Skip to main content

इतिहास शोधताना...

इतिहास शिकता- शिकवताना भाग ४

इतिहास शोधताना

जंगले मानवी वस्तीवर आक्रमण करत आहेत.......

जंगलाने काही वर्षात नगराला गिळंकृत केले.....

अशी वाक्य कथाकादंबऱ्यामध्ये अनेकदा वाचली होती. गेल्यावर्षी अंदमान निकोबारला गेलो होतो त्यावेळी रॉस बेटाला भेट दिली तेव्हा याची प्रत्यक्ष साक्ष मिळाली.

कोण्या एकेकाळी......आटपाट नगर होते.... अशा टॅगलाईनने सुरू होणारी इतिहासातील गोष्ट प्रत्यक्ष दृश्यमान होती.

आजचे नेताजी सुभाषचंद्र बोस बेट, पूर्वी रॉस आयलंड म्हणून ओळखले जात असे. अंदमान निकोबार बेटांची व्यवस्थापकीय राजधानी होती. समुद्रावरील ब्रिटीश वर्चस्वाचे प्रतीक होते.  रॉस  बेटाचं नाव कॅप्टन डॅनियल रॉस या जलसर्वेक्षकाच्या स्मृतीसाठी देण्यात आले. रॉस यांनी कोलकाता येथे मरीन सर्व्हेयर जनरल म्हणून आणि मुंबईमध्ये जियोग्राफिकल सोसायटी ऑफ बॉम्बेचे अध्यक्ष म्हणून काम केलं होतं.

रॉस स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश कॉलनीच्या ताब्यात होते. १८५० च्या सुरुवातीस, ब्रिटीश सरकारने रॉस बेटावर ताबा मिळवला आणि हे बेट ब्रिटीश सत्तेचे केंद्र बनले. ब्रिटीशांनी या बेटावर जवळपास 80 वर्षे राज्य केले. प्राचीन प्रेस्बिटेरियन चर्च, चीफ कमिशनरचा बंगला , बेकरी, चर्च, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, टेनिस कोर्ट, क्लबहाऊस,  हॉस्पिटल, स्मशानभूमी आणि इतर अनेक पायाभूत सुविधा उभारल्या. दुसऱ्या  महायुद्धाच्या काळात काही काळ या बेटांचा ताबा जपानकडे होता.

आज रॉस बेटावर ब्रिटीश आणि जपानी इमारतींचे जुने अवशेष विपुल प्रमाणात आहेत. रॉस बेट एकेकाळी पूर्वेचे पॅरिस म्हणून ओळखले जात होते.  बेटावर ब्रिटीशांची जी विलासी जीवनशैली होती त्याचा प्रत्यय देणाऱ्या इमारती अजूनही पाहायला मिळतात.

पण आज, निसर्गाने बहुतेक जमिनीवर; इमारतींवर पुन्हा दावा केला आहे. वड-पिंपळ वर्गीय वनस्पतींच्या मुळयांनी  आणि पारंब्यांनी  हे जीर्ण अवशेष वेढून गिळंकृत केले आहेत.

 


रॉस बेटाला  भेट दिल्यावर रुपेश श्रीवास्तव यांच्या एका  हिंदी कवितेतील काही ओळी आठवल्या


खंडहर की भी अपनी कहानी है,

देखा है इसने सभ्यता को बनते, बिगड़ते खत्म होते,

गूंजी हैं यहाँ असंख्य किलकारियां, ठहाकेरुदन और चीखें,

सजी हैं यहाँ तमाम डोलियांसेहरे और अर्थियां,

गवाह है ये अनेक किस्सों का, कहानियों का।


रहा था कभी शान इसका भी, झाड़ - फानूस से लदा हुआ

संगमरमर से सजा हुआ, दरबारियों से भरा हुआ,

रोशनी से जगमगाता हुआ, घुंघरुओं से छनछनाता हुआ,

गीत गाता हुआ, संगीत सुनाता हुआ।


अब ये वीरान है, धूल गर्दे से भरा है, अंधकार में डूबा है,

फिर भी ...आज ये देता है पनाह-

प्रेमियों को, पागलों को, राहगीरों को, चोरों को, पशुओं को, पक्षियों को।


कितना दिया हैकितना दे रहा है और ना जाने कितना देगा?

