Skip to main content

जीवो जीवस्य जीवनम्

 

 जीवो जीवस्य जीवनम्

              दिल्ली, आग्रा परिसरात हिवाळ्याच्या दिवसात प्रवास केल्यास भरतपूर अभयारण्य हे नक्की भेट द्यायचे ठिकाण आहे.  काही वर्षांपूर्वी उत्तर भारतातील या अभयारण्यात एक दिवस राहिलो होतो. हे अभयारण्य पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. हिवाळ्याच्या दिवसात सुमारे साडेतीनशे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी या अभयारण्यात नोंदवले गेले आहेत. 

              भरतपूर अभयारण्यात एक छोटेसे संग्रहालय देखील आहे. अभयारण्यात येणारे वेगवेगळे पक्षी, त्यांची शरीर रचना व वैशिष्ट्ये, त्यांचे स्थलांतर यासारख्या  पक्षी निरीक्षणाच्या अनुषंगाने अनेक माहितीपूर्ण गोष्टी या संग्रहालयात मांडल्या आहेत. या संग्रहालयातील  एका दालनात ब्रिटिश कालखंडात भारतीय राजेराजवाडे आणि ब्रिटीश अधिकारी यांनी वाघ-चित्ते यांच्या केलेल्या शिकारींची अनेक छायाचित्रे लावलेली आहेत.  यातील एका छायाचित्रात एका मोठ्या पायरीसारख्या दिसणाऱ्या ढिगावर  काही ब्रिटिश अधिकारी हातात बंदुका घेऊन, छाती पुढे काढून शिकारीचा अभिमान बाळगत उभे होते. जवळ जाऊन तो ढिग कसला आहे बघितला  तर तो  पक्षांचा ढीग होता. भरतपूर संस्थानचे महाराज नवीन व्हॉइसराय जेव्हा भारतात नव्या नियुक्तीवर येत असत, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी डक शॉटसारखे शिकारीचे कार्यक्रम आयोजित करत असत. संग्रहालयातील तो फोटो १९३८  साली व्हॉइसराय सर लॉर्ड  लिंनलिथगोच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या डक  शॉट  च्या वेळेचा होता. या शिकारीच्या कार्यक्रमात शिकारीत  सहभागी झालेल्या अधिकारी आणि राजे राजवाड्यांनी एका दिवसात ४,२७३ पक्षांची शिकार केल्याची नोंद आहे.

             भरतपूर संग्रहालयातील ते छायाचित्र जवळ जाऊन बघणे अंगावर शहारे आणणारे होते. केवळ माणसाच्या मौजेसाठी एका दिवसात किती  पक्ष्यांचा बळी गेला. मौजेसाठी प्राण्याची हत्या करणारे हाकारे लावत प्राणी पकडीत आणून त्यांना मारतात. ती एक सामुहिक हत्याच असते.

           पराक्रमासाठी, साहसासाठी शिकार करणे याला पूर्वीच्या काळी समाज जीवनात वेगळे  स्थान असे. आज ही शिकारीवर जीवन जगणाऱ्या समूहात हौसेसाठी शिकार केली जात नाही. अशा आदिवासी समूहात कोणाची शिकार करायची, कधी करायची याबद्दल नियम-संकेत   असतात. असे नियम-संकेत पाळणाऱ्या  शिकाऱ्यांना जंगल समजलेले असते, सजीवांचे आपापसातील संबंध आणि मानवी जीवनाशी त्याचं असलेलं नातं हे त्यांना त्यांच्या जीवनात उलगडत गेलेलं असते. अशा सजग शिकाऱ्यांच्या शिकारींची सुरुवात कदाचित हौसेतून झालेली असते पण नंतर मानवाचे संरक्षण ते निसर्गाचे संवर्धन असा त्यांचा प्रवास होतो.

             काही वर्षांपूर्वी विश्वास भावे यांनी अनुवादित केलेले 'टायगर हेवन' हे पुस्तक वाचलेले आठवते. जंगल तोडीने आणि माणसाच्या वाढत्या हस्तक्षेपाने हिमालयाच्या पायथ्याशी पसरलेल्या दाट जंगलांचा आणि  जंगली प्राण्यांचा विनाश होताना पाहून एकेकाळी शिकारी असलेल्या  अर्जनसिंग याचे मन:परिवर्तन कसे होते आणि त्याच्या अथक प्रयत्नातून दुधवा अभयारण्याची उभारणी कशी झाली याची एक विलक्षण कथा या पुस्तकात मांडली आहे. एकेकाळचा वाघांचा शिकारी वाघांचा संरक्षक कसा होतो आणि त्यांच्या प्रयत्नातून दुधवा क्षेत्र टायगर हेवनकसे बनते याची ही कथा आहे.

