Skip to main content

जीवो जीवस्य जीवनम्

 

 जीवो जीवस्य जीवनम्

              दिल्ली, आग्रा परिसरात हिवाळ्याच्या दिवसात प्रवास केल्यास भरतपूर अभयारण्य हे नक्की भेट द्यायचे ठिकाण आहे.  काही वर्षांपूर्वी उत्तर भारतातील या अभयारण्यात एक दिवस राहिलो होतो. हे अभयारण्य पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. हिवाळ्याच्या दिवसात सुमारे साडेतीनशे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी या अभयारण्यात नोंदवले गेले आहेत. 

              भरतपूर अभयारण्यात एक छोटेसे संग्रहालय देखील आहे. अभयारण्यात येणारे वेगवेगळे पक्षी, त्यांची शरीर रचना व वैशिष्ट्ये, त्यांचे स्थलांतर यासारख्या  पक्षी निरीक्षणाच्या अनुषंगाने अनेक माहितीपूर्ण गोष्टी या संग्रहालयात मांडल्या आहेत. या संग्रहालयातील  एका दालनात ब्रिटिश कालखंडात भारतीय राजेराजवाडे आणि ब्रिटीश अधिकारी यांनी वाघ-चित्ते यांच्या केलेल्या शिकारींची अनेक छायाचित्रे लावलेली आहेत.  यातील एका छायाचित्रात एका मोठ्या पायरीसारख्या दिसणाऱ्या ढिगावर  काही ब्रिटिश अधिकारी हातात बंदुका घेऊन, छाती पुढे काढून शिकारीचा अभिमान बाळगत उभे होते. जवळ जाऊन तो ढिग कसला आहे बघितला  तर तो  पक्षांचा ढीग होता. भरतपूर संस्थानचे महाराज नवीन व्हॉइसराय जेव्हा भारतात नव्या नियुक्तीवर येत असत, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी डक शॉटसारखे शिकारीचे कार्यक्रम आयोजित करत असत. संग्रहालयातील तो फोटो १९३८  साली व्हॉइसराय सर लॉर्ड  लिंनलिथगोच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या डक  शॉट  च्या वेळेचा होता. या शिकारीच्या कार्यक्रमात शिकारीत  सहभागी झालेल्या अधिकारी आणि राजे राजवाड्यांनी एका दिवसात ४,२७३ पक्षांची शिकार केल्याची नोंद आहे.

             भरतपूर संग्रहालयातील ते छायाचित्र जवळ जाऊन बघणे अंगावर शहारे आणणारे होते. केवळ माणसाच्या मौजेसाठी एका दिवसात किती  पक्ष्यांचा बळी गेला. मौजेसाठी प्राण्याची हत्या करणारे हाकारे लावत प्राणी पकडीत आणून त्यांना मारतात. ती एक सामुहिक हत्याच असते.

           पराक्रमासाठी, साहसासाठी शिकार करणे याला पूर्वीच्या काळी समाज जीवनात वेगळे  स्थान असे. आज ही शिकारीवर जीवन जगणाऱ्या समूहात हौसेसाठी शिकार केली जात नाही. अशा आदिवासी समूहात कोणाची शिकार करायची, कधी करायची याबद्दल नियम-संकेत   असतात. असे नियम-संकेत पाळणाऱ्या  शिकाऱ्यांना जंगल समजलेले असते, सजीवांचे आपापसातील संबंध आणि मानवी जीवनाशी त्याचं असलेलं नातं हे त्यांना त्यांच्या जीवनात उलगडत गेलेलं असते. अशा सजग शिकाऱ्यांच्या शिकारींची सुरुवात कदाचित हौसेतून झालेली असते पण नंतर मानवाचे संरक्षण ते निसर्गाचे संवर्धन असा त्यांचा प्रवास होतो.

             काही वर्षांपूर्वी विश्वास भावे यांनी अनुवादित केलेले 'टायगर हेवन' हे पुस्तक वाचलेले आठवते. जंगल तोडीने आणि माणसाच्या वाढत्या हस्तक्षेपाने हिमालयाच्या पायथ्याशी पसरलेल्या दाट जंगलांचा आणि  जंगली प्राण्यांचा विनाश होताना पाहून एकेकाळी शिकारी असलेल्या  अर्जनसिंग याचे मन:परिवर्तन कसे होते आणि त्याच्या अथक प्रयत्नातून दुधवा अभयारण्याची उभारणी कशी झाली याची एक विलक्षण कथा या पुस्तकात मांडली आहे. एकेकाळचा वाघांचा शिकारी वाघांचा संरक्षक कसा होतो आणि त्यांच्या प्रयत्नातून दुधवा क्षेत्र टायगर हेवनकसे बनते याची ही कथा आहे.