बनाने वाले इसे भूल गये, पर ये ना भूला, जबसे बना है,

बस दे ही रहा है ,बिना रुके बिना थके।


मिट जायेगा एक दिन, ये अंतिम अवशेष भी दब जायेंगे,

ज़मींदोज़ होकर भी छोड़ जायेगा कुछ निशानियाँ,

जिसे खोज निकालेगी कोई नई सभ्यता, लिखी जायेंगी फिर से किताबें,

गढ़ी जायेंगी फिर से कहानियाँ, नई कहानियाँ!

"खंडहर की भी अपनी कहानी है।"




काही दशकात रॉस बेटावरील माणसाच्या स्मृती होत्याच्या नव्हत्या झाल्या. तर काही शतके, सहस्त्रके मानवाच्या स्मृती स्वतःच्या पोटात सामावून घेतलेल्या अवषेशातून माणसाचे जीवन शोधणे किती आव्हानात्मक काम आहे!

काही वर्षांपूर्वी डेक्कन कॉलेजच्या पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या गटाबरोबर उत्खननात सहभागी झालो होतो. अभ्यासकांचे मिळालेल्या भांड्याच्या एका तुकड्याचे निरीक्षण करत, निरीक्षणांना प्रश्न विचारत त्याचा काळ निश्चित करण्याचे प्रयत्न चालू होते . निरीक्षण नोंदींना प्रश्न विचारत त्यावेळेच्या मानवास अवगत असलेले तंत्रज्ञान, त्याच्या गरजा, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेली संसाधने, त्याच्या सवयी, त्यांचे संबंध, त्यांच्या श्रद्धा जाणून घेत त्यावेळच्या संस्कृतीचे चित्र साकारण्याचा प्रयत्न करायचा हे एक मोठे आव्हानात्मक काम आहे.

असे पुराव्यांचे तुकडे जोडत  दृश्यमान होत असलेले मानवी संस्कृतीचे चित्र जिगसॉ कोडयासारखे असते. ज्यातील बहुतांश तुकडे हरवलेले असतात.

नेहमीच्या जिगसॉ कोडयासारखे हे द्विमितीतील एका स्थळाचे चित्र नसते

तर त्याला काळाच्या मितीचा एक आयाम असतो.

 हे चित्र तयार करण्यासाठी सापडलेले , गोळा केलेले तुकडे वेगवेगळ्या काळातील असतात. इतिहास शोधताना असे ‘स्थळ-काळाचे’ कोडे सोडवण्यास शिकावे लागते.

इतिहास शिकता-शिकवताना, इतिहास शोधायला शिकणे-शिकवणे आणि इतिहास अभ्यासायला शिकणे-शिकवणे या दोन प्रक्रिया महत्त्वाच्या आहेत.

या लेखमालेत या दोन प्रक्रियांचा अर्थ आणि त्यासाठी शिकणे-शिकवणे घडवण्यासाठीच्या साधनांचा परिचय आपण या लेखमालेत करून घेत आहोत. 

आपल्या आजूबाजूला विखुरलेल्या गोष्टीतून भूतकाळ जाणून घेणे मजेचे आणि आव्हानात्मक आहे. पण ही एक आनंद देणारी प्रक्रिया आहे. शाळेत;वर्गात अशा प्रक्रिया घडवून आणता येतील.

आपल्या आजूबाजूच्या वर्तमानातील  गोष्टीत इतिहास दडलेला आहे याचे भान अभ्यासकाला असले तर

इतिहास शोधण्याची दृष्टी देणाऱ्या उपक्रमांची रचना शालेय अनुभवात करणे शक्य आहे. प्रश्न आहे अभ्यासकाने

असे इतिहासाचे भान जोपासत इतिहास शोधण्याची दृष्टी कशी विकसित करायची !

