Skip to main content

सर्वधर्मस्थळ : एकात्मतेसाठीचा सहचार

सर्वधर्मस्थळ : एकात्मतेसाठीचा सहचार

२००२ मध्ये दहावी-बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनींना घेऊन अरुणाचल प्रदेश अभ्यासदौऱ्याला गेलो होतो. गुवाहाटीला पोचल्यावर चार गटात विभाजित होऊन अरुणाचलाच्या वेगवेगळ्या भागातील जनजीवनाचा परिचय करून घेण्यासाठी प्रवास योजले होते. एक गट तेजू-वॉलॉंग भागात, दुसरा गट रोइंग परिसरात, तिसरा गट जीरो परिसरात तर चौथा गट तवांग परिसरात गेला होता. आमचा गट तवांग भागातील मोन्पा जनजाती वसलेल्या गावांमध्ये गेला होता. १९६२च्या भारत-चीन युद्धाच्या संदर्भात तवांग परिसर हे महत्त्वाचे युद्धस्थळ आहे. तवांगकडे प्रवास करताना वाटेत जसवंतगढसारखी अनेक युद्धस्मारके लागतात. १९६२च्या भारत-चीन युद्धात शहीद झालेल्या जवानांचे एक मोठे युद्धस्मारक तवांग येथे आहे. एक दिवस संध्याकाळी हे युद्धस्मारक पाहण्यासाठी गेलो होतो. दुसऱ्या दिवशी बुमला खिंडीला भेट द्यायची होती. भारत-चीन सीमेवरील हे महत्त्वाचे ठिकाण असल्याने याठिकाणी जाण्यासाठी परवाना काढावा लागतो. मुलींना स्मारकस्थळी सोडून, युद्ध स्मारकासमोरच सैन्याच्या कार्यालयात परवान्याबद्दल पूर्तता करण्यासाठी गेलो. बऱ्याच वेळाने दुसऱ्या दिवशी लेखी परवानगी देता येणार नाही पण वाटेत अडवत नाहीत तोपर्यंत जेवढे जाता येईल तेवढे जाऊनया त्या दिशेने - असे तोंडी आश्वासन/ परवानगी घेऊन परत आलो. अंधार पडला होता आणि यात बराच वेळ गेला होता पण तोपर्यंत मुलींच्या पद्यगायनाने त्यांची जवानांशी मैत्री झाली होती आणि त्यांनी दुसऱ्या दिवशीच्या प्रवासासाठी जवानांकडून भेट म्हणून मिल्क कॅन, बिस्किटांची रसददेखील मिळवली होती.

दुसऱ्या दिवशी प्रवासाला सुरुवात केली. वाटेत दोन ठिकाणी चौकशी झाली पण तोंडी परवानगी सांगत पुढेपुढे जात राहिलो. शेवटी एका  कॅम्पच्या इथे अडवले व लेखी परवाना असेल तर पुढे जाता येईल, असे कोणतेही अर्ग्युमेंट चालणार नाही अशा आवाजाने प्रवास स्थगित झाला. एवढे लांब आलाच आहात तर थोडावेळ परिसरात थांबायची सवलत दिली एवढेच. चालत थोडे अंतर पुढे जाऊन आलो पण एवढ्या उंचीवर चालायला पुरेसे कष्ट पडत आहेत हे जाणवल्यावर परत आलो. चेक पोस्टवरील जवानांकडून कळले की येथून पुढे मोठ्या पोस्ट नाहीत. जवानांच्या तुकड्या काही काळ पुढील चौक्यांवर राहून परत या कॅम्पवर येतात. बर्फाच्या काळात तर परिस्थिती अजून अवघड असते. कॅम्प पाहायची परवानगी पण नाकारण्यात आली. साधारण तासाभराने आम्ही तेथे आहोत हे पाहून एक जवान परत आमची चौकशी करू लागला. आम्ही कोठून आलो, कायकाय पाहिले याबद्दल मुलींबरोबर बरीच प्रश्नोत्तरे झाली. जरा ओळख झाल्यावर आम्ही पुढे जाता येत नाही किमान कॅम्प तरी बघायला मिळायला हवा होता अशी नाराजी त्यांच्याजवळ व्यक्त केली. थोडा विचार करून ते म्हणाले कॅम्प नाही दाखवता येणार, पण कॅम्पमधील एक गोष्ट मी नक्की दाखवू शकेन. थांबा थोडावेळ, असे सांगून ते परवानगी काढण्यासाठी गेले. ते परत आल्यावर कळले की ते कॅम्पमधील मंदिराचे पुजारी होते. ते आम्हाला त्यांच्याबरोबर मंदिरात घेऊन गेले. मंदिरात प्रवेश केल्यावर वेगळेच दृश्य दिसले. एकाच छताखाली मंदिर, मशीद, गुरूद्वारा, चर्च रांगेत विसावले होते. दर्शन घेतल्यावर पुजारीबाबांनी सर्वधर्मस्थळाची संकल्पना समजावून सांगितली. मग आम्ही त्याठिकाणी सर्वधर्म प्रार्थना म्हटल्यावर पुजारीबाबा खुशच झाले. मंदिराबाहेरच्या मोकळ्या जागेत येऊन सर्वधर्म प्रार्थनेबद्दल गप्पा चालू होत्या, त्यांना ती प्रार्थना लिहून हवी होती. त्यामुळे लिखाणाचे काम एकाबाजूला सुरू होते.  तेवढ्या दोन ट्रकमधून पन्नासएक जवान आले आणि तीनच्या रांगांमध्ये उभे राहिले. कॅम्पचे सैन्य अधिकारी  त्यांचे रिपोर्टिंग घेत होते. खुश असलेल्या पुजारीबाबांना म्हणालो, साहेबांना विचारा मुली जवानांसमोर प्रार्थना आणि काही देशभक्तीपर गाण्याचा कार्यक्रम सादर करू शकतील का? त्यांनी परवानगी मिळवून आणलीच. मग काय! पुढचा तासभर दोन्ही बाजूंनी आमच्याकडून आणि जवानांकडून  गाण्यांचे उस्फूर्त सादरीकरण  झाले. दारात काही वेळासाठी उभे राहण्यासाठी काहीवेळ परवानगी  न मिळालेले आम्ही सर्वधर्मप्रार्थनेच्या किल्लीने सुमारे दोन तास त्या कॅम्पवर होतो आणि नुसती पोटपूजा न करता शंकरपाळी, बिस्किटांची नवीन रसद भरून बाहेर पडलो. ही रसद पुढे आम्हाला गुवाहाटीपर्यंत पुरली.

