला समर्थांनी रामनवमीचा उत्सव सुरु केला. पंचक्रोशीतील हजारो नागरिक उत्सवासाठी एकत्र जमू लागले. सुलतानांच्या जुलमी राजवटीच्या भयातून मुक्त झालेले नागरिक एकत्र जमत होते. एके वर्षी  उत्सवाचा दिवस जवळ आला तरी शिवाजी महाराजांकडून येणारी मदत पोहोचली नव्हती. रामनवमीच्या दिवशी जमणाऱ्या हजारो भक्तांसाठी  प्रसादाची व्यवस्था कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला. श्री समर्थांनी रामाची आराधना  केली आणि एका रात्रीत धान्य कोठारे धान्याने भरून गेली. यातील चमत्कारावर नीट विचार केला तर त्याचे उत्तर भिक्षेत सापडते. घरटी, माणशी एक मूठ धान्य गोळा केले तर एका रात्रीत धन्य कोठार धान्याने भरणे अवघड नाही.

          आजही आपण सज्जनगडावर गेल्यावर जो प्रसाद घेतो त्यासाठी लागणारे धान्य गावोगावी फिरून गोळा केलेल्या भिक्षेतून जमा होते . महाराष्ट्रातील अनेक यात्रांमध्ये प्रसादासाठीच्या  भाकऱ्या घराघरातून गोळा केल्या जातात. आचारी न नेमता लोकसहभागातून हजारोंना जेवायला वाढले जाते. स्वाध्याय परिवार, निरंकारी परिवार अशांचे मेळावे समूहशक्तीच्या प्रगटीकरणातून कंत्राटी न देता  पार पडतात. ‘मराठा तितुका मेळवावा’ हा मंत्र समर्थांच्या अनुभवांची प्रचिती आहे. 

          समूहाने, एक दिलाने काम करायचे असेल तर तेथे निर्मितीची प्रेरणा असावी लागते. भगवान श्री कृष्णाने अशी प्रगतीसाठी आवश्यक गोसंवर्धनाची प्रेरणा गोपालांमध्ये निर्माण केली. त्यांना एका उद्दिष्टाने मेळवले आणि गोपालक समाज निर्मितीचा गोवर्धन लीलया उचलला गेला . समाज एका उद्दिष्टाने मेळवला तर भगवंत करंगळी एवढा; अधिष्ठान म्हणून  पुरतो. त्या गोवर्धनाच्या  चित्रातील गोपालांमध्ये निर्माण केलेली समूहशक्ती ,समूहप्रेरणा पाहता आली पाहिजे .

                  मराठा तितुका मेळवावा’ हा मंत्र शिवाजी महाराजांनी संघटनेसाठी वापरला.मराठी जनतेत  निर्माण झालेली शक्ती विधायकतेकडे मार्गी लावली. ‘हे राज्य व्हावे हि तो श्रींची इच्छा’ असे  समूहशक्तीसमोर भगवंताचे अधिष्ठान ठेवले . म्हणून महाराजांनंतर ,संभाजीराजांनंतर 'मराठा' शक्ती, स्वराज्य टिकवण्यासाठी लढत राहिली.

असे ऐक्य, अशी सुसूत्रता आपल्यात निर्माण व्हावी यासाठी आपण प्रार्थनेत म्हणतो; ‘होती अनेक हृदये जरी एकरूप सामर्थ्य तेथ प्रकटेल तरी अमूप’ हे आपल्या गटात उतरावयाचे असेल तर एका तालात चालता यायला हवे; एका सुरात आणि स्वरात गाता यायला हवे; एकत्र कामाकरता यावे लागेल.

               सैनिकांच्या तुकडीला अपेक्षित परिणाम साधायचा असेल, एखाद्या  खेळाच्या  खेळाडूंच्या संघाला यश मिळवायचे असेल तर तो गट संघरूपात  बांधलेला असावा लागेल. युद्धभूमीवर एकीची भावना निर्माण होण्यासाठी घोषणा दिल्या जातात ,हर हर महादेवची गर्जना केली जाते, समूहनृत्य केले जाते .  प्रबोधकांमधील  समूहशक्ती जागृत करण्यासाठी ‘होती अनेक हृदये जरी एकरूप’ ची आठवण प्रार्थनेच्या वेळी स्वतःला करुन द्यावी लागेलच; पण त्याचबरोबर आपण सर्वजण एका उद्दिष्टाने बांधले जाण्यासाठी दलावर संचलनाच्या वेळी एका तालात चालता यायला हवे, सुसुस्त्रतेत तालावर बर्ची नृत्य करावे लागेल, समुहाने पद्ये गावी लागतील. असे अनेक उपक्रम आपण ‘होती अनेक हृदये जरी एकरूप’ हे प्रत्यक्षात येण्यासाठी करतो . यातूनच आपले सामर्थ्य  प्रकट होईल . या सामर्थ्याचा वापर कसा करायचा याचा स्वतंत्र विचार करु.

