Skip to main content

संस्कृतीच्या प्राणधारा : १

 संस्कृतीच्या प्राणधारा : १ 

दोन दिवसांपूर्वी त्रिपुरी पौर्णिमेच्या आसपास अनके घरांमध्ये तुळशीचे लग्न लावले जात होते. तुळशीचे लग्न बघताना काही महिन्यांपूर्वी एका प्रशिक्षणासाठी गोव्याला फोंडा परिसरात झालेला प्रवास आठवला. कळव्याला शांतादुर्गा देवस्थानाच्या जवळ मुक्कामी होतो. गेली अनेक वर्षे दिवाळीच्या आधी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेच्या अभ्यासवर्गाच्या निमित्ताने दिवाळीच्या आधी फोंड्यात जाणे होते. दिवसभर प्रशिक्षण सत्र झाल्यावर संध्याकाळी मंदिरांना भेटी, ज्या मंदिरात परवानगी असेल तेथील पुष्करणीत पोहणे हा ठरलेला कार्यक्रम.

संध्याकाळी गावात फिरत असताना अनेक घरांसमोर  बांधलेली आकर्षक तुळशी वृंदावने पाहायला मिळाली. सुंदर घडवलेली वृंदावने हे गोव्याचे एक वैशिष्ट्य आहे.


ही वृंदावने पाहत असताना काही वर्षांपूर्वी पणजीत पाहिलेल्या एका संग्रहालयाची आठवण झाली. गोव्यातील आकर्षक तुळशी वृंदावनांचा व त्यांच्या छायाचित्रांचा संग्रह तेथे होता.  संग्रहालयात दोन प्रकारची वृंदावने होती ; एकात तुळस लावली होती तर दुसऱ्या वृंदावनात क्रॉस लावला होता. गोव्यात हिंदू आणि इसाई दोन्ही धर्मांची लोकं राहतात. गोव्यातील घरांच्या पारंपरिक रचनेत घर म्हटल्यावर घराला अंगण हवे, पडवी हवी, माजघर हवे, स्वयंपाकघर हवे, देवघर हवे तसे वृंदावनही हवे. दिवसभरातील वेगवेगळी कामे करण्याच्या या जागा. तुळशी वृंदावन ही भारतीय घरामधील महिलेसाठी त्या परमेश्वराशी एकटीने संवाद साधत दिवसाची सुरुवात करण्याची उपासनेची जागा.

घराच्या रचनेत तुळशी वृंदावन, देवघर अशा रचनांचा समावेश असल्याने धर्म बदलला तरी गोव्यात वृंदावनाला स्थान राहिले. धर्मांतर झाल्याने तुळशीच्या जागी क्रॉस आला हा बदल झाला.

पण मनात  प्रश्न आला की

गोव्यातील घरांच्या पारंपरिक रचनेमध्ये वृंदावन रचना का टिकून राहिली?

याच प्रवासात संध्याकाळी शांतादुर्गा मंदिरात छबिना होता. मंदिराच्या प्रांगणात देवीची प्रदक्षिणा होती. नामघोष करत पेट्रोमॅक्स दिवे, वाजंत्री , अब्दागिरी असा साग्रसंगीत छबिना होता. या मिरवणुकीत एक वेगळीच धुपदाणी वापरात असलेली दिसली.


नेहमीच्या मातीच्या धुपदाणीपेक्षा ही धुपदानी चर्चमध्ये वापरतात अशा एन्संसोरसारखी (  encensoir : censer used to burn incense during religious processes), साखळी आणि झाकण असलेली धुपदानी होती.

मनात आले की

चर्चमधील हा ऐवज छबिन्यात कसा घुसला ?

रोजच्या जीवनात अनेक गोष्टी अशा असतात की ज्याबद्दल आपल्या साधारण प्रतिक्रिया -

त्यांच्याकडे असे असते , आमच्याकडे असे नसते !

आमच्याकडे असे असते, त्यांच्याकडे वेगळेच असते !

अशा असतात.

मुळात ते म्हणजे कोण आणि आम्ही म्हणजे कोण हे कसे ठरते, कशाच्या आधारावर ठरते ?

या त्यांच्या आणि आमच्यात अनेक गोष्टींची देवाणघेवाण होत असते, ती कशी होते ?

कोणत्या गोष्टी नकळत स्वीकारल्या जातात ? कोणत्या गोष्टी सहज स्वीकारल्या जातात? कोणत्या गोष्टी नाकारल्या जातात? आणि कोणत्या गोष्टींचा स्वीकार करणे भाग पाडले जाते ?

अशा देवाणघेवाणीतून काय घडते - काय बिघडते ?

रोजच्या जीवनात अनेक गोष्टी अशा असतात की

हे कोणी सुरू केलं ?  हे का करायचं ?

हे असचं का करायचं ? नाही केलं तर काय बिघडणार आहे ?

असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात.

बरेचदा अशा प्रश्नांना एकच उत्तर मिळते ‘शास्त्र असतं ते! '

आपल्या रोजच्या जीवनात आपण बहुतांश गोष्टी रीत असते म्हणून करत असतो.

मानवी समाजाची ही रीत कशी विकसित होत जाते ?

रीत स्थळकालानुरूप बदलत जाणारीच असते का त्यातील काही रिती चिरंतन, स्थळकाळ निरपेक्ष असतात  ?

मनुष्याने मनुष्यासाठी सामाजिक जीवन जगण्यासाठी बांधून दिलेले मनुष्यनिर्मित धारे म्हणजे रीतभात.