विविधतेने नटलेल्या भारताचे प्रतिबिंबच भारतीय सेनेत दिसून येते. या विविधतेतील एकत्व प्रकट होण्याकरता भारतीय सेनादलाने सर्वधर्मसमभाव आचारात आणण्यासाठी जी प्रतीके स्वीकारली आणि जाणीवपूर्वक जोपासली, यापैकी  एक प्रमुख दृश्य प्रतीक म्हणजे सर्वधर्मस्थळ. सैन्य निधर्मी करण्याऐवजी सैनिकांचे मनोबल टिकवणारा एक महत्त्वाचा घटक म्हणून धर्माचा विचार करून सैन्यात सर्वधर्मसमभाव आचरला जातो. आम्ही पाहिले तसे प्रार्थना-मंदिर प्रत्येक कॅम्पवर असते. मोठ्या कॅम्पवर मंदिर, मशीद, चर्च, गुरूद्वारा स्वतंत्र असले तरी एकाच आवारात असतात व त्याला सर्वधर्मस्थळच म्हटले जाते. अशी एकता सैन्यामध्ये येण्यासाठी धर्मगुरूंना प्रशिक्षण देण्यासाठी इन्स्टीट्युट ऑफ नॅशनल इंटिग्रेशन या प्रशिक्षण केंद्राची स्थापना पुणे येथे करण्यात आली. या संस्थेत रिलिजिअस टिचर अर्थात असे धार्मिक शिक्षण घेतलेले सैनिक तयार केले जातात. पंडित, ग्रंथी, मौलवी, प्रिस्ट आणि मॉन्क असे सर्वधर्माचे प्रतिनिधी या ठिकाणी प्रशिक्षण घेतात. सर्वांनाच प्रत्येक धर्माच्या मूलभूत संकल्पना, धार्मिक विधींचे प्रशिक्षण दिले जाते. याच बरोबर मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, समुपदेशन यांचाही अभ्यासक्रमात समावेश केला आहे. आपत्कालीन परिस्थितीत हे शिक्षक कोणत्याही धर्माच्या पद्धतीने, श्रद्धांचा आदर करत अंत्यसंस्कारदेखील करू शकतात. सैनिकांचे मनोबल आणि मानसिक स्वास्थ्य टिकवण्यात यांचा मोठा वाटा आहे आणि अर्थातच सर्वधर्मस्थळाची रचना ही भारतीय सैन्यासाठी  महत्त्वाची रचना आहे.

