Skip to main content

सहपुस्तक चाचणी

 

सहपुस्तक चाचणी

               मार्च महिन्यात शालांत परीक्षा सुरु झाल्यावर वर्तमानपत्रे; दूरचित्रवाणीवर दहावी,बारावीच्या परीक्षेत चालू असलेल्या कॉपी पुरवठ्याची छायाचित्रे , बातम्या, चित्रफिती दिसू लागतात. माध्यमात चर्चा सुरु होते आणि आपण कशासाठी शिकवतो? असा प्रश्न पडतो. त्याला प्रतिसाद म्हणून कॉपी मुक्ती अभियान सुरु केले जाते आणि हळूहळू त्याचाच अभिमान वाटायला लागतो. परीक्षा कशासाठी...? वर्गात शिक्षक पुस्तकातील पाठ वाचून दाखवतात, स्पष्टीकरण म्हणून वाक्य बोलीभाषेत रुपांतर करून मांडतात, पाठाचा सारांश सांगतात. परीक्षेत पाठाखालील सरावासाठी दिलेलेच प्रश्न विचारतात. पाठाखालच्या सरावातील प्रश्नच विचारायचे असतील तर परीक्षा कशासाठी...?

             माझे एक मित्र वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. गप्पा मारताना ते मला म्हणाले, 'अमुक सालानंतर डॉक्टर झालेल्यांकडून उपचार करून घेऊ नका.' मी विचारले, का? काय झाले? म्हणाले - "त्यावर्षी मला पहिल्यांदा एका विद्यार्थ्याने विचारले होते, 'सर या रोगाला परीक्षेत कमी वेटेज असताना तुम्ही एवढ्या तपशिलात का शिकवता आहात?' आता परीक्षेतील मार्कांच्या वेटेजनुसार का तुमच्याकडे पेशंट येणार आहेत."

म्हणजे परीक्षेसाठी आपण शिकतो का? की, आपण काय,किती शिकलो हे तपासण्यासाठी परीक्षा आहे? आपण शिकवलेले विद्यार्थ्याला किती समजले हे तपासून पुढील अध्यापनाची तयारी करण्यासाठी परीक्षा आहेत का? की, परीक्षेत काय विचारले जाणार आहे त्यासाठी आणि तेवढेच अध्यापन करायचे आहे?

             कॉपी कमी करायची असेल, स्मरणावरचा भार कमी करून आकलन, उपयोजन तपासायचे असेल तर `सहपुस्तक चाचणी' हा परीक्षा प्रकार उपयोगी पडेल असे वाटते. आज केंद्रिय परीक्षामंडळाने ९वी, १०वी साठी अशा सहपुस्तक चाचण्या सुरु केल्या आहेत. महाराष्ट्रात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनात, आकारिक मूल्यमापनात अशा सहपुस्तक चाचण्या  घेण्यास परवानगी दिली आहे.

                  अध्यापनाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवण्यासाठी सक्षम बनवणे हे आहे. त्यासाठी विद्यार्थ्याला ज्ञान मिळवण्यासाठी लागणारी विविध कौशल्ये शिकवणे, विविध अनुभव देणे आवश्यक आहे. माहिती प्राप्त करणे, समज वाढवणे, पूर्वज्ञानात नवीन अनुभव घेत भर घालणे हे तर विद्यार्थ्याला जमणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीचा, ज्ञानाचा वापर योग्य ठिकाणी योग्य पद्धतीत करता आला पाहिजे. सहपुस्तक चाचणीने माहिती प्रधान प्रश्नांपासून आकलन तपासणाऱ्या प्रश्नांपर्यंत मूल्यमापनात बदल करता येणे शक्य आहे. सहपुस्तक चाचणी वेगवेगळ्या पद्धतीने घेता येईल.

१) पाठ्य पुस्तकावर आधारित सहपुस्तक चाचणी :

         याचे दोन स्तर करता येतील.

पहिल्या स्तरात विद्यार्थ्याचे पाठ्यपुस्तकाचे  वाचन, पाठ्यपुस्तकात प्रश्नानुरूप  आशय शोधता येणे, आशयाची प्रश्नानुरूप पुनर्मांडणी करता येणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून प्रश्नपत्रिका तयार करावी.

