Skip to main content

द हिलिंग नाईफ !

 

द हिलिंग नाईफ !

सतरा वर्षांचा जॉर्ज, व्हाइट रशियन नौदलामध्ये लेफ्टनंट पदावर अधिकारी होता.  बोल्शेविक सेनेच्या एका गटाविरुद्ध  उघडलेल्या आघाडीवर  त्याला पाठवले जाते. किनारपट्टीवर उतरल्यावर त्याच्या तुकडीला बोल्शेविक खंदकावर हल्ला करण्याचा आदेश मिळतो. जॉर्ज त्याच्या तुकडीचे नेतृत्व करत खंदकावर घमासान हल्ला चढवतो. तुफान गोळाबारी सुरू होते. खंदकात उतरून संगिनी आणि तलवारींचा खणखणाट सुरू होतो. जखमी सैनिकांना मागे तळावर पाठवून त्यांची जागा नवे सैनिक घेत असतात. लढत असताना जॉर्जच्या एका मित्राला गोळी लागते. गोळी लागलेली दिसताच जॉर्ज त्याच्या जागी कुमक पाठवून,  मित्राला सुश्रुषेसाठी मागे तळावर पाठवतो.

         संध्याकाळनंतर लढाईचा जोर ओसरतो. दोन्ही बाजू योग्य अंतर राखत माघार घेत आपापले मोर्चे पक्के करतात. रात्री तळाकडे परत आल्यावर जॉर्ज जखमी सैनिकांची चौकशी करत मशाली आणि शेकोट्यांच्या उजेडात  तात्पुरत्या उभारलेल्या उपचार केंद्रात आपल्या मित्राला शोधून काढतो. मित्र बराच जखमी होऊन ग्लानीत गेलेला असतो. तळावरील परिचारिकेकडे जॉर्ज त्याच्या तब्येतीची चौकशी करतो.  परिचारिका सांगते त्याच्या बरगडीत गोळी घुसली आहे आणि ती त्याच्या फुफ्फुसाला इजा करते आहे. इथे तळावर शल्यविशारद (सर्जन) नसल्याने  गोळी काढणे शक्य नाही. त्यामुळे तो काही तासांचाच सोबती आहे.

         जॉर्ज बरच वेळ विचार करतो. गोळी काढली गेली नाही तर मित्र वाचणे शक्य नाही; तर या आपत्कालीन परिस्थितीत आपणच का शस्त्रक्रिया करू नये? परिचारिकेच्या मदतीने आपला कॉम्बॅट नाईफ शेकोटीत लालेलाल तापवून जॉर्ज ती गोळी काढतो.

शस्त्रक्रिया केल्यावर जॉर्ज सैनिकतळावर बसलेला असतो. त्याच्या मनात विचार येतो आजपर्यंत या सुऱ्याने आपण अनेकांना जखमी केले; अनेकांचे प्राण घेतले, आज पहिल्यांदाच कोणाचा तरी जीव वाचवला.

          सकाळपर्यंत मित्राची परिस्थिती सुधारते आणि तो मृत्युच्या दाढेतून बाहेर येतो. मित्राला बरा झालेलं बघितल्यावर जॉर्ज त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय घेतो; आजपर्यंत आपण सुरा वापरायचे आपले कौशल्य लोकांचे प्राण घेण्यासाठी वापरले, आता ते लोकांना आयुष्य देण्यासाठी वापरायचे.

पुस्तकाच्या  पुढचा भाग एक सैनिक एक शल्यविशारद कसा होतो याची विलक्षण कथा म्हणजे द हिलिंग नाईफ, मला आवडलेल्या पुस्तकांपैकी हे एक पुस्तक.               

सुरा तोच!  पण काहीजण  हत्येसाठी वापरतात, तर काहीजण देशबांधवांच्या संरक्षणासाठी वापरतात, तर काहीजण प्राण वाचवण्यासाठी !!

एका सैनिकाला त्याच्या शस्त्रसंग्रहातील सुरा आपण लोकांना मारण्याऐवजी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी वापरू शकतो या विचाराचे अवचित झालेले दर्शन या कथेत मनाला भावून जाते.

आपल्या मनात पण असे असंख्य विचार येतात पण ते विचार टिपण्याएवढे आपण सावध असतो का?

सावध असलो आणि विचार टिपता आला तरी त्याप्रमाणे कृती करण्याएवढे जॉर्जसारखे सावधपण आणि कृतिशील निश्चय आपल्यात असतो का ?

