Skip to main content

असती का ऐसे कुणी....!!

 असती का ऐसे कुणी

गुरूपौर्णिमेच्या दिवशी सकाळी व्हॉट्सअपवर संदेश यायला सुरुवात झाली. त्यातील काही संदेश गुरूची महती सांगणारे होते, काही गुरूवंदना करणारे होते तर काही शुभेच्छा संदेश होते.

यातील शुभेच्छा संदेशांना काय उत्तर द्यायचे खरंतर प्रश्नच पडतो.

कोणी कोणाला शुभेच्छा द्यायच्या आणि का द्यायच्या ?

प्रत्येक विशेष दिनाला फक्त शुभेच्छाच द्याव्यात?

की आपल्याला विशेषदिनाचा संदेश फक्त शुभेच्छाच देऊन व्यक्त करता येतो !!

असे अनेक प्रश्न मनात घेऊन त्यादिवशी प्रबोधिनीत आलो. आल्यावर थोड्या वेळाने अग्रणी विद्यार्थी ( इ १० वीतील विद्यार्थी नेते ) भेटायला आले. त्यांनी सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्गात गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम योजला होत. त्यासाठी पाहुणा वक्ता म्हणून निमंत्रित केले.

दुपारी सकाळी पडलेले  प्रश्न मनात घेऊनच कार्यक्रमात गेलो. प्रबोधिनीत प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात पद्याने (गीताने) होते. गुरूपौर्णिमेच्या कार्यक्रमाची सुरुवात ‘असती का ऐसे कुणी’  या गीताने झाली. या गीताच्या ध्रुवपदात परत परत एक प्रश्न विचारला आहे

असती का ऐसे कुणी ?

असती का ऐसे कुणी ?

कार्यक्रमाची प्रस्तावना सुरू असतानाच सकाळच्या प्रश्नांची  उत्तरे  मिळायला सुरुवात झाली !

खरंतर गुरूपौर्णिमेच्या दिवशी 

शिष्याने स्वतःच स्वतःला प्रश्न करायचा आहे ;

असती का ऐसे कुणी ?

जर हा प्रश्न मनात आला तरच

शिकण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता निर्माण होईल.

जर हा प्रश्न मनात आला तरच

ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक आणि योग्य मार्गदर्शक शोधण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल.

जर हा प्रश्न मनात आला तरच

शिकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल.

हे काय आहे, ते काय आहे,..

 .. याबद्दलची माहिती सांगू शकेल असे कोणी असतील का ?

 ..  याचा अर्थ  सांगू शकतील असे कोणी असतील का ?

 ..  याचा अर्थ कसा शोधायचा हे सांगू शकतील असे कोणी असतील का ?

हे कुठे  आहे, ते कुठे आहे, .. 

  .. ते दाखवू शकतील असे कोणी असतील का ?

हे कसे करायचे, ते कसे करायचे, .. 

 .. ते करून दाखवू शकतील असे कोणी असतील का ?

 .. ते शिकवू शकतील असे कोणी असतील का ?

हे कशामुळे आहे ते कशामुळे आहे, .. 

 .. या मागचे सूत्र .. यामागचे दडलेले तत्त्व सापडले आहे असे कोणी असतील का ?

हे काय आहे, ते काय आहे, .. 

 .. त्याचा वेगळा अर्थ शोधण्यासाठी प्रयत्न करणारे;

 .. त्याचा वेगळा अर्थ शोधला आहे असे कोणी असतील का ?

 .. सापडलेल्या अर्थाचा जगण्यासाठी वापर कसा करायचा हे जमले आहे असे कोणी असतील का ?

 .. त्याचा जगण्यासाठी वापर कसा करायचा हे शिकवू शकतील असे कोणी असतील का ?

हे काय आहे, ते काय आहे, .. 

 .. त्याप्रमाणे जीवन जगणारे कोणी असतील का ?

 ..  आणि त्याप्रमाणे जीवन कसे जगायचे याचा दृष्टीकोन देणारे  कोणी असतील का ?

हे काय आहे,ते काय आहे, .. 

 .. ते सांगणारा कुणी भेटला नाही तर परतपरत प्रयत्न करून .. 

 .. तुलाच त्याचा  शोधायचे आहे याची जाणीव करून देणारे कोणी असतील का ?

हे काय आहे, ते काय आहे,

हे कुठे  आहे, ते कुठे आहे,

हे का आहे, ते  का आहे,

हे कशामुळे आहे, ते कशामुळे आहे,

हे कसे करायचे, ते कसे करायचे,

याची जाणीव करून देणारा दुसरातिसरा कोणी नसून

तो मीच, मीच आहे !!

गुरूपौर्णिमेच्या दिवशी शिष्याने स्वतःच स्वतःला  प्रश्न करायचा आहे

असती का ऐसे कुणी ?

भारतीय शिक्षण परंपरेत शिक्षण हे केंद्रस्थानी असून 

विद्यार्थी हे ज्ञान परंपरेचे पूर्वरूप तर आचार्य उत्तररूप मानले आहे.

पूर्वरूपाला उत्तररूपात  स्वतःला पूर्णपणे विकसित करायचे असेल, प्रकट करायचे असेल 

तर गुरूपौर्णिमेच्या दिवशी स्वतःच  स्वतःला  असती का ऐसे कुणी ?हा प्रश्न विचारला 

तर ती गुरूचा शोध घेण्याची अर्थात ज्ञानपरंपरेचा पाईक होण्याची सुरुवात असेल. 