             हे पुस्तक वाचताना मला रोईंग,अरुणाचल प्रदेशमध्ये भेटलेल्या एका शिकाऱ्याची इप्राची आठवण झाली. १९९९ साली पहिल्यांदा त्यांना भेटलो तेव्हा शिकारीसाठीचे जंगले ट्रेल आणि त्या ट्रेलच्यावेळी केलेल्या, शिकारीच्या निमित्ताने  झालेल्या जैवविविधतचे  झालेले दर्शन त्यांच्या बरोबरच्या गप्पांमध्ये झाले. पहिल्यांदाच ईशान्य भारतात गेलो होतो त्यामुळे जंगलांच्या हिरवाईने आधीच भारावून गेलो होतो. त्या हिरवाईच्या आत काय काय दडले आहे याचे दर्शन त्यांनी घडवले. गेल्या दहा वर्षात त्यांना जेव्हाजेव्हा भेटलो तेव्हा त्यांच्याकडून नवीन कथा ऐकायला मिळाल्या आहेत. या कथा आहेत 'हुलोक गिबॉन' या भारतात आढळणाऱ्या एकमेव कपि वर्गातील माकडांच्या संरक्षणाच्या आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये हुलोक गिबॉन आढळतात. हुलोक गिबॉनच्या टोळ्यांचे जंगलातील स्थलांतराचे मार्ग आणि काळ निश्चित असतात पण मानवी हस्तक्षेपाने हे मार्ग विस्कळीत झाले आहेत, खंडित झाले आहेत. आज हुलोक गिबॉनचे स्थानिक स्थलांतर सुकर व्हावे यासाठी ते आणि त्यांचे मित्र काम करतात.

            टायगर हेवन वाचत असताना हौस - साहस -  संरक्षक असे एखाद्या व्यक्तीचे मनःपरिवर्तन कसे होते हा प्रश्न वाचताना वारंवार मनात येत होता. माणूस निसर्गातून अनेक तत्त्वे, नियम शिकतो. स्वतःचे पोट भरण्यासाठी केलेल्या निसर्ग निरीक्षणातून मानवाला अन्न साखळी आणि अन्न जाळे याचे ज्ञान झाले आणि त्यातून जीवो जीवस्य जीवनम्हे सूत्र माणसाला सापडले. निसर्गातील प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे आणि त्याचा आदर करणारी जीवनशैली मानवी समूहांनी स्वीकारली. त्याप्रमाणे समाज जीवनातील नियम, संकेत, आचार, सणउत्सव यातून संस्कृती सिद्ध होत गेली.

पण गेल्या दोनतीनशे वर्षात लोकसंख्येच्या वाढत्या गरजा आणि आधुनिकीकरण  यातून हौस-गरज-हाव यातून मानवी वृत्ती बदल होत आहे. वृत्तीतील या बदलांमुळे जीवो जीवस्य जीवनम्या सत्य सूत्राचे मर्यादितच दर्शन व्यक्तीला होते.  पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला खाणे हा माझा अधिकार आहे, नव्हे प्रत्येक जीव माझ्या आहारासाठीच आहे कारण सत्य सूत्र सांगते जीवो जीवस्य जीवनम्असे समर्थन या व्यक्ती करू लागतात आणि विचार जीवो जीवस्य भोजनम्’ पुरता मर्यादित होतो.

 पण ज्या व्यक्तींना या सत्य सूत्राचे परिपूर्ण दर्शन होते ती व्यक्ती म्हणते परिसरातील प्रत्येक जीवाचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे. ही जबाबदारी आम्ही नीट पार पाडली तरचं अन्न साखळीचे संरक्षण होऊ शकेल. संरक्षक भूमिकेतील व्यक्तीच  असा विचार करू शकतात, कारण त्यांना जीवो जीवस्य जीवनम्या सूत्रातील मानवाच्या भूमिकेचे यथार्थ दर्शन झालेले असते आणि अशाच व्यक्तींच्या आचरणाचे 'अहिंसा' हे सूत्र बनते.

