Skip to main content

बोलतो मराठी !....वाचतो मराठी !!

 बोलतो मराठी !....वाचतो मराठी !!

या महिन्यात तीन वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचनात आली.

त्यातील ग्रंथालयात आलेले एक नवीन पुस्तक  ‘मी कधीही माफी मागणार नाही !’ एका व्यक्तीला झालेले ध्येय दर्शन आणि त्या ध्येय दर्शनातून कळलेला जीवन उद्देश साध्य करण्यासाठी ,आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर स्वतः समोर ठेवलेली उद्दिष्टे ... मग ती उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी मिळवलेल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता आणि प्रयत्नांची पराकाष्ठा ! प्रयत्नांच्या यशापयशातून धडपडत पण समाधानाने केलेला जीवन प्रवास !!..

          मी कधीही माफी मागणार नाही!’ हे श्री. पांडुरंग खानखोजे यांचे चरित्र वाचत असताना मनात विचार येत होता की, जीवनाच्या पाठशाळेत अशा ‘स्व’ च्या शोधाचा प्रवास काहींनाच पूर्ण करता येतो. जीवनाच्या पाठशाळेत ‘स्व’च्या शोधाचा मार्ग ज्यांना सापडला त्यांच्या जीवनाचे सार सांगणारी  सूत्रं कोणती ? आणि  कठीण काळात देखील अशा व्यक्तींची इच्छा कशी प्रबळ राहते ?

          दुसरे पुस्तक  श्री सुभाष अवचट यांचे ‘रफ स्केचेस.’ एका कलाकाराला जग कसे दिसते.

 हे चित्रकरला जे दिसते ते दिसण्यासाठी चित्रकार त्याचा भवताल कसा टिपतो? परिसरातील नैसर्गिक, मानवनिर्मित जगाकडे कसा बघतो? त्याच्या  जीवनात येणाऱ्या माणसांच्या विचार आणि भावविश्वात कसे डोकावतो ? याबद्दलचे अनुभव ते  लेखांमध्ये आपल्या समोर ठेवतात. चित्रकाराने घेतलेल्या अनुभवांनी त्याच्या जाणिवेच्या क्षेत्रात प्रवेश केल्यावर रफ स्केचेस ही स्केचेसमध्ये कशी अभिव्यक्त होतात ? कलाकार कसे क्रियाशील होतात; क्रियाशील राहतात ?

तिसरे पुस्तक खरंतर जुनेच पुस्तक आहे.

          गो. नी. दांडेकरांचे 'महाराष्ट्र दर्शन' हे पुस्तक. गोनीदांच्या कादंबऱ्या, प्रवास वर्णने आवडीची असल्याने खरंतर अनेकवेळा हातात घेऊन हे  माहितीपर पुस्तक म्हणून बाजूला ठेवलेलं पुस्तक. पुस्तक वाचताना लेखकाची निरीक्षण शक्ती त्यातून विकसित झालेले परिसराबद्दलचे, गावागाड्याबद्दलचे आणि मानवी जीवनाबद्दलचे ज्ञान याचे दर्शन होते. 'महाराष्ट्र दर्शन' हे मराठी लोक, संस्कृती आणि प्रदेशाबद्दलचे पुस्तक आहे. महाराष्ट्रातील पर्यावरण, शेती, जंगल आणि वनस्पती, सागरी किनारे, किल्ले, गावांची प्राचीन निर्मिती, लेणी, विविध मंदिरे, शस्त्रे, नद्या आणि घाट अशा अनेक गोष्टींचे वर्णन पुस्तकात केलेले आहे.