अगदी आपण रोज अनेक शब्द सहज वापरतो, त्यातपण इतिहास दडलेला असतो. अनेक गावांमध्ये विसावा मारुती, गावकूस मारुती, वेशीतील मारुती  अशा नावाची मारुती मंदिरे आज भरवस्तीत आढळतात. अंतयात्रा नेताना स्मशान लांब असेल तर वाटेतील विसावा म्हणून विसावा मारुती. गावकूस म्हणजे गावाची हद्द सांगणारी कच्चे वा पक्के बांधकाम असलेली भिंत, वेस म्हणजे गावाचे प्रवेशद्वार अशा भिंतीतील, वेशीतील मारुती मंदिर म्हणून  गावकूस मारुती; वेशीतील मारुती.     अशा मंदिरांच्या  आसपास असे बांधकामाचे अवशेष सापडतात. काही वर्षांपूर्वी पुण्यातील कसबा पेठेतील   मंदिरे पाहण्यासाठी  इतिहास प्रेमी मंडळाने योजलेल्या एक वारसा दर्शन सहलीत मोहन शेटे सरांबरोबर सहभागी झालो होतो. त्यावेळी गावकूस मारुती मंदिराशेजारी एका घराच्या नूतनीकरणासाठी पाया खणण्याचे काम चालू असताना गावाच्या कुसाच्या भिंतीच्या बांधकामाचे सापडलेले अवशेष बघितलेले आठवतात.

अशी आपल्या परिसरातील मंदिरे  कधी बांधली , त्याच्या सनदा, मंदिरात पूजा करणारे गुरव यांच्या वंशावळ्या, मंदिराला उपलब्ध असलेली जमीन अशी माहिती शोधत गेलो  तर त्यावरून गावाची हद्द कशी बदलत गावाचा विस्तार कसाकसा झाला असेल  याची कालरेषा मांडता येऊ शकेल.

माणसाचे इतर प्राण्यापेक्षा वेगळेपण म्हणजे भाषा. त्याला सापडलेले शब्द. आपण बोलताना जे शब्द वापरतो त्यात इतिहास दडलेला असतो. शब्द आणि इतिहास याचे नाते उलगडणारे अजून एक उदाहरण पाहू.

आपल्याला माहीत आहे की भारताचा खुश्कीच्या मार्गाने अरबस्तानातील देशांशी व तेथून पुढे  युरोपमधील देशांशी व्यापार चालू होता. पुढे कॉन्स्टंटिनोपल या शहरावरील युरोपचे नियंत्रण कमी झाल्यावर हा व्यापार टिकविण्यासाठी वेगवेगळ्या सागरी मार्गांचा शोध युरोपमधील देशांनी घेतला. तात्पर्य भारतातील वस्तू अरबस्तानामधून युरोपमध्ये पोहोचत. या प्रवासात व्यापाऱ्यांबरोबर फक्त वस्तूंचा प्रवास होत नसे तर  वस्तूंबरोबर व्यापाऱ्यांच्या भाषेचा प्रवास पण एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात होत असे. हा व्यापारी मार्ग एका शब्दाची उकल करत कसा सापडतो ते एका उदाहरणातून पाहून.

चिंचेला इंग्रजीमध्ये टॅमरिंड (Tamarind) म्हणतात. टॅमरिंड हा शब्द इंग्रजीमध्ये कसा आला हे समजण्यासाठी इतिहासाची थोडी ओळख असावी लागेल. भारतातील व्यापारी खुश्कीच्या मार्गाने भारतातील वस्तू अरबस्तानामधून युरोपमध्ये पोहोचवत. भारतातून चिंच अशीच अरबस्तानात पोहोचली व तेथून युरोपात. अरबी भाषेत खजूराला तमार (tamar) म्हणतात. चिंच आणि खजुरामध्ये तपकिरी रंग, कोळ काढता येणे, एक बी असणे असे साम्य आहे. त्यामुळे चिंचेला अरबीमध्ये तमार - हिंद (Tamar-hind) म्हणजेच भारतीय (हिंदी) खजूर (Date of India) म्हटले जाते. याचाच भ्रंश होत पुढे टॅमरिंड (tamarind) हा शब्द तयार झाला. मार्कोपोलो टॅमरिंडचे स्पेलिंग (tamarandi) असे करतो. शब्दाचा उगम शोधणे खरेच मजेचे असते.

