Skip to main content

समानी व आकूति: समाना हृदयानि व:|


समानी व आकूति: समाना हृदयानि व:|

                  गेल्या आठवड्यात युट्यूबवर एक लिंक पाहत होतो. जॉन विल्सन यांच्या वाद्यवृंदाने टाँम अँड जेरी  मालिकेसाठी तयार केलेल्या सुरावटीचे सादरीकरण होते. सुरावट व त्याचे सादरीकरण उत्तम होतेच पण त्याबरोबरचं ते पाचपन्नास वादक ज्या एकतानतेने , सुसूत्रतेने काम करत होते ते देखिल पाहण्यासारखे होते. एखादा वादक जेव्हा वादन करतो तेव्हा तो त्याच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक क्रियेत जी सुसूत्रता लागते तीच सुसूत्रता; तोच समन्वय सामुहिक सादरीकरणात  असावा लागतो. जणू एक व्यक्ती एक शरीर काम करत आहे अशी एकजीवता वादकांत निर्माण झाल्याशिवाय उत्तम सादरीकरण प्रकट होणे शक्य नाही. पाश्चात्य वाद्यवृंदांचे ५०-५० व्हायोलीनचे सादरीकरण ही  एकजीवता, एकरूपता ,एकतानता, ते ऐक्य अनुभवण्यासाठी जरूर पाहावेत.

          असे समूहमन तयार होणे शक्य आहे ? ते कसे होते ?

          असे समूहमन खरेतर सहज तयार होते. आपण रोजच्या जीवनात  त्याचा अनुभव घेतो. खचाखच भरलेली  बस जेव्हा बसस्टाॅपवर येते तेव्हा आतील लोकांचे एक समूहमन तयार होते, ते आत कमी माणसे येतील याची काळजी घेत असते; तर बाहेरच्या लोकांचे समूहमन आपण आत कसा प्रवेश करू याची काळजी घेत असते. रस्त्यावर भांडणे होतात तेव्हा असेच समूहमन तयार होते.

           एकत्र येण्याचे निमित्त काय ? हि विचार करण्याची गोष्ट आहे .त्या गर्दीला..., त्या समूहाला... काय साध्य करायचे आहे? त्यांचे उद्दिष्ट काय आहे? ते समान उद्दिष्टाने एकत्र आले आहेत का ? या गोष्टींचाही विचार केला पाहिजे.

          पुण्यात दसऱ्यानंतर  एका उद्दिष्टाने एकत्र आलेल्यांची मोठी गर्दी लक्ष्मी रस्त्यावर, तुळशीबागेत गोळा होईल. सर्वांचे उद्दिष्ट एकच असणार आहे,  खरेदी करणे. असा समूह आणि दोन महिन्यांपूर्वी वारीच्या वेळी अनुभवलेला, एका उद्दिष्टाने एकत्र आलेला वारकऱ्यांचा समूह !

           एकत्र येण्याचे निमित्त काय ? साध्य काय ?  यानुसार समूहशक्तीचे प्रगटीकरण होत असते. एका विधायक उद्दिष्टाने एखादा मोर्चा निघतो. हजारो नागरिक त्याच्यात समाविष्ट होतात. एक सामुहिक  ताकद प्रगट होते, पण त्या समुहातील सदस्यांच्या मनात साध्य-साधन स्पष्ट नसेल तर मोर्चेतील एखादा सदस्य एक दगड उचलतो आणि क्षणार्धात त्या समुहशक्तीचे रुपांतर विध्वंस ,जाळपोळ करणाऱ्या टोळीत होते.

          एक कथा आठवते. चाफळला समर्थांनी रामनवमीचा उत्सव सुरु केला. पंचक्रोशीतील हजारो नागरिक उत्सवासाठी एकत्र जमू लागले. सुलतानांच्या जुलमी राजवटीच्या भयातून मुक्त झालेले नागरिक एकत्र जमत होते. एके वर्षी  उत्सवाचा दिवस जवळ आला तरी शिवाजी महाराजांकडून येणारी मदत पोहोचली नव्हती. रामनवमीच्या दिवशी जमणाऱ्या हजारो भक्तांसाठी  प्रसादाची व्यवस्था कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला. श्री समर्थांनी रामाची आराधना  केली आणि एका रात्रीत धान्य कोठारे धान्याने भरून गेली. यातील चमत्कारावर नीट विचार केला तर त्याचे उत्तर भिक्षेत सापडते. घरटी, माणशी एक मूठ धान्य गोळा केले तर एका रात्रीत धन्य कोठार धान्याने भरणे अवघड नाही.