कोशांमधील महाराष्ट्राबद्दलची माहिती आपण वाचतोच पण लेखकाने प्रत्यक्ष दर्शनाने अनुभवलेला महाराष्ट्र पुस्तक वाचताना रंजकतेने आपल्या समोर  येतो. एखाद्याला महाराष्ट्राबद्दल माहिती असणे आणि गोनीदांनी  महाराष्ट्र जाणून घेतलेला असणे हा फरक ठळकपणे जाणवतो. ( खरंतर पाठ्यपुस्तके महाराष्ट्र दर्शन सारखी पाहिजेत ) लेखक निरीक्षण, प्रवास , संवाद अशा अनेक माध्यमातून ज्ञान ग्रहण कसे करत राहतात ?

खरंतर ही तिन्ही पुस्तके तीन प्रकारची..वाचतानाच लेखकाला काय सांगायचंय यांची पुरती समज आपल्याला पोहोचवणारी. तरी !

आता ,या उपर अनेकांना पडणारा एक गहन प्रश्न आहे

कशासाठी वाचायचे ?

याचे उत्तर ही तीन पुस्तके वाचताना पडलेल्या तीन प्रश्नांमध्ये आहे.

कठीण काळात देखील अशा व्यक्तींची इच्छा कशी प्रबळ राहते ?

कलाकार कसे क्रियाशील होतात; क्रियाशील राहतात ?

लेखक निरीक्षण, प्रवास , संवाद अशा अनेक माध्यमातून ज्ञान ग्रहण कसे करत राहतात ?

वाचल्याने काय होते हे माहिती नसल्याने खरंतर अनेकांना हा प्रश्न पडतो की

कशासाठी वाचायचे ?

तर वाचल्याने काय होते !

आपण आपल्या अजूबाजूंच्या व्यक्तीची जगण्याची, प्रयत्नाने काही तरी सध्या करण्याची जिद्द बघतो आणि आपणही काहीतरी मिळवण्याची-साध्य करण्याची जिद्द मनात बाळगतो.

आपण ज्याच्या बरोबर राहतो त्यांना अनेक कृती करताना बघतो आणि त्यांच्या सारखं करण्याचा प्रयत्न करून कौशल्यावर प्रभुत्व मिळवतो.

आपण ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने परिसरातील संवेदन ग्रहण करतो, त्यावर विचार करतो आणि परीसराबद्दलचे ज्ञान मिळवतो.

वरती आपण तीन प्रश्न आणि त्यावरची ढोबळमानाने तीन उत्तरे बघितली..

पण काही तरी शिकण्यासाठी वाचायचेच का ?, वाचयचे काय आणि वाचायचे कसे याचा विचार  मुळातून करावा लागेल.

खरंतर गाडगेबाबा म्हणतात त्याप्रमाणे देवाजीचे पुस्तक वाचता आले पाहिजे. पण प्रवास करून फिरत अनुभव घेत प्रत्यक्ष ज्ञान मिळवणे अवघड आणि खडतर आहे .काहीवेळा खर्चिक तर अनेकदा वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नसलेले आहे. अनुभव मिळवण्याची-घेण्याची मर्यादा, वेळ, साधने यामुळे प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याला मर्यादा येते.

मग मार्ग राहतो दुसऱ्याने मिळवलेले ज्ञान, घेतलेले अनुभव यातून शिकणे. हे करायचे असेल तर अशा व्यक्तींनी शब्दबद्ध केलेले अनुभव आणि ज्ञान वाचण्याला पर्याय नाही. ऐकणे हा पर्याय आहे, पण जर वाचले तर वाचताना वाचक तोच अनुभव मनःचक्षूसमोर मेंदू आणि हृदयाच्या सहाय्याने रेखाटू शकतो.

जसे आपण व्यायाम करून स्नायूंमधील ताकत वाढवत त्याची शक्ती वाढवतो व शारीरिक शक्तीचे संचयन  करतो तसेच वाचन हा बौद्धिक आणि मानसिक ताकद वाढवण्याचा व्यायाम आहे. वाचताना आपल्यामध्ये काही प्रकारच्या विचार प्रक्रिया निर्माण होतात आणि त्यातून काही प्रकारच्या प्रेरणा निर्माण होतात. त्या त्या प्रेरणेप्रमाणे कृती केल्यास त्या प्रेरणा  त्या त्या प्रकारच्या शक्तींचे संचयन आपल्यामध्ये करण्यास सहाय्यभूत ठरतात.