मराठीमध्ये 'ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये' अशी म्हण आहे. वरील दोन्हीपैकी नदीचे मूळ शोधणे खरंच एक शैक्षणिक अनुभव होऊ शकेल. ऋषीचे माहीत नाही पण अभ्यास करताना आपल्या कानावर पडणाऱ्या लोककथा, आपल्या आजूबाजूच्या घरातील वा परिसरातील वस्तू आपल्याला काहीतरी सांगत असतात. त्या काय सांगतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे इतिहास शोधणे. अशा जुन्या गोष्टींचा मूळ स्थानापासून आजपर्यंतचा प्रवास शोधणे ही कृती इतिहास अभ्यासात नक्कीच आनंददायक आणि अभ्यासाची समज, आकलन वाढवण्यासाठी महत्त्वाची आहे.

            आपल्या आजूबाजूच्या गोष्टी आपल्याला काय सांगतात हे समजून घ्यायचे असेल तर आजूबाजूच्या गोष्टींबद्दल प्रश्न पडावे लागतात. याच अंदमानच्या प्रवासात, एका जागेला भेट दिले ‘हॅम्प्रीगंज’. नाव ऐकताच त्याची फोड मनात होऊन यातील एक ब्रिटीश नाव आहे तर गंज हा शब्द गाव,पूर, हळ्ळी, पल्ली, पूरम सारखा शब्द आहे हा अर्थ लावला होता. होम्फ्रेय (Homfrey) ब्रिटीश अधिकारी कोण होता याची माहिती काढणे आणि गावाच्या नावात गंज आहे तर या भागात बिहार, छत्तीसगड भागातून लोक स्थलांतरित होऊन हे गाव वसले असावे असा अंदाज बांधला. इतिहास शोधताना आता या नावाच्या अधिकाऱ्याचा अंदमानशी संबंध सापडणे आणि गावात लोकांशी बोलून त्याच्या मूळस्थानाची माहिती मिळवणे या दोन गोष्टी केल्या की त्याचा अर्थ शोधता येऊ शकेल. योग्य पुराव्यासह माहिती सापडली तर त्या गावाच्या नावात गावाचा इतिहास सापडेल. माहिती नाही सापडली,वेगळीच माहीत सापडली; प्रश्न चुकीचा ठरला तर नवीन अंदाज बांधता येईल.

अंदमानचा इतिहास हा स्थलांतरचा इतिहास असल्याने अंदमान-निकोबर बेटांवर प्रवास करताना अशा इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा इतिहासाचे भान असलेल्याला जाणवतील.  

            आपण महाराष्ट्रात नामस्मरण करताना सहज ‘ज्ञानेश्वरमाऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांचा एका दमात उच्चार करताना मी १२७५, तेरावे शतक ते १६०८, सत्राव्वे शतक जवळजवळ चारशे वर्षांची उडी मारतो हे किती जणांच्या लक्षात येते?

याचा पुढचा चरण आहे ‘निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम’ यांची जन्म वर्ष बघितली तर  ‘निवृत्ती (१२७३) ज्ञानदेव (१२७५) सोपान (१२७७) मुक्ताबाई (१२७९) एकनाथ (१५३३) नामदेव (१२७०) तुकाराम (१६०८)’.  हा चरण म्हणताना आपण इतिहासाच्या कालरेषेवर बऱ्याच उलटसुलट कोलांटीउड्या मारल्याचे लक्षात येईल.  कालरेषेनुसार हा चरण नामदेव-निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई-एकनाथ-तुकाराम’ असा  होईल. 

