स्व-विकासाचा मार्ग
दुकानातून पातळ पोहे आणून त्याचा तयार केलेला
चिवडा
आणि तेच पातळ पोहे दोन दिवस उन्हात वाळवून त्याचा
केलेला चिवडा
— कोणता चिवडा जास्त आवडतो?
अळूची भाजी खाल्ल्यानंतर तुमच्या घशात कधी खवखवले आहे का?
हे दोन स्वयंपाकघराशी आणि खाण्याशी निगडीत प्रश्न सुरुवातीला का
विचारतो आहे, असा प्रश्न मनात आला का?
दुकानातून
आणलेले पोहे जरी कोरडे असले तरी पातळ पोहे उन्हात वाळवल्याने त्यातील उरलेसुरले
बाष्प निघून जाते, तसेच उन्हात भाजल्याने ते जास्त
खरपूस बनतात. कुरकुरीत असलेले पोहे उन्हात वाळवल्याने त्यांच्या कुरकुरीतपणा या
गुणात वाढ होते.
अळूच्या
पानात,
देठात आणि कंदात कॅल्शियम ऑक्झालेटचे स्फटिक असतात, ज्यामुळे घसा खवखवतो. अळू शिजवण्यापूर्वी नीट धुतला आणि शिजवताना त्यात
चिंच वा आंबट चुका वापरल्यास ही स्फटिकद्रव्ये कमी होऊन घसा खवखवण्याची शक्यता कमी
होते. अळूच्या भाजीत शेंगदाणे–खोबरे ही चव वाढवणारी भर नंतरची, पण आधी चिंच वापरून भाजीतील दोष दूर करावा लागतो.
स्वयंपाक
करताना आपण पदार्थावर अनेक क्रिया करत असतो, ज्यामुळे
पदार्थातील दोष कमी होतात किंवा निघून जातात, तसेच काही
प्रक्रिया अशा असतात की ज्यामुळे पदार्थाच्या अंगभूत गुणांमध्ये वाढ होते. आठवून
तर पाहा — आपण खाण्यासाठी काय काय करतो!
आपल्या दैनंदिन जीवनात स्वयंपाकघर हे असे ठिकाण आहे जेथे आपण
गुणाधान आणि दोषापनयन या प्रक्रिया सतत करत असतो.
भारतीय ज्ञानपरंपरेत आयुर्वेदात औषधे तयार करताना पदार्थाचे औषधात रूपांतर करण्यासाठी
पदार्थाच्या गुणांमध्ये ‘आधान’ म्हणजे वाढ करणे, रुजवणे,
प्रदान करणे आणि पदार्थातील दोषांचे ‘अपनयन’ म्हणजे दूर करणे,
काढून टाकणे, नष्ट करणे — या दोन प्रकारच्या
प्रक्रिया सुचवल्या आहेत.
व्यक्तिमत्त्वविकसन म्हणजे काय?
तर सद्गुणांची रुजवण म्हणजेच सकारात्मक गुणांची भर घालणे
आणि दोषांचे निरसन करणे म्हणजेच नकारात्मक गुणांचे उच्चाटन करणे.
त्यामुळे
व्यक्तिमत्त्वविकसनासाठी शैक्षणिक अनुभवांची योजना करायची असेल तर त्या
अनुभवांमुळे गुणाधान वा/आणि दोषापनयन होईल, याची योजकाने
काळजी घेतली पाहिजे.
खरेतर
योजकाने अशा अनुभवांची योजना करायला हवी की, ज्या
अनुभवाद्वारे साधक–विद्यार्थ्याला ही व्यक्तिमत्त्वविकासाची द्विसूत्री — चांगले
गुण बाणवणे आणि वाईट सवयी दूर करणे — स्वतः करता येईल.
गुणाधान आणि दोषापनयन या प्रक्रियेची सुरुवात आत्मपरीक्षणाने होते.
"आपल्याकडे कोणते गुण आधीपासून आहेत?" आणि "कोणते दोष आपल्या प्रगतीस अडथळा ठरत आहेत?" हे दोन प्रश्न विचारून जी यादी तयार होईल, त्यातून सद्यस्थिती समजून घेता येईल.
त्यानंतर कशात बदल करायचा आहे, त्याचा प्राधान्यक्रम निश्चित
करून त्यातील बदलांचे उद्दिष्ट मांडणारे संकल्प वर्षारंभी करता येतील. वर्षाअखेरीस
मनोगत लेखनात गुणाधान आणि दोषापनयन यांचा आढावा घेता येईल.
एक कल्पना!
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनात
गुणाधान आणि दोषापनयन यावर आधारित
एक नोंदपत्रक विद्यार्थ्यांना वर्षाअखेरीस देता येईल का?
किंवा त्यांच्याकडून असे
स्वमूल्यमापन पत्रक तयार करून घेता येईल का?
गुणाधान
आणि दोषापनयन : स्व-विकासाचा
मार्ग
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
Comments
Post a Comment