जेव्हा आपण पक्षीकोश, दुर्गदर्शन, पक्षी जाय दिगंतरा, नाझी भस्मासुराचा उदयास्त, सत्तावन्न ते सत्तेचाळीस , कुतुहलापोटी, बाराला दहा कमी  .... यासारखी पुस्तके वाचतो तेव्हा आपल्या माहितीत भर पडते.

जेव्हा आपण दुर्गभ्रमणगाथा, क्राय ऑफ कलाहारी, निसर्गवाचन, मादाम क्युरी, मी कसा झालो .... यासारखी पुस्तके वाचतो तेव्हा आपण शिकण्याच्या; ज्ञान मिळवण्याच्या पद्धती, मार्ग याबद्दल शिकतो

आणि आपण स्वतःमध्ये ज्ञानशक्तीचे संचयन करतो.


जेव्हा आपण छंदाविषयी, छंद माझा वेगळा, रुचिरा, त्रीमितीची किमया, विज्ञान खेळणी, क्रोशाचे विणकाम, सेंद्रिय परसबाग.... यासारखी पुस्तके वाचतो तेव्हा असे काही तरी करून बघण्यासाठीचे विषय,दिशा, मार्ग आपल्याला सापडतात आणि एखादी गोष्ट करण्याच्या आपल्या इच्छेला मार्गाचे दर्शन होते. आपण अनेक गोष्टी करून बघतो, त्या करताना प्रयत्न करून कौशल्यावर प्रभुत्व मिळवतो. अशा वाचनाने वाचक फक्त वाचक राहत नाही तर कार्यप्रवण होतो.

आणि आपण स्वतःमध्ये क्रियाशक्तीचे संचयन करतो.


जेव्हा आपण  एक होता करव्हर, कार्यरत, आम्ही भगीरथाचे पुत्र, अशी माणसं अशी साहसं, हेलन केलर , दिव्यस्पर्शी, टाटायन, आमचा बाप अन आम्ही .... सारखी पुस्तके वाचतो तेव्हा आपल्याला व्यक्तिमधील जगण्याची, प्रयत्नाने काही तरी साध्य  करण्यासाठीच्या जिद्दीचे दर्शन होते, त्यांचे प्रयत्न आपल्याला भिडतात आणि  नकळत काहीतरी मिळवण्याचा साध्य करण्याचा विचार मनात बळावतो.  आपण असे प्रयत्न करत असू तर आपल्या प्रयत्नाना आधार मिळतो आणि आपली इच्छा दृढ होते.

आणि आपण स्वतःमध्ये इच्छाशक्तीचे संचयन करतो.


जेव्हा आपण सृष्टीतगोष्टी, ऋतुचक्र, जंगलातील दिवस , एका रानवेड्याची शोध यात्रा,  ....यासारखी

पुस्तक वाचतो तेव्हा आपल्या निसर्गाबद्दलच्या,

जेव्हा आपण माणसं, धागे आडवे उभे, माणदेशी मानसं  बनगरवाडी…. यासारखी

पुस्तक वाचतो तेव्हा आपल्या समाजाबद्दलच्या,

जेव्हा आपण मनाचे श्लोक, जोनाथन सीगल, अल केमिस्ट, माचीवरला बुधा, एका कोळियाने, पाडस  ..... यासारखी पुस्तक वाचतो तेव्हा आपल्या स्वतःबद्दलच्या,

संवेदना जागृत होतात. 

आणि आपण स्वतःमध्ये आत्मशक्तीचे संचयन करतो.


चला आज चार प्रकारच्या

वाचनाचा संकल्प करत

आपल्यामध्ये  ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, इच्छाशक्ती आणि आत्मशक्तीचे

संचयन करूया .