इतिहास शोधताना असे शब्द, मौखिक वा छापील साहित्य, वस्तू, पदार्थ, प्रथापरंपरा  अशा अनेक गोष्टींबद्दल प्रथम मनात कुतूहल निर्माण व्हायला हवे, एकदा उत्सुकता निर्माण झाली की चौकसपणे माहिती देणाऱ्या साधनाचा शोध घ्यावा लागतो, त्यांना प्रश्न विचारात अभ्यास करत साधनांची योग्यता तपासावी लागते मग अर्थ शोधत आपले निष्कर्ष मांडावे लागतात. नवीन अभ्याससाधने सापडली, त्यातून नवा संदर्भ सापडला; नवा अर्थ सापडला तर आपल्या निष्कर्षात भर घालावी लागते, काहीवेळा आपले निष्कर्ष बदलून परत नव्याने मांडणी करावी लागते. 

काल सोसायटीच्या पार्किंगमध्ये सहज हिंडत होतो तेव्हा काही मोडक्या बंद पडलेल्या, टायर गायब झालेल्या गाड्यांपासून आधुनिक ई-बाइकपर्यन्तच्या नव्याने घेतलेल्या दुचाकी दिसल्या. सहज नोंदवले तर बजाज कंपनीच्या  चेतक , एम 80, सनी, पल्सर, स्पिरीट, डिस्कव्हर, प्लॅटिना अशा अनेक दुचाकी होत्या. जर ठरवून गावातील, शहरात मोठ्या सोसायटीतील वापरत असलेल्या-नसलेल्या बजाज कंपनीच्या दुचाकी वाहनांचे फोटो काढले, कंपनीने त्या कधी बाजारात आणल्या, गाडीचा परिवहन कार्यालयातील नोंदणी क्रमांक,  मालकांनी कधी विकत घेतल्या, काय किमतील विकत घेतल्या अशी माहिती गोळा करत गेलो तर बजाज कंपनीचा इतिहास लिहिण्याचा अनुभव घेता येईल. वाहनांच्या किमती, विक्रीची संख्या, शासकीय धोरणे आणि कायदे, बदलेले तंत्रज्ञान असा अभ्यास विस्तारत नेला तर ‘बुलंद भारत कि बुलंद तसबीर’ याचा प्रत्यय तपासता येईल.

पण त्याआधी पार्किंग मधील वाहने वेगवेगळ्या काळातील आहेत हे नोंदवले गेले तरच असा विचार, असा अभ्यास सुरू होऊ शकतो.   

आपल्या आजूबाजूला असलेल्या रोजच्या वापरतील घरातील वस्तू जसे घरात प्रकाश मिळवण्यासाठी असलेली उपकरणे, उष्णता मिळवण्यासाठी वापरात असलेले-नसलेली उपकरणे, स्वयंपाकघरातील उपकरणे, घरातील चार पिढ्यांचे फोटो, वीजबिले, घरपट्टी बिले अशा असंख्य गोष्टी आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला गेल्या शे-सव्वाशे वर्षातील तंत्रज्ञानाच्या बदलांचा-विकासाचा इतिहास समजेल, आर्थिक-राजकीय-सामाजिक- सांस्कृतिक स्थित्यंतरे समजतील.

मानवी जीवनातील

विज्ञान-तंत्रज्ञान-आर्थिक- राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक  स्थित्यंतरे समजली

तर आजचे वर्तमानाचे आकलन अधिक चांगले होऊन अर्थपूर्ण जीवन जगता येईल.

वर्तमानचे भान विकसित होण्यासाठी इतिहासाचे भान असणे 

महत्त्वाचे आणि उपयोगी आहे.