असाच विचार अवचितपणे अचानक एका तरुण वकिलाच्या आयुष्यात दक्षिण आफ्रिकेतील पीटरमेरीट्जबर्ग  रेल्वे स्थानकावर त्याला ढकलून दिल्यावर आला. तो विचार टिपण्याएवढा तो तरुण सावध होता आणि या सावधपणामुळे तो तरुण  महात्मा झाला.

असाच अवचितपणे एका तरुणासमोर एक महारोगी आला, त्या महारोग्याला पाहिल्यावर पहिल्यांदा प्रचंड किळस वाटली त्याला, पण त्या रोग्यापासून दूर न पळता 'मीच त्याला पाहिले पाहिजे' हा मनात आलेला विचार  टिपण्याएवढा तो तरुण सावध होता आणि या सावधपणामुळे तो तरुण  महासेवक झाला.

अशीच  एका तरुणाच्या मागे माकडांची टोळी लागली होती. माकडांच्या हल्ल्याने पळणाऱ्या तरुणाला पाहून एक साधू म्हणाला, "अरे! पळतोस काय ? मागे फिर आणि त्यांना सामोरे जा." त्यावेळी ; ओ साधूबाबा, तुमचे काय जाते सांगायला, संकट माझ्यावर ओढवले आहे, असा प्रतिसाद न देता  ‘परिस्थिती पासून दूर न पळता, परिस्थितीला सामोरे जा’ हा संदेश टिपण्याएवढा सावध असलेला हा युवक, या सावधपणामुळे ‘योद्धासंन्यासी’ झाला.

अंतर्मनात उमटलेले विचार- आतला आवाज टिपण्याएवढे सावधपण असेल तर 'किलिंग नाईफचा - हिलिंग नाईफ' होऊ शकतो. म्हणूच  समर्थ रामदासस्वामी  श्रीरामांकडे केलेल्या मागण्यात एक  मागणे मागतात, सावधपण मज देरे राम !

प्रशांत दिवेकर

ज्ञान प्रबोधिनी, पुणे



Comments

  1. खूप सुंदर लिहलतं सर. हे वाचून पुस्तक आता वाचायलाच हवे असं वाटतय. मागे आपण सुचवलेलं सप्त सरितांचा प्रदेश वाचतेय.

    ReplyDelete
  2. असे प्रसंग अनेकांचे आयुष्य बदलवून टाकते. कोणत्या वेळी कोणता प्रसंग माणसाला बदलवून टाकेल हे सांगता येत नाही. असं अनेक व्यक्ती बदलून आयुष्याचे ध्येय निश्चित करतात. मग तो वाल्याचा, वाल्मिकी झालेले देखील पाहिले. पण नेमके असे कोणत्या प्रसंगात माणूस बदलेल हे निश्चित करता येईल का? आणि काही व्यक्ती एखाद्या प्रसंगाने नकारात्मक देखील बनतात. एक गूढ वाटते सूक्ष्म विचार केल्यास.

    ReplyDelete
  3. प्रशांतजी आपले लिखाणातून नेहमी नव नवीन विषय कळतात. छान लिहिलंय.
    धन्यवाद...

    ReplyDelete
  4. फारच सुंदर ! हे पुस्तक आवर्जून वाचायला पाहिजे. आज पहिल्यांदाच या पुस्तकाबद्दल वाचलं. ब्लॉगची मांडणी पण छान !!

    ReplyDelete
  5. खूप सुंदर लिहिले आहेस....मनापासून आवडले

    ReplyDelete
  6. सर, खूप प्रेरणादायी लिखाण... पौंगडावस्थेतील आपल्या पाल्याला प्रत्येक पालकाने वाचायला लावावे असेच...आपल्या जवळ जी संसाधनं आहेत त्याचा विवेकपूर्ण वापर हेच मर्म मी आज माझ्या मुलांना सांगितले... धन्यवाद, सर

    ReplyDelete
  7. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी व्यक्ती, एखादा प्रसंग, एखादा विचार आयुष्य बदलवणारे ठरतात. ह्यालाच परिस स्पर्श म्हणतात वाटते

    ReplyDelete
  8. सुंदर प्रेरणादायी सुरुवात

    ReplyDelete
  9. सुंदर प्रेरणादायी सुरुवात

    ReplyDelete
  10. पुस्तक आवर्जून वाचलेच पाहिजे. खरच आहे अंतर्मनात उठलेला आवाज ऐकून स्वतः मध्ये बदल घडवला तर किलिंग नाईफ --हिलिंग नाईफ होऊ शकतो.
    खूप सुंदर लिखाण


    ReplyDelete
  11. खुप सुंदर... प्रेरणादायी

    ReplyDelete
  12. Chan lihilay aani sundar vichar kami shabdat pohachvlay. Thanku

    ReplyDelete
  13. Khupach sunder.
    Wishay mandani khup bhavli.
    Pustak wachaichi utsukta watte.....