आजवर आपण पुस्तकांची विभागणी कथा, कादंबरी, ललित,नाटक, कविता, चरित्र या लेखन पद्धती,मांडणी नुसार करत आलो ,

अर्थात ती बरोबर आहेच पण मराठी भाषा गौरव दिवसाचे औचित्य साधून

पुस्तकांचे  विषय हे,ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, इच्छाशक्ती, आत्मशक्ती

यानुसार बघण्याची सवय लावून घेऊया का?

ती दृष्टी विकसित करायची असेल तर

पुस्तक वाचनाकडे एक बौद्धिक, मानसिक आणि आत्मिक व्यायाम म्हणून बघावे लागेल...

व्यायाम करत राहिलो की शक्ति मिळतेच..

वाचनातून ज्ञान, क्रिया, इच्छा आणि आत्मशक्ती कडे साऱ्यांचा प्रवास सुरू होवो...

आणि पुस्तकांच्या विषय मांडणीला मनुष्य घडणीचा नवा स्पर्श होवो !!

प्रशांत दिवेकर

ज्ञान प्रबोधिनी, पुणे

वाचकांनी कॉमेंट्समध्ये आपल्याला भावलेल्या पुस्तकांची नावे जरूर सुचवावीत 



Comments

  1. पुस्तक प्रकाराची नवीन मा़ंडणी छानच.

    ReplyDelete
  2. सर खूप छान.खरचं नवीन दृष्टी देणारा लेख.हद्दपार,सर विथ लव्ह ,तोत्तोचान गोष्ट गुरुजी घडण्याची,च्युसडेज विथ मॉरी,आयडा स्कॅडर अशी काही आवडलेल्या पुस्तकांची नावे सांगता येतील

    ReplyDelete
  3. छानच, चौघीजणी, चीपर बाय डझन, Not without my daughter, लज्जा अशी बरीच पुस्तके आठवली

    ReplyDelete
  4. खूप छान मुद्दे आहेत! काही आवडती पुस्तके - तोत्तोचान, जयंत नारळीकरांची अनेक पुस्तके!

    ReplyDelete
  5. Dear Prashant,
    A blog to encourage / cultivate reading habit and make it structured. You have correctly identified that reading should go beyond time pass / entertainment or just information gathering. The reading to open your mind for introspection and for prepare to take up a new challenge.
    I read “Rough Sketches” by Subhash Awchat when it appeared as a serial column in Loksatta. The other two I have not read. Awchat covered a wide spectrum as a writer and a painter.
    You asked to write about the books read, here are some which I read in the recent past.
    1) Autobiographies of two men from two extreme ends of society. “Servant of Sahib” by Rassul Galwan and “A Life on Our Planet” (my witness statement and a vision for the future) by David Attenborough. Rassul, an illiterate porter from Ladakh, he rose quickly from Sais (सैस) (mule driver) to Bashi (leader of caravan) and finally Aqsaqal (Chief Native Trade Assistant) for British Joint Commissioner in Leh. Rassul was with many trade expeditions and British exploratory missions in Aksai Chin (White Desert) region. Rassul, learned English and the autobiography was published in 1923. A previously unnamed valley / nala was named after Rassul Galwan as Galwan nala / valley by British Indian Survey in 1928. David Attenborough and his work does not need any introduction. The book is published in 2020. Under the overcast sky of climate change, he has a vision for future, it is worth reading.
    2) “With the end in mind” is a book by Kathryn Mannix, a doctor and oncologist. It tells stories of how ordinary people face death. A sombre spectrum of human mind and behavior.
    3) “Mind F*ck” (Inside Cambridge Analytica’s Plot to Break the World) by Christopher Wylie. Wylie was working in Cambridge Analytica and was responsible for some of the applications for monitoring the users of social media. When he realized what he has done and how the company is manipulating the US presidential election and Brexit, he left company and wrote about it, risking his life. A peep into the high-end world of technology and how it works. In this season of elections, it is highly relevant.
    4) रेत समाधि is a book by Geetanjali Shree. It is milestone book in Hindi literature. It explores new way of story telling and structure of novel. It obliterates the line between reality and fantasy. This is what Mrunal Pandey has to say of the book. “यह उपन्यास बहुत सारी सरहदों को निरर्थक बना देता है और बहुत सारी निरर्थक चीजो को एक साथ जोड़कर सार्थक बना देता है. ----- मृणाल पाण्डे