प्रशांत दिवेकर

ज्ञान प्रबोधिनी, पुणे


इतिहास शिकता- शिकवताना भाग १,२,३ वाचण्यासाठी भेट द्या


https://prashantpd.blogspot.com/p/blog-page_23.html


Comments

  1. प्रशांत सर, फारच भारी मांडणी.

    ReplyDelete
  2. फारच भारी मांडणी केलीयत.

    ReplyDelete
  3. वर्तमानाचे भान विकसित होण्यासाठी इतिहासाचे भान महत्त्वाचे...छान झाला आहे लेख

    ReplyDelete
  4. डोळसपणे पाहण्याची दृष्टी देत आहात सर.

    ReplyDelete
  5. ओघवत्या आणि सोप्यि शैलीत दर्शन घडते. 👌👌

    ReplyDelete
  6. Purva Deshmukh
    Ekdam bhari lekh sir 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती                       जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.     ...

सहपुस्तक चाचणी

  सहपुस्तक चाचणी                मार्च महिन्यात शालांत परीक्षा सुरु झाल्यावर वर्तमानपत्रे ; दूरचित्रवाणीवर दहावी , बारावीच्या परीक्षेत चालू असलेल्या कॉपी पुरवठ्याची छायाचित्रे , बातम्या , चित्रफिती दिसू लागतात. माध्यमात चर्चा सुरु होते आणि आपण कशासाठी शिकवतो ? असा प्रश्न पडतो. त्याला प्रतिसाद म्हणून कॉपी मुक्ती अभियान सुरु केले जाते आणि हळूहळू त्याचाच अभिमान वाटायला लागतो. परीक्षा कशासाठी... ? वर्गात शिक्षक पुस्तकातील पाठ वाचून दाखवतात , स्पष्टीकरण म्हणून वाक्य बोलीभाषेत रुपांतर करून मांडतात , पाठाचा सारांश सांगतात. परीक्षेत पाठाखालील सरावासाठी दिलेलेच प्रश्न विचारतात. पाठाखालच्या सरावातील प्रश्नच विचारायचे असतील तर परीक्षा कशासाठी... ?              माझे एक मित्र वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. गप्पा मारताना ते मला म्हणाले , ' अमुक सालानंतर डॉक्टर झालेल्यांकडून उपचार करून घेऊ नका. ' मी विचारले , का ? काय झाले ? म्हणाले - "त्यावर्षी मला पहिल्या...

सत्यं च स्वाध्यायप्रवचने च।

  सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। प्रकृति के सानिध्य में रहकर उसके साथ एकत्व का अनुभव करना , स्वाध्याय का प्रथम सूत्र है , जो हमें ब्रह्मांड के निर्माण और उसके रहस्यों को जानने की प्रेरणा देता है। जड़-चेतन धारणाओं से जुड़ी मूलकण , वंशसूत्र , गुणसूत्र जैसी सूक्ष्मतम चीज़ों के अध्ययन से लेकर ब्रह्मांड के विस्तार के अध्ययन तक का व्यापक आयाम हमें प्रकृति के गहनतम रहस्यों में प्रवेश करने का मार्ग प्रदान करता हैं। ब्रह्मांड के विशाल विस्तार और उसकी अनंतता को समझने का प्रयास करने के लिए पहला उपनिषदिक अध्ययन सूत्र है "ऋतं च स्वाध्याय प्रवचने च।" ऋतम् का अध्ययन ब्रह्मांड के नियमों और संरचनात्मक सिद्धांतों को समझने की कुंजी है। ऋतम् का अध्ययन   केवल दार्शनिक धारणा नहीं है , बल्कि यह ब्रह्मांड की रचना और उसके संचालन में निहित नियमों को   वैज्ञानिक दृष्टिकोणद्वारा गहराई से समझना है। यह हमें   सिखाता है कि ब्रह्मांड किस प्रकार संतुलित और सुव्यवस्थित रूप से कार्य करता है। ऋतम् का स्वाध्याय करते समय हम अपने परिवेश को गहराई से समझने लगते हैं। प्रकृति के रहस्यों की खोज और उन...