              परिस्थितीकडे आणि सत्यसूत्रांकडे  आपण कोणत्या व्याप्तीत, कोणत्या दृष्टीने आणि  कोणत्या वृत्तीने बघतो ही विचार करण्याची गोष्ट आहे.  लेखातील उदाहरणे तर सांगतात,         हौस - साहस संरक्षक हा वृत्तीबदल मानवाला शक्य आहे 

आणि

 वाल्याचा वाल्मिकी होणे या व्यक्ती परिवर्तनावर आपला विश्वास आहे.

                                                                                                        प्रशांत दिवेकर

ज्ञान प्रबोधिनी, पुणे






Comments

  1. सर पक्ष्यांच्या चित्रांचा फोटो पाहून तर सुन्न व्हायला झालं.मी पारनेरला असताना गावाबाहेरील एका टेकडीवर सलग ४ वर्षे झाडं लावण्याचा प्रयत्न केला होता.खूप अनुभव आले पण आमचा गट प्रयत्न करत राहिला.तुम्ही सुचविलेली पुस्तके वाचायला नक्कीच आवडेल.

    ReplyDelete
  2. हिंदू परंपरेतील चातुर्मासातील आहार नियमांचा आग्रहही या साखळीशी सुसंगत वाटतो.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Nation in Image: Symbols that Shape Nations

                                                          Symbols that Shape Nations This activity introduces students to how nations use visual symbols and personifications to express identity, unity, and political values. By examining global examples and comparing them with Abanindranath Tagore’s Bharat Mata, learners explore how imagery shapes nationalism and deepen their understanding of the Bharatiya concept of Rāṣṭra. Identify images and by using references complete the table   (Support Independent Learning, Comparison & analysis) 2.  Compare the above images with Abanindranath Tagore’s image of Bharat Mata. How does it reflect Indian values? (Analysis & synthesis) 3.  How does the practice of personifying nations—often through female figures—shape our understandin...

आ. कै. उषाताईंबद्दल .....

  आ. कै. उषाताईंबद्दल  लेखन : स्मरणिकेसाठी माझा आणि उषाताईंचा पहिला संबंध २००१ मध्ये   एका मुलाखतीच्या निमित्ताने आला. प्रबोधिनीतील कामाचे दुसरे-तिसरे वर्ष असेल ,   थोडे जास्तीचे मानधन मिळण्यासाठी   प्रज्ञा मानसमध्ये एका प्रकल्पात मी काम करावे अशा कल्पनेतून पोंक्षेसरांनी मला ती मुलाखत द्यायला सांगितली होती. गिरीशराव , उषाताई आणि एक-दोन तज्ज्ञ असे पॅनल होते. मुलाखतीनंतर काही दिवसांनी मला उषाताईंना भेटण्यास सांगण्यात आले. मग त्यांच्याबरोबर थोडी सविस्तर प्रश्नोत्तरे झाली. प्रश्नोत्तराच्या शेवटी त्यांनी सांगितले , " आता इथे काम करायचे असेल तर ट्रेक , सहली , शिबिरे यांना मनात आले की जाता येणार नाही. " त्यावेळी प्रशालेत   आणि इतर अनेक विभागांबरोबर माझे असे मजेचे उद्योग चालू होते. प्रज्ञा मानसच्या पाचव्या मजल्यावरून प्रशालेच्या तिसऱ्या मजल्यावर येईपर्यंत विचार केला आणि खाली आल्यावर पोंक्षेसरांना सांगितले निवड झाली असली तरी त्यांना नाही म्हणून कळवा. त्यानंतर उषाताईंचा संबंध आला तो थेट आठ-दहा वर्षांनी , त्यावेळी मी सोलापूर प्रबोधिनीत निवासी होतो आणि उषाताई सोलाप...

तंत्रज्ञानी नवे सहस्रक…

  तंत्रज्ञानी नवे सहस्रक … ज्ञान प्रबोधिनीत अनेक समूहगीते म्हणली जातात. त्यातील एका पद्याचे धृवपद आठवते. तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसे अध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे मानवाच्या समूह विकसनात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगीवर नियंत्रण, चाकाचा शोध, लोह खनिजाचा वापर असे या प्रवासातील महत्त्वाचे ठळक टप्पे नोंदवता येतील. या सहस्रकातील गेल्या चार शतकांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा झपाट्याने विकसित झाल्या आहेत. मानवी समाजाच्या शैक्षणिक रचनांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण हा गाभाघटक बनला आहे.   स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून   विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना   तंत्रज्ञानाच्या अभ्यास शाखांची तोंडओळख व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या ज्ञान शाखांची निवड करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्यानुभव,   टेक्निकलसारखे विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आले. आजच्या गरजा ...