          आजही आपण सज्जनगडावर गेल्यावर जो प्रसाद घेतो त्यासाठी लागणारे धान्य गावोगावी फिरून गोळा केलेल्या भिक्षेतून जमा होते . महाराष्ट्रातील अनेक यात्रांमध्ये प्रसादासाठीच्या  भाकऱ्या घराघरातून गोळा केल्या जातात. आचारी न नेमता लोकसहभागातून हजारोंना जेवायला वाढले जाते. स्वाध्याय परिवार, निरंकारी परिवार अशांचे मेळावे समूहशक्तीच्या प्रगटीकरणातून कंत्राटी न देता  पार पडतात. ‘मराठा तितुका मेळवावा’ हा मंत्र समर्थांच्या अनुभवांची प्रचिती आहे. 

          समूहाने, एक दिलाने काम करायचे असेल तर तेथे निर्मितीची प्रेरणा असावी लागते. भगवान श्री कृष्णाने अशी प्रगतीसाठी आवश्यक गोसंवर्धनाची प्रेरणा गोपालांमध्ये निर्माण केली. त्यांना एका उद्दिष्टाने मेळवले आणि गोपालक समाज निर्मितीचा गोवर्धन लीलया उचलला गेला . समाज एका उद्दिष्टाने मेळवला तर भगवंत करंगळी एवढा; अधिष्ठान म्हणून  पुरतो. त्या गोवर्धनाच्या  चित्रातील गोपालांमध्ये निर्माण केलेली समूहशक्ती ,समूहप्रेरणा पाहता आली पाहिजे .

                  मराठा तितुका मेळवावा’ हा मंत्र शिवाजी महाराजांनी संघटनेसाठी वापरला.मराठी जनतेत  निर्माण झालेली शक्ती विधायकतेकडे मार्गी लावली. ‘हे राज्य व्हावे हि तो श्रींची इच्छा’ असे  समूहशक्तीसमोर भगवंताचे अधिष्ठान ठेवले . म्हणून महाराजांनंतर ,संभाजीराजांनंतर 'मराठा' शक्ती, स्वराज्य टिकवण्यासाठी लढत राहिली.

असे ऐक्य, अशी सुसूत्रता आपल्यात निर्माण व्हावी यासाठी आपण प्रार्थनेत म्हणतो; ‘होती अनेक हृदये जरी एकरूप सामर्थ्य तेथ प्रकटेल तरी अमूप’ हे आपल्या गटात उतरावयाचे असेल तर एका तालात चालता यायला हवे; एका सुरात आणि स्वरात गाता यायला हवे; एकत्र कामाकरता यावे लागेल.

               सैनिकांच्या तुकडीला अपेक्षित परिणाम साधायचा असेल, एखाद्या  खेळाच्या  खेळाडूंच्या संघाला यश मिळवायचे असेल तर तो गट संघरूपात  बांधलेला असावा लागेल. युद्धभूमीवर एकीची भावना निर्माण होण्यासाठी घोषणा दिल्या जातात ,हर हर महादेवची गर्जना केली जाते, समूहनृत्य केले जाते .  प्रबोधकांमधील  समूहशक्ती जागृत करण्यासाठी ‘होती अनेक हृदये जरी एकरूप’ ची आठवण प्रार्थनेच्या वेळी स्वतःला करुन द्यावी लागेलच; पण त्याचबरोबर आपण सर्वजण एका उद्दिष्टाने बांधले जाण्यासाठी दलावर संचलनाच्या वेळी एका तालात चालता यायला हवे, सुसुस्त्रतेत तालावर बर्ची नृत्य करावे लागेल, समुहाने पद्ये गावी लागतील. असे अनेक उपक्रम आपण ‘होती अनेक हृदये जरी एकरूप’ हे प्रत्यक्षात येण्यासाठी करतो . यातूनच आपले सामर्थ्य  प्रकट होईल . या सामर्थ्याचा वापर कसा करायचा याचा स्वतंत्र विचार करु.