    ReplyDelete
  14. प्रशांत.. खूप मस्त लिहिलय!!

    ReplyDelete
  15. खूप छान! प्रशांत

    ReplyDelete
  16. Woww!! Khupach Bharii lihilay

    ReplyDelete
  17. अतिशय सुंदर लिखाण. आपल्या विचारांची चिंतनाची शिदोरी आपण सर्वांसाठी खुली करून आपण जो मोठेपणा दाखवतात त्यास नमन.🙏🏻

    ReplyDelete
  18. खुप छान वाटले वाचुन आपण हि प्रयत्न केले तर जीवनात काही तरी बदल घडवू शकतो.एखादी प्रसंग आणि व्यक्ती आपल्या आयुष्यात नक्कीच बदल घडवु शकतात.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बौद्धिक विकसनासाठी वाचन

  बौद्धिक विकसनासाठी वाचन ‘वाचन कर’ असे सुचवल्यावर काहीजणांना आनंद होतो तर अनेकजणांच्या कपाळावर आठ्या उमटतात. का वाचायचे ! कसे वाचायचे ! कशासाठी वाचायचे ! वाचताना काय करायचे ! वाचून झाल्यावर काय करायचे ! वाचून काय होणारें !!     असे अनेक प्रश्न , प्रतिक्रिया अनेकांच्या मनात डोकावत असतात. त्याची उत्तरे शोधण्याचा जो प्रयत्न करतो त्याला ‘वाचन कर’ सुचवल्यावर आनंद होण्याची शक्यता जास्त असते. वाचकाचा   पहिला सामना होतो तो वाचनाच्या तंत्राशी. अक्षरे, जोडाक्षरे , विरामचिन्हे अशा सांकेतिक लिपीतील चिन्हांशी मैत्री करत वाचक अर्थापर्यंत म्हणजेच शब्दापर्यंत येऊन   पोचतो आणि इथे खरे वाचन सुरू होते. अनेक वाचक या सांकेतिक चित्रांच्या जंजाळातच गुरफटतात. चिन्हांशी मैत्री झाली की अर्थाच्या खोलात डुबी मारण्यासाठी वाचक,   शब्द आणि शब्दांच्या अर्थछटा,   समानार्थी, विरुद्धअर्थी शब्द, वाक्प्रचार, वाक्य अशा टप्प्यात प्रवेश करतो. वाक्याला समजून घेत परिच्छेद, निबंध अशा शब्दसमूहात वाचक प्रवेश करतो. शब्दाच्या, वाक्याच्या अर्थछटा समजून घेत पूर्वज्ञानाशी सांगड घालत आपल्...

From Pages to Naturalists' Insights

                                            From Pages to Naturalists' Insights                                               Learning while Reading:                                                    Cry of the Kalahari I am a voracious reader, always eager to explore different genres of literature across various domains of knowledge. As a Maharashtrian and initially a Marathi medium student, I preferred reading in Marathi but gradually transitioned to reading books in English. Before pursuing natural science for my graduation, I was introduced to the lives and works of naturalists through books like Ashi Manasa Ashi Sahas, Chitre An...

Talk on Indian Knowledge Systems in Curriculum @ Samvit Sangam

  Talk on Indian Knowledge Systems in Curriculum @ Samvit Sangam Namaste to all. I feel honoured to speak on Indian Knowledge Systems in Education at Samvit Sangam , organized by Samvit Research Foundation. I had the privilege to represent Jnana Prabodhini and speak at Samvit Sangam — a one-day symposium on the integration of Indian Knowledge Systems (IKS) in school education. I’ll keep to the time and share a few key points and practices from Jnana Prabodhini, so we can stay on track with the schedule. In the inaugural session, Anuragji raised important questions regarding the term Indian Knowledge System —its acronym IKS, and whether we ought to replace it with Bhartiya Gyan Parampara . For clarity, I will continue to refer to it as IKS-Parampara . The distinction between “ Indian Knowledge System ” and “Bhartiya Gyan Parampara” is significant. The English term “system” invokes several dimensions: What is the foundation of this system? What are the sources of its knowl...