दुसऱ्या स्तरावर उपयोजन, तुलना, विश्लेषण पातळीवरचे प्रश्न विचारता येतील. दुसऱ्या स्तराच्या चाचणीत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा वापर संदर्भ म्हणून करता येईल पण प्रश्नांची उत्तरे थेट पाठ्यपुस्तकात मिळणार नाहीत असे प्रश्न असावेत. यासाठी ब्लुमच्या उच्चस्तरीय विचार कौशल्य सारणीचा विचार करावा.

२) पाठ्यपुस्तकेतर संदर्भावर आधारीत सहपुस्तक चाचणी :

                    पाठ्यपुस्तकातील संकल्पनांसंदर्भात विद्यार्थ्यांनी अवांतर पूरक वाचन करावे अशी अपेक्षा असते. विश्वकोष, अॅटलास, शब्दकोश, इंटरनेट वरील संकेत स्थळे या सारखे संदर्भ वापरत एखाद्या संकल्पनेबद्दल खुले प्रतिसादी (ओपन एन्डेड) प्रश्नांचा समावेश असलेली सहपुस्तक चाचणी घेता येईल. याला सहसंदर्भ सहपुस्तकचाचणी म्हणता येईल.

३) अध्यापकाने पुरवलेल्या संदर्भाचा वापर करत सहपुस्तक चाचणी :

            समाजात घडणाऱ्या अनेक घटना या पाठ्यपुस्तकातील संकल्पनांशी निगडीत असतात. पाठ्यपुस्तकातील संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी ह्या दैनंदिन जीवनातील घटनांचा उपयोग होतो. अशा घटना समजून घेण्यासाठी पाठ्यपुस्तकातील घटकाचे आकलन चांगले असल्यास त्यांचे उपयोजन दैनंदिन घटना समजून घेण्यासाठी विद्यार्थी कसा करतो हे तपासता येईल, त्यासाठी आपण वर्तमानपत्रे, मासिके यात प्रकाशित झालेले लेख, अहवाल, वृत्त, नकाशे, छायाचित्रे, आलेख विद्यार्थ्यांना पूरक वाचनासाठी अभ्यास साहित्य म्हणून द्यावे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पाठ्यपुस्तक वापराची परवानगी नसेल पण असे अध्यापकाने पुरवलेले अभ्यास साहित्य तो बरोबर बाळगू शकेल. नैसर्गिक आपत्ती, पर्यावरण रक्षण, प्रदूषण, नागरी कर्तव्ये या सारख्या अनेक विज्ञान, समाजशास्त्रातील घटकांसाठी अशी  चाचणी घेता येईल. अशा चाचणीसाठी अध्यापकाला विशेष मेहनत घेऊन संदर्भ साहित्य तयार करावे लागते.

४) प्रश्नपत्रिका सोडवताना कोणते संदर्भ लागतील हे ठरवण्याची संधी विद्यार्थ्याला  देणारी सहपुस्तक चाचणी :

                 शा सहपुस्तक चाचणीत विद्यार्थ्याला एका पानावर परीक्षेसाठी लागणारे संदर्भ, माहिती लिहून आणण्याची परवानगी द्यावी. असा संदर्भाचा कागद विद्यार्थी परीक्षेच्यावेळी सोबत बाळगू शकेल. हा संदर्भकागद उत्तर पत्रिकेला जोडण्यास सांगावा म्हणजे अध्यापकाला त्याने कोणते संदर्भ वापरले आहेत हे लक्षात येईल आणि केवळ पाठ केले नाही किंवा आठवले नाही या कारणामुळे अनेक विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका सोडवताना जी अडचण येते ती दूर करून त्याला आकलन, उपयोजन पातळीवर प्रश्न सोडवण्यास सुलभता येईल

सहपुस्तक चाचणी घेताना :

१)      पुस्तक वापरायला मिळणार आहे म्हणजे अभ्यासाची गरज नाही असा भ्रम विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण होतो.

२)      केवळ काठिण्यपातळी वाढवलेली प्रश्नपत्रिका म्हणजे सहपुस्तक चाचणीची प्रश्नपत्रिका नाही. विद्यार्थ्याचे आकलन, उपयोजन, विचार कौशल्य तपासणारे प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका सहपुस्तक चाचणीसाठी काढावी लागेल. माहिती शोधण्यापेक्षा माहितीची पुनर्मांडणी करणारी विचार कौशल्ये तपासता येतील असे प्रश्न विचारावेत. प्रश्नांमध्ये चिकित्सा करा, तुलना करा, तुमचे मत मांडा, तुम्ही काय कराल अशा प्रकारचे प्रश्न विचारावेत.