प्रांतिक, भाषिक, धार्मिक, जातीय, वांशिक अशी सर्व प्रकारची विविधता असलेल्या भारतीय समाजाचे एकात्मरूप विकसित करण्यासाठी आणि एक राष्ट्रीयत्वाची भावना विकसित करण्यासाठी भारतीय सैन्यादलांमध्ये हा सहचार कसा जोपासला जातो याबद्दलची मांडणी करणारे कॅ. रघु रामन यांचे एक टेडेक्स व्याख्यान डायव्हर्सिटी : इज न्यू नॅशनॅलिटी ऐकण्यासारखे आहे.  या व्याख्यानाची लिंक पुढे देत आहे.

Diversity : is New Nationality

भारताची राष्ट्रीय एकता ही या विविधतेचा स्वीकार करून देशाला एकत्वाकडे नेण्यासाठीच्या भारतातील नव्या आचारांवर अवलंबून आहे. अनेक शतकांपूर्वी हिंदू धर्मातील उपास्यांचा आपापसातील भेद विसर्जित करून प्रत्येकाची श्रद्धा स्वीकारत दुसऱ्याच्या श्रद्धेचा स्वीकार करायला शिकवण्याचा आचार आणि रचना म्हणून आद्य शंकराचार्यांनी 'पंचायतन' ही संकल्पना मांडली. पंचायतन मंदिर  म्हणजे पाच देवतांचा समूह. विभिन्न उपास्य देवतांना मानीत असलेल्या उपासकांमधील सहचार वाढवण्यासाठी आद्य शंकराचार्यांनी जाणीवपूर्वक पंचायतन पूजेची सुरुवात केली. पंचायतनपद्धतीनुसार विष्णू पंचायतनात विष्णूला मुख्यस्थान देऊन मंदिरसमूहात शिव, गणपती, सूर्य, देवी यांची मंदिरे असतात. याप्रमाणे गणेश पंचायतन , शिव पंचायतन असतात. पंचायतन संकल्पनेने माणसांच्या श्रद्धा जपल्या गेल्या आणि सांप्रदायिक द्वेष-भेद कमी झाला.

आज स्वतंत्र भारताला राष्ट्रीय एकतेसाठी  नव्या पंचायतनाची आवशकता आहे. स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना पन्नास वर्षांसाठी एक उद्दिष्ट दिले होते, ‘ भारतमाता एकच दैवत येत्या दिवसांचे....’  तवांगच्या सर्वधर्मस्थळाला भेट दिल्यावर एक गोष्ट कळलीभारतीय सैन्यदलाचे एकच दैवत आहे - भारतमाताआणि तिच्या सेवेसाठी समर्पित सैनिकांच्या श्रद्धांच्या जोपासनेसाठी आहे सर्वधर्मस्थळ’. आज राष्ट्रीय एकतेसाठी गरज आहे भारतमातेला केंद्रस्थानी ठेवून तिच्याभोवती भारतीयांमधील भारतीयत्त्वाच्या जोपासनेसाठी  सैन्यदलातील सर्वधर्मस्थळासारख्या  आधुनिक पंचायतनाची.

                                                             प्रशांत दिवेकर

ज्ञान प्रबोधिनी, पुणे 

सर्वधर्म प्रार्थना


ओम तत्सत् श्री नारायण तू पुरुषोत्तम गुरु तू।

सिद्ध बुद्ध तू  स्कंद विनायक सविता पावक तू।

ब्रह्म मज्द तू यह्व शक्ति तू येशू पिता प्रभु तू।

रुद्र विष्णु तू रामकृष्ण तू रहिम ताओ तू।

वासुदेव गौ-विश्वरूप तू चिदानंद हरि तू।

अद्वितीय तू अकाल निर्भय आत्मलिंग शिव तू।

 




Comments

  1. अतिशय छान माहिती.धन्यवाद!🙏

    ReplyDelete
  2. अरुणाचल दौरा पुन्हा आठवला 👌👌👌

    ReplyDelete
  3. आज राष्ट्रीय एकतेसाठी गरज आहे भारतमातेला केंद्रस्थानी ठेवून तिच्याभोवती भारतीयांमधील भारतीयत्त्वाच्या जोपासनेसाठी सैन्यदलातील सर्वधर्मस्थळासारख्या आधुनिक पंचायतनाची. खूपच आवश्यक आहे.

    ReplyDelete
  4. खूप छान. वेगळी माहिती समजली.

    ReplyDelete
  5. भारत माता की जय। वंदे मातरम।
    🌾🌷🚩🇮🇳🙏🏻🇮🇳🚩🌷🌾

    ReplyDelete
  6. Very nice information!! Thanks ..🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  7. राष्ट्रीय एकात्मता या लेखांमधून खुपच चांगल्या पद्धतीने मांडलीआहे.