             हे पुस्तक वाचताना मला रोईंग,अरुणाचल प्रदेशमध्ये भेटलेल्या एका शिकाऱ्याची इप्राची आठवण झाली. १९९९ साली पहिल्यांदा त्यांना भेटलो तेव्हा शिकारीसाठीचे जंगले ट्रेल आणि त्या ट्रेलच्यावेळी केलेल्या, शिकारीच्या निमित्ताने  झालेल्या जैवविविधतचे  झालेले दर्शन त्यांच्या बरोबरच्या गप्पांमध्ये झाले. पहिल्यांदाच ईशान्य भारतात गेलो होतो त्यामुळे जंगलांच्या हिरवाईने आधीच भारावून गेलो होतो. त्या हिरवाईच्या आत काय काय दडले आहे याचे दर्शन त्यांनी घडवले. गेल्या दहा वर्षात त्यांना जेव्हाजेव्हा भेटलो तेव्हा त्यांच्याकडून नवीन कथा ऐकायला मिळाल्या आहेत. या कथा आहेत 'हुलोक गिबॉन' या भारतात आढळणाऱ्या एकमेव कपि वर्गातील माकडांच्या संरक्षणाच्या आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये हुलोक गिबॉन आढळतात. हुलोक गिबॉनच्या टोळ्यांचे जंगलातील स्थलांतराचे मार्ग आणि काळ निश्चित असतात पण मानवी हस्तक्षेपाने हे मार्ग विस्कळीत झाले आहेत, खंडित झाले आहेत. आज हुलोक गिबॉनचे स्थानिक स्थलांतर सुकर व्हावे यासाठी ते आणि त्यांचे मित्र काम करतात.

            टायगर हेवन वाचत असताना हौस - साहस -  संरक्षक असे एखाद्या व्यक्तीचे मनःपरिवर्तन कसे होते हा प्रश्न वाचताना वारंवार मनात येत होता. माणूस निसर्गातून अनेक तत्त्वे, नियम शिकतो. स्वतःचे पोट भरण्यासाठी केलेल्या निसर्ग निरीक्षणातून मानवाला अन्न साखळी आणि अन्न जाळे याचे ज्ञान झाले आणि त्यातून जीवो जीवस्य जीवनम्हे सूत्र माणसाला सापडले. निसर्गातील प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे आणि त्याचा आदर करणारी जीवनशैली मानवी समूहांनी स्वीकारली. त्याप्रमाणे समाज जीवनातील नियम, संकेत, आचार, सणउत्सव यातून संस्कृती सिद्ध होत गेली.

पण गेल्या दोनतीनशे वर्षात लोकसंख्येच्या वाढत्या गरजा आणि आधुनिकीकरण  यातून हौस-गरज-हाव यातून मानवी वृत्ती बदल होत आहे. वृत्तीतील या बदलांमुळे जीवो जीवस्य जीवनम्या सत्य सूत्राचे मर्यादितच दर्शन व्यक्तीला होते.  पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला खाणे हा माझा अधिकार आहे, नव्हे प्रत्येक जीव माझ्या आहारासाठीच आहे कारण सत्य सूत्र सांगते जीवो जीवस्य जीवनम्असे समर्थन या व्यक्ती करू लागतात आणि विचार जीवो जीवस्य भोजनम्’ पुरता मर्यादित होतो.

 पण ज्या व्यक्तींना या सत्य सूत्राचे परिपूर्ण दर्शन होते ती व्यक्ती म्हणते परिसरातील प्रत्येक जीवाचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे. ही जबाबदारी आम्ही नीट पार पाडली तरचं अन्न साखळीचे संरक्षण होऊ शकेल. संरक्षक भूमिकेतील व्यक्तीच  असा विचार करू शकतात, कारण त्यांना जीवो जीवस्य जीवनम्या सूत्रातील मानवाच्या भूमिकेचे यथार्थ दर्शन झालेले असते आणि अशाच व्यक्तींच्या आचरणाचे 'अहिंसा' हे सूत्र बनते.