असा गुरु शोधता आला

    त्याच्याकडून ज्ञान मिळवता आले

        ते ज्ञान वापरण्याचे शहाणपण गुरूच्या सानिध्यात  स्वतःमध्ये विकसित करता आले 

तर आजच्या शिक्षक दिनी शिक्षकांना फक्त शुभेच्छा न देताशिक्षकांचे फक्त अभिनंदन न करता                                त्यांनी आपल्याला या ज्ञानपरंपरेचे पाईक बनवले

            यासाठी शिक्षकांबद्दल कृतज्ञ राहूया ! कृतज्ञता व्यक्त करूया !!   

प्रशांत दिवेकर, ज्ञान प्रबोधिनी, पुणे 

गुरुपौर्णिमा अर्थात ज्ञानाच्या परंपरांचे पाईक होण्याचा दिवस

( वरील लेख वाचण्यासाठी क्लिक करा ) 



Comments

  1. समर्पक🙏

    ReplyDelete
  2. समर्पक उद्बोधन

    ReplyDelete
  3. चिंतनशील उद् बोधन

    ReplyDelete
  4. शिक्षक, विद्यार्थी तथा संस्था चालक यांच्या साठी विचार प्रवर्तक लेख.

    ReplyDelete
  5. शिक्षण प्रक्रियेचा कृतिशील आयाम दाखवणारा लेख.
    छान मांडणी.

    ReplyDelete
  6. सर, नेहमीच विचारप्रवर्तक लेख लिहिता. आत्मपरीक्षण करण्यास उद्युक्त करणारे लेख. धन्यवाद

    ReplyDelete
  7. 'असती का ऐसे कुणी ' असा शोध घेता घेता आपण स्वतः कसे असू चा मार्ग सापडत जाईल

    ReplyDelete
  8. अध्यापक म्हणून घडताना आपले लेख नेहमीच आत्मपरीक्षण करावयास लावतात. हा लेख सुद्धा असा स्वतःचा शोध घ्यायला लावणारा आहे.

    ReplyDelete
  9. अप्रतिम लेख 👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती                       जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.     ...

पाठ्यपुस्तक लेखनाची पायाभूत तत्त्वे — भारतीय ज्ञानपरंपरेतील मार्गदर्शक सिद्धांत

  पाठ्यपुस्तक लेखनाची पायाभूत तत्त्वे — भारतीय ज्ञानपरंपरे तील मार्गदर्शक सिद्धांत अनुबन्ध चतुष्टय — ग्रंथलेखनाची चार पायाभूत तत्त्वे गेल्या आठवड्यात एका शिबिरासाठी सज्जनगड येथे जाण्याचा योग आला.   श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या कार्य आणि साधनेशी निगडित हे एक पवित्र स्थान आहे. तेथे विद्याव्रत संस्कार या विद्यार्थ्यांच्या संस्कार कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमार्फत आयोजित अभ्यास शिबिरात   सहभागी झालो होतो. ( विद्याव्रत संस्कार हा ज्ञान प्रबोधिनीद्वारा    विद्यार्थ्यांमध्ये “विद्यार्थीत्वाचे” गुण जागवण्यासाठी केला जाणारा शैक्षणिक संस्कार आहे. व्यक्ति विकासाच्या आयामांचा परिचय करून घेणे व विद्यार्थी जीवन काळात व्यक्तिमत्त्व विकसनासाठी आवश्यक अशा व्रतांचा परिचय करून घेवून   विद्या अध्ययनचा संकल्प करणे हे या शैक्षणिक संस्काराचे सूत्र आहे.   ) सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. सकाळच्या काकड्यापासून शेज आरतीपर्यंत एक निश्चित दिनक्रम तेथे आचाराला जातो. या दैनंदिन कार्यक्रमात प्रार्थना , अभिषेक–पूजन , महाप्रसाद , भजन आण...

सत्यं च स्वाध्यायप्रवचने च।

  सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। प्रकृति के सानिध्य में रहकर उसके साथ एकत्व का अनुभव करना , स्वाध्याय का प्रथम सूत्र है , जो हमें ब्रह्मांड के निर्माण और उसके रहस्यों को जानने की प्रेरणा देता है। जड़-चेतन धारणाओं से जुड़ी मूलकण , वंशसूत्र , गुणसूत्र जैसी सूक्ष्मतम चीज़ों के अध्ययन से लेकर ब्रह्मांड के विस्तार के अध्ययन तक का व्यापक आयाम हमें प्रकृति के गहनतम रहस्यों में प्रवेश करने का मार्ग प्रदान करता हैं। ब्रह्मांड के विशाल विस्तार और उसकी अनंतता को समझने का प्रयास करने के लिए पहला उपनिषदिक अध्ययन सूत्र है "ऋतं च स्वाध्याय प्रवचने च।" ऋतम् का अध्ययन ब्रह्मांड के नियमों और संरचनात्मक सिद्धांतों को समझने की कुंजी है। ऋतम् का अध्ययन   केवल दार्शनिक धारणा नहीं है , बल्कि यह ब्रह्मांड की रचना और उसके संचालन में निहित नियमों को   वैज्ञानिक दृष्टिकोणद्वारा गहराई से समझना है। यह हमें   सिखाता है कि ब्रह्मांड किस प्रकार संतुलित और सुव्यवस्थित रूप से कार्य करता है। ऋतम् का स्वाध्याय करते समय हम अपने परिवेश को गहराई से समझने लगते हैं। प्रकृति के रहस्यों की खोज और उन...