यातूनच वेगवेगळ्या प्रदेशातील मानवी समाजात संस्कृतीमय जीवनाची निर्मिती झाली.  

v कोणती जीवनतत्त्वे (जीवनदर्शन) सनातन भारतीय संस्कृतीतील लोकांच्या जीवनाचा आधार आहेत ?

v कोणती मार्गदर्शक मूल्ये भारतीय समाजात व्यक्तीची वर्तणूक, समाज आणि लोकजीवनाची उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी आधारभूत आहेत ? 

v आचरणाचे कोणते नियम ; संकेत भारतीय समाजातील लोकजीवनाच्या व्यवस्था निश्चित करतात ?

'संस्कृतीच्या प्राणधारा ' ह्या लेखमालेत प्रवासाच्या निमित्ताने समाजात वावरत असताना भारतीय जीवन व्यवस्था, जीवन मूल्ये आणि जीवन दर्शने याबद्दल नोंदवलेली निरीक्षणे, पडलेले प्रश्न यातून भारतीय संस्कृतीच्या प्राणधारांचे अवचित झालेले दर्शन मांडणार आहे.

प्रशांत दिवेकर

ज्ञान प्रबोधिनी, पुणे

Comments

  1. Interesting opening ...waiting for the next !

    ReplyDelete
  2. मस्त... पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत

    ReplyDelete
  3. AVM KP Palsule (Retd)December 11, 2023 at 6:25 AM

    अतिशय महत्त्वाचा विषय हाती घेतला म्हणून अभिनंदन. शेवटी उल्लेख केलेल्या तीन प्रश्नांचे विवेचन वाचायला उत्सुक आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बौद्धिक विकसनासाठी वाचन

  बौद्धिक विकसनासाठी वाचन ‘वाचन कर’ असे सुचवल्यावर काहीजणांना आनंद होतो तर अनेकजणांच्या कपाळावर आठ्या उमटतात. का वाचायचे ! कसे वाचायचे ! कशासाठी वाचायचे ! वाचताना काय करायचे ! वाचून झाल्यावर काय करायचे ! वाचून काय होणारें !!     असे अनेक प्रश्न , प्रतिक्रिया अनेकांच्या मनात डोकावत असतात. त्याची उत्तरे शोधण्याचा जो प्रयत्न करतो त्याला ‘वाचन कर’ सुचवल्यावर आनंद होण्याची शक्यता जास्त असते. वाचकाचा   पहिला सामना होतो तो वाचनाच्या तंत्राशी. अक्षरे, जोडाक्षरे , विरामचिन्हे अशा सांकेतिक लिपीतील चिन्हांशी मैत्री करत वाचक अर्थापर्यंत म्हणजेच शब्दापर्यंत येऊन   पोचतो आणि इथे खरे वाचन सुरू होते. अनेक वाचक या सांकेतिक चित्रांच्या जंजाळातच गुरफटतात. चिन्हांशी मैत्री झाली की अर्थाच्या खोलात डुबी मारण्यासाठी वाचक,   शब्द आणि शब्दांच्या अर्थछटा,   समानार्थी, विरुद्धअर्थी शब्द, वाक्प्रचार, वाक्य अशा टप्प्यात प्रवेश करतो. वाक्याला समजून घेत परिच्छेद, निबंध अशा शब्दसमूहात वाचक प्रवेश करतो. शब्दाच्या, वाक्याच्या अर्थछटा समजून घेत पूर्वज्ञानाशी सांगड घालत आपल्...

From Pages to Naturalists' Insights

                                            From Pages to Naturalists' Insights                                               Learning while Reading:                                                    Cry of the Kalahari I am a voracious reader, always eager to explore different genres of literature across various domains of knowledge. As a Maharashtrian and initially a Marathi medium student, I preferred reading in Marathi but gradually transitioned to reading books in English. Before pursuing natural science for my graduation, I was introduced to the lives and works of naturalists through books like Ashi Manasa Ashi Sahas, Chitre An...

बोलतो मराठी !....वाचतो मराठी !!

  बोलतो मराठी ! ....वाचतो मराठी  !! या महिन्यात तीन वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचनात आली. त्यातील ग्रंथालयात आलेले एक नवीन पुस्तक   ‘मी कधीही माफी मागणार नाही !’ एका व्यक्तीला झालेले ध्येय दर्शन आणि त्या ध्येय दर्शनातून कळलेला जीवन उद्देश साध्य करण्यासाठी , आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर स्वतः समोर ठेवलेली उद्दिष्टे ... मग ती उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी मिळवलेल्या शारीरिक , मानसिक , बौद्धिक क्षमता आणि प्रयत्नांची पराकाष्ठा ! प्रयत्नांच्या यशापयशातून धडपडत पण समाधानाने केलेला जीवन प्रवास !!..            ‘ मी कधीही माफी मागणार नाही!’ हे श्री. पांडुरंग खानखोजे यांचे चरित्र वाचत असताना मनात विचार येत होता की , जीवनाच्या पाठशाळेत अशा ‘स्व’ च्या शोधाचा प्रवास काहींनाच पूर्ण करता येतो. जीवनाच्या पाठशाळेत ‘स्व’च्या शोधाचा मार्ग ज्यांना सापडला त्यांच्या जीवनाचे सार सांगणारी   सूत्रं कोणती ? आणि   कठीण काळात देखील अशा व्यक्तींची इच्छा कशी प्रबळ राहते ?            दुसरे ...