३)      सहपुस्तक चाचणी सोडवताना वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

     आकारिक मूल्यमापनात विद्यार्थ्यांच्या मर्यादा दूर करण्यासाठी आवश्यक अशी परीक्षा घेण्यासाठी सहपुस्तक चाचणी हे साधन नक्कीच उपयोगी ठरेल. शालेय मूल्यमापनात पाठ करा, सादर करा, घोका आणि ओका  या चक्रातून बाहेर पडून विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त करणाऱ्या सहपुस्तक चाचण्या घेण्याचे वेगवेगळे प्रयोग करण्याची गरज आहे. 

आज लॉक डाऊनच्या काळात तंत्रस्नेही सहपुस्तक चाचण्या नव्हे तर सहसंदर्भ चाचण्या कशा घेता येतील, ऑनलाईन संदर्भ वापरण्यापासून ऑनलाईन गटाकार्य देत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करता येईल याबद्दल पुढिल लेखात विचार करूयात.

( प्रशिक्षकमध्ये प्रकाशित )                        

                                      प्रा. प्रशांत दिवेकर.

                                     ज्ञान प्रबोधिनी, पुणे.



Comments

  1. एखादे उदाहरण दिले तर जास्ती स्पष्टता येईल. जोडी परीक्षा किंवा अधिक वेळची परीक्षा असेही करण्याचा उपयोग होऊ शकतो.

    ReplyDelete
  2. प्रशांतजी, सध्याच्या म्हणण्यापेक्षा गेल्या काही वर्षापासूनच्या वास्तवावर नेमके विश्लेषण मांडले आहे.
    परंतु सह पुस्तक परीक्षा आणि सह संदर्भ चाचण्या घेण्यासाठी शिक्षक तयार झाला पाहिजे तरच विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा तो करण्याच्या पद्धती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवू शकेल. मुळात आपण म्हणतात तसे मुलांना अभ्यास कसा करावा हे शिकवणे जास्त महत्वाचे आहे. परंतु अध्यापन मात्र पारंपारिक पद्धतीने होते आहे. अजून पालक व वरिष्ठांचा अध्यापणाकडे पाहण्याचा पारंपारिक दृष्टिकोन आहे, तो बदलणे गरजेचे वाटते. परंतु प्रथम शिक्षकांना सक्षम करणे आवश्यक वाटते.
    आपल्या माध्यमातून शिक्षकांचे उद्बोधन होत आहे. आपले मनापासून धन्यवाद...

    ReplyDelete
  3. ERC तर्फे जर या संदर्भात साहित्य शिक्षक विद्यार्थी यांचे साठी उपलब्ध झाल्यास ते निश्चित उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल, त्याने समस्त शिक्षकांना दिशा मिळेल असा विश्वास वाटतो.

    ReplyDelete
  4. पूर्वा देशमुख
    सर सध्याच्या वेळात या चाचण्यांची खरोखर आवश्यकता वाटते.

    ReplyDelete
  5. 👍👍👍🙏

    ReplyDelete
  6. प्रशांतजी, महत्वाचा विषय घेतला आहे. मध्यामात, समाजात, विद्यार्थ्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अन् खरोखर असाच समज निर्माण होत आहे की आता काहींचा समज असाच होतोय की आता ओपन बुक exam म्हणजे आता शिक्षणाचा बट्याबोळ होणार आहे. दुसऱ्या बाजूला परत प्रश्न कसे असावेत या संदर्भात शिक्षक सर्वात महत्वाचा घटक आहे तो प्रशिक्षित आहे का? तयार आहे का? अन्यथा त्याचे देखील आयते पुस्तके, गाईड्स, प्रश्नसंच त्यांची उत्तरे आयती मिळायला लागली तर व्यायावस्था कोलमडेल. नवीन शैक्षणिक धोरण अत्यंत चांगले दूरगामी परिणामी निर्माण करणारे आहे असे सर्वदूर ऐकायला मिळते. त्या संदर्भात जनजागृती होते देखील आहे. पण अमलबजावणी कशी होते हे जास्त महत्वाचे आहे. त्यावर systems निर्माण झाल्या पाहिजेत असे मला वाटते. आपण मांडलेल्या प्रत्येक घटकावर सविस्तर लेखाची अपेक्षा आहे. आपण ते चिंतन करून लिहिणार यात शंका नाही.