माझ्या मनात मुळात अजून एक प्रश्न आहे; समूहाचा हा एकजिनसीपणा, एकजीवता, एकरूपता, एकतानता हि नैसर्गिक असते का? की कृत्रिम निर्माण झालेली असेल?

           हे ऐक्य, हे संतुलन नैसर्गिक असते. त्याचे पूर्ण एकत्र अस्तिस्त्व ‘एक’ म्हणून प्रगट होते. पक्षांचा थवा उडताना  ‘एक’ होऊन उडतो. प्रत्येकाला 'स्वतंत्र अस्तित्व' असते; पण थवा म्हणून  ‘एक’ स्वतंत्र अस्तित्व आहे. शरीरातील प्रत्येक पेशी वेगळी आहे पण सर्वांची मिळून ‘एक’ आकृती आहे. या अस्तिस्त्वात  एक संतुलन आहे. हे संतुलन निसर्गातील प्रत्येक रचनेत दिसून येते. चंद्र पृथ्वीबरोबर संतुलन साधत ऐक्य साधतो .सर्व ग्रह ,आकाश गंगा नव्हे संपूर्ण विश्वाच्या रचनेतील सर्व घटकांत हे ऐक्य व संतुलन दिसून येते. शरीराच्या तापमानात एक अंश बदल झाला तरी सर्व बिघडते, एक पेशी जरी वेगळे काम करायला लागली तरी कर्क रोगाकडे प्रवास सुरु होतो.

            उपासनेतील मंत्र म्हणताना आपण एकत्त्वचा,  संतुलनाचा  विचार करतो व याचे आपल्यात प्रकटीकरण करायचा संकल्प करण्यासाठी ‘समानी व आकूति: ...’ ‘जर दोन हृदये एकत्र येतील तर ...’ ही प्रार्थना म्हणतो. प्रार्थनेच्यावेळी, उपासनेच्यावेळी याची आठवण केल्यास आपणास संघ म्हणून उत्तुंग पराक्रम करता येईल. आपले सामर्थ्य योग्य दिशेने वापरता येईल .

ॐ सङ्गच्छध्वं संवदध्वं

सं वो मनांसि जानताम्

देवा भागं यथा पूर्वे

सञ्जानाना उपासते ||

May you move in harmony, speak in one voice;

Let your minds be in agreement;

Just as the ancient gods shared their portion of sacrifice.

समानो मन्त्र: समिति: समानी

समानं मन: सहचित्तमेषाम् | 

समानं मन्त्रमभिमन्त्रये व:

समानेन वो हविषा जुहोमि ||

May our purpose be the same; may we all be of one mind.

In order for such unity to form I offer a common prayer.

समानी व आकूति: समाना हृदयानि व:|

समानमस्तु वो मनो यथा व: सुसहासति ||

May our intentions and aspirations be a like,

So that a common objective unifies us all.

 

प्रशांत दिवेकर

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला , पुणे 

शनिवार ,१२/१०/२०१३

उपासनेनंतरचे प्रगट चिंतन

 

Comments

  1. व्यष्टी ते समष्टी मधील हा एकत्वाचा प्रवास छान मांडला आहेस

    ReplyDelete
  2. अतिशय उत्तम मांडणी! खूप छान लेख.👌👍

    ReplyDelete
  3. सोप्या आणि समजेल असे मांडले आहे,,सुंदर लेख

    ReplyDelete
  4. अतिशय सोप्या पण स्पष्ट शब्दांत विवेचन केले आहे 🙏 'व्यक्ती'पेक्षा पुढे जाऊन समुहशकती ची ताकद महत्वाची हेच खरे!

    ReplyDelete
  5. सोप्या उदाहरणांमधून समूहशक्तीचे महत्व पटवून दिले आहे..खूपच सुंदर मांडणी.