माझ्या मनात मुळात अजून एक प्रश्न आहे; समूहाचा हा एकजिनसीपणा, एकजीवता, एकरूपता, एकतानता हि नैसर्गिक असते का? की कृत्रिम निर्माण झालेली असेल?

           हे ऐक्य, हे संतुलन नैसर्गिक असते. त्याचे पूर्ण एकत्र अस्तिस्त्व ‘एक’ म्हणून प्रगट होते. पक्षांचा थवा उडताना  ‘एक’ होऊन उडतो. प्रत्येकाला 'स्वतंत्र अस्तित्व' असते; पण थवा म्हणून  ‘एक’ स्वतंत्र अस्तित्व आहे. शरीरातील प्रत्येक पेशी वेगळी आहे पण सर्वांची मिळून ‘एक’ आकृती आहे. या अस्तिस्त्वात  एक संतुलन आहे. हे संतुलन निसर्गातील प्रत्येक रचनेत दिसून येते. चंद्र पृथ्वीबरोबर संतुलन साधत ऐक्य साधतो .सर्व ग्रह ,आकाश गंगा नव्हे संपूर्ण विश्वाच्या रचनेतील सर्व घटकांत हे ऐक्य व संतुलन दिसून येते. शरीराच्या तापमानात एक अंश बदल झाला तरी सर्व बिघडते, एक पेशी जरी वेगळे काम करायला लागली तरी कर्क रोगाकडे प्रवास सुरु होतो.

            उपासनेतील मंत्र म्हणताना आपण एकत्त्वचा,  संतुलनाचा  विचार करतो व याचे आपल्यात प्रकटीकरण करायचा संकल्प करण्यासाठी ‘समानी व आकूति: ...’ ‘जर दोन हृदये एकत्र येतील तर ...’ ही प्रार्थना म्हणतो. प्रार्थनेच्यावेळी, उपासनेच्यावेळी याची आठवण केल्यास आपणास संघ म्हणून उत्तुंग पराक्रम करता येईल. आपले सामर्थ्य योग्य दिशेने वापरता येईल .

ॐ सङ्गच्छध्वं संवदध्वं

सं वो मनांसि जानताम्

देवा भागं यथा पूर्वे

सञ्जानाना उपासते ||

May you move in harmony, speak in one voice;

Let your minds be in agreement;

Just as the ancient gods shared their portion of sacrifice.

समानो मन्त्र: समिति: समानी

समानं मन: सहचित्तमेषाम् | 

समानं मन्त्रमभिमन्त्रये व:

समानेन वो हविषा जुहोमि ||

May our purpose be the same; may we all be of one mind.

In order for such unity to form I offer a common prayer.

समानी व आकूति: समाना हृदयानि व:|

समानमस्तु वो मनो यथा व: सुसहासति ||

May our intentions and aspirations be a like,

So that a common objective unifies us all.

 

प्रशांत दिवेकर

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला , पुणे 

शनिवार ,१२/१०/२०१३

उपासनेनंतरचे प्रगट चिंतन

 

Comments

  1. व्यष्टी ते समष्टी मधील हा एकत्वाचा प्रवास छान मांडला आहेस

    ReplyDelete
  2. अतिशय उत्तम मांडणी! खूप छान लेख.👌👍

    ReplyDelete
  3. सोप्या आणि समजेल असे मांडले आहे,,सुंदर लेख

    ReplyDelete
  4. अतिशय सोप्या पण स्पष्ट शब्दांत विवेचन केले आहे 🙏 'व्यक्ती'पेक्षा पुढे जाऊन समुहशकती ची ताकद महत्वाची हेच खरे!

    ReplyDelete
  5. सोप्या उदाहरणांमधून समूहशक्तीचे महत्व पटवून दिले आहे..खूपच सुंदर मांडणी.

    ReplyDelete
    Replies
    1. समूहशक्तीतून निर्माण झालेली कार्ये आणि समूहशक्तीसाठी काय हवे दोन्ही सोप्या शब्दांत उदा.देउन स्पष्ट केले.

      Delete
  6. आज सकाळी मा. संचालकांकडून हाच विचार ऐकला. आणि आत्ता तुमच्या कडून वाचायला मिळाला.. खूपच छान लिहिले आहे.