    ReplyDelete
  7. सह पुस्तक चाचणी, उत्तम उदाहरण. मात्र असेही काही विद्यार्थी आहेत की पुस्तकात पाहून परीक्षा द्यावयाची आहे म्हणजे 'वाचलं नाही तरी चालेल' हा विचार विद्यार्थ्यांच्या डोक्यातून कायमचा नाहीसा करण्यासाठी शिक्षकांना खूप मेहनत करावी लागेल.

    ReplyDelete
  8. पूजा पवार सर ह्या चाचण्यांची खरोखर आवश्यकता आहे कारण की विद्यार्थ्यांचा जर पाया पक्का झाला नाही तर विद्यार्थ्यांना शिक्षण करत असताना येणाऱ्या समस्या कशा सोडवता येतील उदाहरणार्थ वाचन करणे लेखन करणे त्यामुळे चाचण्या घेणे हे आवश्यकच आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Nation in Image: Symbols that Shape Nations

                                                          Symbols that Shape Nations This activity introduces students to how nations use visual symbols and personifications to express identity, unity, and political values. By examining global examples and comparing them with Abanindranath Tagore’s Bharat Mata, learners explore how imagery shapes nationalism and deepen their understanding of the Bharatiya concept of Rāṣṭra. Identify images and by using references complete the table   (Support Independent Learning, Comparison & analysis) 2.  Compare the above images with Abanindranath Tagore’s image of Bharat Mata. How does it reflect Indian values? (Analysis & synthesis) 3.  How does the practice of personifying nations—often through female figures—shape our understandin...

आ. कै. उषाताईंबद्दल .....

  आ. कै. उषाताईंबद्दल  लेखन : स्मरणिकेसाठी माझा आणि उषाताईंचा पहिला संबंध २००१ मध्ये   एका मुलाखतीच्या निमित्ताने आला. प्रबोधिनीतील कामाचे दुसरे-तिसरे वर्ष असेल ,   थोडे जास्तीचे मानधन मिळण्यासाठी   प्रज्ञा मानसमध्ये एका प्रकल्पात मी काम करावे अशा कल्पनेतून पोंक्षेसरांनी मला ती मुलाखत द्यायला सांगितली होती. गिरीशराव , उषाताई आणि एक-दोन तज्ज्ञ असे पॅनल होते. मुलाखतीनंतर काही दिवसांनी मला उषाताईंना भेटण्यास सांगण्यात आले. मग त्यांच्याबरोबर थोडी सविस्तर प्रश्नोत्तरे झाली. प्रश्नोत्तराच्या शेवटी त्यांनी सांगितले , " आता इथे काम करायचे असेल तर ट्रेक , सहली , शिबिरे यांना मनात आले की जाता येणार नाही. " त्यावेळी प्रशालेत   आणि इतर अनेक विभागांबरोबर माझे असे मजेचे उद्योग चालू होते. प्रज्ञा मानसच्या पाचव्या मजल्यावरून प्रशालेच्या तिसऱ्या मजल्यावर येईपर्यंत विचार केला आणि खाली आल्यावर पोंक्षेसरांना सांगितले निवड झाली असली तरी त्यांना नाही म्हणून कळवा. त्यानंतर उषाताईंचा संबंध आला तो थेट आठ-दहा वर्षांनी , त्यावेळी मी सोलापूर प्रबोधिनीत निवासी होतो आणि उषाताई सोलाप...

तंत्रज्ञानी नवे सहस्रक…

  तंत्रज्ञानी नवे सहस्रक … ज्ञान प्रबोधिनीत अनेक समूहगीते म्हणली जातात. त्यातील एका पद्याचे धृवपद आठवते. तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसे अध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे मानवाच्या समूह विकसनात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगीवर नियंत्रण, चाकाचा शोध, लोह खनिजाचा वापर असे या प्रवासातील महत्त्वाचे ठळक टप्पे नोंदवता येतील. या सहस्रकातील गेल्या चार शतकांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा झपाट्याने विकसित झाल्या आहेत. मानवी समाजाच्या शैक्षणिक रचनांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण हा गाभाघटक बनला आहे.   स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून   विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना   तंत्रज्ञानाच्या अभ्यास शाखांची तोंडओळख व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या ज्ञान शाखांची निवड करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्यानुभव,   टेक्निकलसारखे विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आले. आजच्या गरजा ...