    ReplyDelete
    Replies
    1. समूहशक्तीतून निर्माण झालेली कार्ये आणि समूहशक्तीसाठी काय हवे दोन्ही सोप्या शब्दांत उदा.देउन स्पष्ट केले.

      Delete
  6. आज सकाळी मा. संचालकांकडून हाच विचार ऐकला. आणि आत्ता तुमच्या कडून वाचायला मिळाला.. खूपच छान लिहिले आहे.

    ReplyDelete
  7. नारायणमहाराज पाळेकर, नांदेडJuly 13, 2022 at 10:15 AM

    समूहाचा हा एकजिनसीपणा, ......... नैसर्गिक असते का?...... म्हणजेच Resonance असे मला वाटते

    ReplyDelete
  8. छान लिहलंय! एकतानता - संतुलन ..👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Nation in Image: Symbols that Shape Nations

                                                          Symbols that Shape Nations This activity introduces students to how nations use visual symbols and personifications to express identity, unity, and political values. By examining global examples and comparing them with Abanindranath Tagore’s Bharat Mata, learners explore how imagery shapes nationalism and deepen their understanding of the Bharatiya concept of Rāṣṭra. Identify images and by using references complete the table   (Support Independent Learning, Comparison & analysis) 2.  Compare the above images with Abanindranath Tagore’s image of Bharat Mata. How does it reflect Indian values? (Analysis & synthesis) 3.  How does the practice of personifying nations—often through female figures—shape our understandin...

आ. कै. उषाताईंबद्दल .....

  आ. कै. उषाताईंबद्दल  लेखन : स्मरणिकेसाठी माझा आणि उषाताईंचा पहिला संबंध २००१ मध्ये   एका मुलाखतीच्या निमित्ताने आला. प्रबोधिनीतील कामाचे दुसरे-तिसरे वर्ष असेल ,   थोडे जास्तीचे मानधन मिळण्यासाठी   प्रज्ञा मानसमध्ये एका प्रकल्पात मी काम करावे अशा कल्पनेतून पोंक्षेसरांनी मला ती मुलाखत द्यायला सांगितली होती. गिरीशराव , उषाताई आणि एक-दोन तज्ज्ञ असे पॅनल होते. मुलाखतीनंतर काही दिवसांनी मला उषाताईंना भेटण्यास सांगण्यात आले. मग त्यांच्याबरोबर थोडी सविस्तर प्रश्नोत्तरे झाली. प्रश्नोत्तराच्या शेवटी त्यांनी सांगितले , " आता इथे काम करायचे असेल तर ट्रेक , सहली , शिबिरे यांना मनात आले की जाता येणार नाही. " त्यावेळी प्रशालेत   आणि इतर अनेक विभागांबरोबर माझे असे मजेचे उद्योग चालू होते. प्रज्ञा मानसच्या पाचव्या मजल्यावरून प्रशालेच्या तिसऱ्या मजल्यावर येईपर्यंत विचार केला आणि खाली आल्यावर पोंक्षेसरांना सांगितले निवड झाली असली तरी त्यांना नाही म्हणून कळवा. त्यानंतर उषाताईंचा संबंध आला तो थेट आठ-दहा वर्षांनी , त्यावेळी मी सोलापूर प्रबोधिनीत निवासी होतो आणि उषाताई सोलाप...

तंत्रज्ञानी नवे सहस्रक…

  तंत्रज्ञानी नवे सहस्रक … ज्ञान प्रबोधिनीत अनेक समूहगीते म्हणली जातात. त्यातील एका पद्याचे धृवपद आठवते. तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसे अध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे मानवाच्या समूह विकसनात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगीवर नियंत्रण, चाकाचा शोध, लोह खनिजाचा वापर असे या प्रवासातील महत्त्वाचे ठळक टप्पे नोंदवता येतील. या सहस्रकातील गेल्या चार शतकांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा झपाट्याने विकसित झाल्या आहेत. मानवी समाजाच्या शैक्षणिक रचनांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण हा गाभाघटक बनला आहे.   स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून   विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना   तंत्रज्ञानाच्या अभ्यास शाखांची तोंडओळख व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या ज्ञान शाखांची निवड करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्यानुभव,   टेक्निकलसारखे विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आले. आजच्या गरजा ...