    ReplyDelete
  7. नारायणमहाराज पाळेकर, नांदेडJuly 13, 2022 at 10:15 AM

    समूहाचा हा एकजिनसीपणा, ......... नैसर्गिक असते का?...... म्हणजेच Resonance असे मला वाटते

    ReplyDelete
  8. छान लिहलंय! एकतानता - संतुलन ..👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Talk on Bhartiya Heritage of Educational Practices @ International Conference on Interpreting Cultures and Traditions: Shifting the Lenses

                                                    Talk on Indian Knowledge System : Bhartiya Heritage of Educational Practices   & Relevance in Contemporary Society   @ International Conference on Interpreting Cultures and Traditions:   Shifting the Lenses RIWATCH, Arunachal Pradesh   19-21 December 2025 I feel honoured to speak today as a plenary speaker at this international conference, Interpreting Cultures and Traditions – Shifting the Lenses, on Indian Knowledge Systems, especially traditional modes of knowledge transmission and their relevance in contemporary society. This session on Bharatiya Heritage of Educational Practices is being organised here at the RIWATCH campus. Standing at this podium today, I can recall the journey of RIWATCH—how it has grown ste...

पाठ्यपुस्तक लेखनाची पायाभूत तत्त्वे — भारतीय ज्ञानपरंपरेतील मार्गदर्शक सिद्धांत

  पाठ्यपुस्तक लेखनाची पायाभूत तत्त्वे — भारतीय ज्ञानपरंपरे तील मार्गदर्शक सिद्धांत अनुबन्ध चतुष्टय — ग्रंथलेखनाची चार पायाभूत तत्त्वे गेल्या आठवड्यात एका शिबिरासाठी सज्जनगड येथे जाण्याचा योग आला.   श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या कार्य आणि साधनेशी निगडित हे एक पवित्र स्थान आहे. तेथे विद्याव्रत संस्कार या विद्यार्थ्यांच्या संस्कार कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमार्फत आयोजित अभ्यास शिबिरात   सहभागी झालो होतो. ( विद्याव्रत संस्कार हा ज्ञान प्रबोधिनीद्वारा    विद्यार्थ्यांमध्ये “विद्यार्थीत्वाचे” गुण जागवण्यासाठी केला जाणारा शैक्षणिक संस्कार आहे. व्यक्ति विकासाच्या आयामांचा परिचय करून घेणे व विद्यार्थी जीवन काळात व्यक्तिमत्त्व विकसनासाठी आवश्यक अशा व्रतांचा परिचय करून घेवून   विद्या अध्ययनचा संकल्प करणे हे या शैक्षणिक संस्काराचे सूत्र आहे.   ) सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. सकाळच्या काकड्यापासून शेज आरतीपर्यंत एक निश्चित दिनक्रम तेथे आचाराला जातो. या दैनंदिन कार्यक्रमात प्रार्थना , अभिषेक–पूजन , महाप्रसाद , भजन आण...

भारताचे संविधान : संविधान दिनानिमित्त विद्यार्थांसाठी कार्यपत्रिका

  भारताचे संविधान  संविधान दिनानिमित्त विद्यार्थांसाठी कार्यपत्रिका  आपण शाळेत प्रार्थनेच्या वेळी नियमितपणे राष्ट्रगीत , प्रतिज्ञा , वंदेमातरम आणि   भारताच्या संविधानाची उद्देशिका याचे पठण करतो.   या कार्यपत्रिकेत आपण भारताच्या संविधाना च्या उद्देशिकेची  माहिती करून घेताना  हे संविधान कसे तयार झाले , कोणी तयार केले , संविधान  निर्मितीची प्रक्रिया कशी होती याचा परिचय करून घेणार आहोत.  २६ नोव्हेंबर आपण भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करतो. संविधान दिवसापर्यंत खाली दिलेल्या कृती करत भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचा  परिचय करून घेवू या . कृती. १ :   राष्ट्रगीत , प्रतिज्ञा , वंदेमातरम आणि   भारताच्या संविधानाची उद्देशिका  यापैकी एक ज्याचे रोज  शाळेत रोज ज्याचे पठाण केले जाते  ते पुस्तकात न बघता वहीत लेखन करा. कृती २ :   भारतीय स्वातंत्र्य आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना याचे नाते उलगडून सांगणारी ‘ इंडिया : द स्पिरीट ऑफ फ्रिडम’ छोट्या फिल्मची लिंक खाली देत आहे. फिल्म बघून झाल्यावर आवडली तर आपल्या एका मित्रा...