    ReplyDelete
  8. पूर्वा देशमुख
    खूप छान सर.आपले विद्यार्थी खरोखर वेगळे अनुभव शिक्षण घेतात.आपली पद्य व प्रार्थना नेहमी समोरच्यांना भावतात.अरुणाचल
    अनुभवणं राहिलेय सर........

    ReplyDelete
  9. भारतीय सैन्यदलाचे एकच दैवत ,"भारतमाता"🙏🙏व सैनिकांच्या श्रध्देच्या जोपासनेसाठी ," सर्वधर्म स्थळ "🙏🙏आपले पंतप्धान मोदीजी त्यांच्या प्रत्येक भाषणानंतर सांगतात की मेरे साथ जोरसे , पुरी ताकदसे बोलो , "भारतमाताकी जय "🙏🙏
    खूपच छान , वेगळी माहिती तुमच्या आभ्यासदौऱ्याच्या अनुभवलेखनातून कळली प्रशांतदादा 🙏धन्यवाद 🙏

    ReplyDelete
  10. सर्व अभ्यासदौरा जशाचा तसा आठवला. वर्गातल्या अभ्यासापेक्षा या उपक्रमांनी आम्हाला जास्त शिकायला मिळाल :)

    ReplyDelete
  11. खुप छान सर🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Nation in Image: Symbols that Shape Nations

                                                          Symbols that Shape Nations This activity introduces students to how nations use visual symbols and personifications to express identity, unity, and political values. By examining global examples and comparing them with Abanindranath Tagore’s Bharat Mata, learners explore how imagery shapes nationalism and deepen their understanding of the Bharatiya concept of Rāṣṭra. Identify images and by using references complete the table   (Support Independent Learning, Comparison & analysis) 2.  Compare the above images with Abanindranath Tagore’s image of Bharat Mata. How does it reflect Indian values? (Analysis & synthesis) 3.  How does the practice of personifying nations—often through female figures—shape our understandin...

आ. कै. उषाताईंबद्दल .....

  आ. कै. उषाताईंबद्दल  लेखन : स्मरणिकेसाठी माझा आणि उषाताईंचा पहिला संबंध २००१ मध्ये   एका मुलाखतीच्या निमित्ताने आला. प्रबोधिनीतील कामाचे दुसरे-तिसरे वर्ष असेल ,   थोडे जास्तीचे मानधन मिळण्यासाठी   प्रज्ञा मानसमध्ये एका प्रकल्पात मी काम करावे अशा कल्पनेतून पोंक्षेसरांनी मला ती मुलाखत द्यायला सांगितली होती. गिरीशराव , उषाताई आणि एक-दोन तज्ज्ञ असे पॅनल होते. मुलाखतीनंतर काही दिवसांनी मला उषाताईंना भेटण्यास सांगण्यात आले. मग त्यांच्याबरोबर थोडी सविस्तर प्रश्नोत्तरे झाली. प्रश्नोत्तराच्या शेवटी त्यांनी सांगितले , " आता इथे काम करायचे असेल तर ट्रेक , सहली , शिबिरे यांना मनात आले की जाता येणार नाही. " त्यावेळी प्रशालेत   आणि इतर अनेक विभागांबरोबर माझे असे मजेचे उद्योग चालू होते. प्रज्ञा मानसच्या पाचव्या मजल्यावरून प्रशालेच्या तिसऱ्या मजल्यावर येईपर्यंत विचार केला आणि खाली आल्यावर पोंक्षेसरांना सांगितले निवड झाली असली तरी त्यांना नाही म्हणून कळवा. त्यानंतर उषाताईंचा संबंध आला तो थेट आठ-दहा वर्षांनी , त्यावेळी मी सोलापूर प्रबोधिनीत निवासी होतो आणि उषाताई सोलाप...

तंत्रज्ञानी नवे सहस्रक…

  तंत्रज्ञानी नवे सहस्रक … ज्ञान प्रबोधिनीत अनेक समूहगीते म्हणली जातात. त्यातील एका पद्याचे धृवपद आठवते. तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसे अध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे मानवाच्या समूह विकसनात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगीवर नियंत्रण, चाकाचा शोध, लोह खनिजाचा वापर असे या प्रवासातील महत्त्वाचे ठळक टप्पे नोंदवता येतील. या सहस्रकातील गेल्या चार शतकांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा झपाट्याने विकसित झाल्या आहेत. मानवी समाजाच्या शैक्षणिक रचनांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण हा गाभाघटक बनला आहे.   स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून   विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना   तंत्रज्ञानाच्या अभ्यास शाखांची तोंडओळख व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या ज्ञान शाखांची निवड करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्यानुभव,   टेक्निकलसारखे विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आले. आजच्या गरजा ...