    These are some of the books read, which were off the beaten tracks.
    Ravindra Apte
    24/04/2024

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वंदे गुरु परंपरा

वंदे गुरु परंपरा गुरुपौर्णिमा   अर्थात   ज्ञानाच्या   परंपरांचे   पाईक   होण्याचा   दिवस इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) भगवद् गीतेत देखील श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना ज्ञानाच्या परंपरेचा दाखला दिला आहे. ते म्हणतात ‘ मी हा अव्यय ( अविनाशी ) योग सूर्याला सांगितला. सूर्याने मनुला सांगितला व मनूने  इक्ष्वाकू   सांगितला.  भारतीय परंपरेत नवीन ज्ञानतत्वाज्ञाच्या शाखांची मांडणी करताना देखील असा गुरु परंपरेचा वारसा सांगितला जातो. कारण ज्ञानाच्या परंपरेच्या संक्रमणातूनच ज्ञान वृद्धिगत होत जाते.                ज्ञान   प्रबोधिनीने   पथकाधिपती   म्हणून   समर्थ   रामदास ,  स्वामी   दयानंद ,  स्वामी   विवेकानंद   आणि   योगी   अरविंद या चार व्यक्तींचा स्वीकार केला आहे.   त्यापैकी एक म्हणजे समर्थ रामदास! कवि   वामन   पंडितांनी   समर्थांची ...

Vande Guru Parampara

  Vande Guru Parampara Guru Purnima – Honouring Our Gurus, Upholding the Tradition इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) In the Bhagavad Gita, while advising Arjuna, Lord Krishna gives an example of the tradition of knowledge. He says, “I imparted this indestructible Yoga to the Sun (Vivasvan), who passed it on to Manu, and Manu, in turn, passed it on to Ikshvaku.” In the Indian tradition, whenever new knowledge or philosophy is presented, the legacy of the Guru's tradition is also acknowledged—because knowledge flourishes only when its lineage is preserved and passed on. Jnana Prabodhini has accepted four great personalities—Samarth Ramdas, Swami Dayananda, Swami Vivekananda, and Yogi Arvind—as its visionaries, and pathfinders who have shaped Jnana Prabodhini ideals and direction. Today, let us learn about Samarth Ramdas. The poet Vaman Pandit praises him with the following verse. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे...

महाराष्ट्रधर्म

                                                                                       महाराष्ट्रधर्म १९९९ साली महिनाभराच्या ईशान्य भारत दौऱ्यात गुवाहाटी येथे केशवधाम कार्यालयात पूर्वांचलातील कामांचा परिचय करून घेण्यासाठी गेलो होतो. ज्यांना भेटायचे होते त्यांची वाट पाहत कार्यालयात बसलो होतो. एक आजोबा कार्यालयात डोकावले. बाहेरचे पाहुणे आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी , “ कुठून आलात ? किती दिवस प्रवास आहे ? काय काय पाहिले ?” अशी चौकशी केली. महाराष्ट्रातून आलो आहोत हे कळल्यावर त्यांनी आम्हाला विचारले , “ तुम्ही रायगडावर जाऊन आला आहात का ?” आम्ही “हो , रायगड पाहिला आहे ,” असे सांगितल्यावर त्या आजोबांनी एकदम आम्हाला साष्टांग नमस्कार केला. आम्ही गोंधळलो. “काय झाले ?” म्हणून त्यांना   विचारले. मग आमच्या शेजारी बसत फालूदा   म्...