              परिस्थितीकडे आणि सत्यसूत्रांकडे  आपण कोणत्या व्याप्तीत, कोणत्या दृष्टीने आणि  कोणत्या वृत्तीने बघतो ही विचार करण्याची गोष्ट आहे.  लेखातील उदाहरणे तर सांगतात,         हौस - साहस संरक्षक हा वृत्तीबदल मानवाला शक्य आहे 

आणि

 वाल्याचा वाल्मिकी होणे या व्यक्ती परिवर्तनावर आपला विश्वास आहे.

                                                                                                        प्रशांत दिवेकर

ज्ञान प्रबोधिनी, पुणे






Comments

  1. सर पक्ष्यांच्या चित्रांचा फोटो पाहून तर सुन्न व्हायला झालं.मी पारनेरला असताना गावाबाहेरील एका टेकडीवर सलग ४ वर्षे झाडं लावण्याचा प्रयत्न केला होता.खूप अनुभव आले पण आमचा गट प्रयत्न करत राहिला.तुम्ही सुचविलेली पुस्तके वाचायला नक्कीच आवडेल.

    ReplyDelete
  2. हिंदू परंपरेतील चातुर्मासातील आहार नियमांचा आग्रहही या साखळीशी सुसंगत वाटतो.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वंदे गुरु परंपरा

वंदे गुरु परंपरा गुरुपौर्णिमा   अर्थात   ज्ञानाच्या   परंपरांचे   पाईक   होण्याचा   दिवस इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) भगवद् गीतेत देखील श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना ज्ञानाच्या परंपरेचा दाखला दिला आहे. ते म्हणतात ‘ मी हा अव्यय ( अविनाशी ) योग सूर्याला सांगितला. सूर्याने मनुला सांगितला व मनूने  इक्ष्वाकू   सांगितला.  भारतीय परंपरेत नवीन ज्ञानतत्वाज्ञाच्या शाखांची मांडणी करताना देखील असा गुरु परंपरेचा वारसा सांगितला जातो. कारण ज्ञानाच्या परंपरेच्या संक्रमणातूनच ज्ञान वृद्धिगत होत जाते.                ज्ञान   प्रबोधिनीने   पथकाधिपती   म्हणून   समर्थ   रामदास ,  स्वामी   दयानंद ,  स्वामी   विवेकानंद   आणि   योगी   अरविंद या चार व्यक्तींचा स्वीकार केला आहे.   त्यापैकी एक म्हणजे समर्थ रामदास! कवि   वामन   पंडितांनी   समर्थांची ...

Vande Guru Parampara

  Vande Guru Parampara Guru Purnima – Honouring Our Gurus, Upholding the Tradition इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) In the Bhagavad Gita, while advising Arjuna, Lord Krishna gives an example of the tradition of knowledge. He says, “I imparted this indestructible Yoga to the Sun (Vivasvan), who passed it on to Manu, and Manu, in turn, passed it on to Ikshvaku.” In the Indian tradition, whenever new knowledge or philosophy is presented, the legacy of the Guru's tradition is also acknowledged—because knowledge flourishes only when its lineage is preserved and passed on. Jnana Prabodhini has accepted four great personalities—Samarth Ramdas, Swami Dayananda, Swami Vivekananda, and Yogi Arvind—as its visionaries, and pathfinders who have shaped Jnana Prabodhini ideals and direction. Today, let us learn about Samarth Ramdas. The poet Vaman Pandit praises him with the following verse. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे...

महाराष्ट्रधर्म

                                                                                       महाराष्ट्रधर्म १९९९ साली महिनाभराच्या ईशान्य भारत दौऱ्यात गुवाहाटी येथे केशवधाम कार्यालयात पूर्वांचलातील कामांचा परिचय करून घेण्यासाठी गेलो होतो. ज्यांना भेटायचे होते त्यांची वाट पाहत कार्यालयात बसलो होतो. एक आजोबा कार्यालयात डोकावले. बाहेरचे पाहुणे आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी , “ कुठून आलात ? किती दिवस प्रवास आहे ? काय काय पाहिले ?” अशी चौकशी केली. महाराष्ट्रातून आलो आहोत हे कळल्यावर त्यांनी आम्हाला विचारले , “ तुम्ही रायगडावर जाऊन आला आहात का ?” आम्ही “हो , रायगड पाहिला आहे ,” असे सांगितल्यावर त्या आजोबांनी एकदम आम्हाला साष्टांग नमस्कार केला. आम्ही गोंधळलो. “काय झाले ?” म्हणून त्यांना   विचारले. मग आमच्या शेजारी बसत फालूदा   म्...