Skip to main content

द हिलिंग नाईफ !

 

द हिलिंग नाईफ !

सतरा वर्षांचा जॉर्ज, व्हाइट रशियन नौदलामध्ये लेफ्टनंट पदावर अधिकारी होता.  बोल्शेविक सेनेच्या एका गटाविरुद्ध  उघडलेल्या आघाडीवर  त्याला पाठवले जाते. किनारपट्टीवर उतरल्यावर त्याच्या तुकडीला बोल्शेविक खंदकावर हल्ला करण्याचा आदेश मिळतो. जॉर्ज त्याच्या तुकडीचे नेतृत्व करत खंदकावर घमासान हल्ला चढवतो. तुफान गोळाबारी सुरू होते. खंदकात उतरून संगिनी आणि तलवारींचा खणखणाट सुरू होतो. जखमी सैनिकांना मागे तळावर पाठवून त्यांची जागा नवे सैनिक घेत असतात. लढत असताना जॉर्जच्या एका मित्राला गोळी लागते. गोळी लागलेली दिसताच जॉर्ज त्याच्या जागी कुमक पाठवून,  मित्राला सुश्रुषेसाठी मागे तळावर पाठवतो.

         संध्याकाळनंतर लढाईचा जोर ओसरतो. दोन्ही बाजू योग्य अंतर राखत माघार घेत आपापले मोर्चे पक्के करतात. रात्री तळाकडे परत आल्यावर जॉर्ज जखमी सैनिकांची चौकशी करत मशाली आणि शेकोट्यांच्या उजेडात  तात्पुरत्या उभारलेल्या उपचार केंद्रात आपल्या मित्राला शोधून काढतो. मित्र बराच जखमी होऊन ग्लानीत गेलेला असतो. तळावरील परिचारिकेकडे जॉर्ज त्याच्या तब्येतीची चौकशी करतो.  परिचारिका सांगते त्याच्या बरगडीत गोळी घुसली आहे आणि ती त्याच्या फुफ्फुसाला इजा करते आहे. इथे तळावर शल्यविशारद (सर्जन) नसल्याने  गोळी काढणे शक्य नाही. त्यामुळे तो काही तासांचाच सोबती आहे.

         जॉर्ज बरच वेळ विचार करतो. गोळी काढली गेली नाही तर मित्र वाचणे शक्य नाही; तर या आपत्कालीन परिस्थितीत आपणच का शस्त्रक्रिया करू नये? परिचारिकेच्या मदतीने आपला कॉम्बॅट नाईफ शेकोटीत लालेलाल तापवून जॉर्ज ती गोळी काढतो.

शस्त्रक्रिया केल्यावर जॉर्ज सैनिकतळावर बसलेला असतो. त्याच्या मनात विचार येतो आजपर्यंत या सुऱ्याने आपण अनेकांना जखमी केले; अनेकांचे प्राण घेतले, आज पहिल्यांदाच कोणाचा तरी जीव वाचवला.

          सकाळपर्यंत मित्राची परिस्थिती सुधारते आणि तो मृत्युच्या दाढेतून बाहेर येतो. मित्राला बरा झालेलं बघितल्यावर जॉर्ज त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय घेतो; आजपर्यंत आपण सुरा वापरायचे आपले कौशल्य लोकांचे प्राण घेण्यासाठी वापरले, आता ते लोकांना आयुष्य देण्यासाठी वापरायचे.

पुस्तकाच्या  पुढचा भाग एक सैनिक एक शल्यविशारद कसा होतो याची विलक्षण कथा म्हणजे द हिलिंग नाईफ, मला आवडलेल्या पुस्तकांपैकी हे एक पुस्तक.               

सुरा तोच!  पण काहीजण  हत्येसाठी वापरतात, तर काहीजण देशबांधवांच्या संरक्षणासाठी वापरतात, तर काहीजण प्राण वाचवण्यासाठी !!

एका सैनिकाला त्याच्या शस्त्रसंग्रहातील सुरा आपण लोकांना मारण्याऐवजी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी वापरू शकतो या विचाराचे अवचित झालेले दर्शन या कथेत मनाला भावून जाते.

आपल्या मनात पण असे असंख्य विचार येतात पण ते विचार टिपण्याएवढे आपण सावध असतो का?

सावध असलो आणि विचार टिपता आला तरी त्याप्रमाणे कृती करण्याएवढे जॉर्जसारखे सावधपण आणि कृतिशील निश्चय आपल्यात असतो का ?

असाच विचार अवचितपणे अचानक एका तरुण वकिलाच्या आयुष्यात दक्षिण आफ्रिकेतील पीटरमेरीट्जबर्ग  रेल्वे स्थानकावर त्याला ढकलून दिल्यावर आला. तो विचार टिपण्याएवढा तो तरुण सावध होता आणि या सावधपणामुळे तो तरुण  महात्मा झाला.

असाच अवचितपणे एका तरुणासमोर एक महारोगी आला, त्या महारोग्याला पाहिल्यावर पहिल्यांदा प्रचंड किळस वाटली त्याला, पण त्या रोग्यापासून दूर न पळता 'मीच त्याला पाहिले पाहिजे' हा मनात आलेला विचार  टिपण्याएवढा तो तरुण सावध होता आणि या सावधपणामुळे तो तरुण  महासेवक झाला.

अशीच  एका तरुणाच्या मागे माकडांची टोळी लागली होती. माकडांच्या हल्ल्याने पळणाऱ्या तरुणाला पाहून एक साधू म्हणाला, "अरे! पळतोस काय ? मागे फिर आणि त्यांना सामोरे जा." त्यावेळी ; ओ साधूबाबा, तुमचे काय जाते सांगायला, संकट माझ्यावर ओढवले आहे, असा प्रतिसाद न देता  ‘परिस्थिती पासून दूर न पळता, परिस्थितीला सामोरे जा’ हा संदेश टिपण्याएवढा सावध असलेला हा युवक, या सावधपणामुळे ‘योद्धासंन्यासी’ झाला.

अंतर्मनात उमटलेले विचार- आतला आवाज टिपण्याएवढे सावधपण असेल तर 'किलिंग नाईफचा - हिलिंग नाईफ' होऊ शकतो. म्हणूच  समर्थ रामदासस्वामी  श्रीरामांकडे केलेल्या मागण्यात एक  मागणे मागतात, सावधपण मज देरे राम !

प्रशांत दिवेकर

ज्ञान प्रबोधिनी, पुणे



Comments

  1. खूप सुंदर लिहलतं सर. हे वाचून पुस्तक आता वाचायलाच हवे असं वाटतय. मागे आपण सुचवलेलं सप्त सरितांचा प्रदेश वाचतेय.

    ReplyDelete
  2. असे प्रसंग अनेकांचे आयुष्य बदलवून टाकते. कोणत्या वेळी कोणता प्रसंग माणसाला बदलवून टाकेल हे सांगता येत नाही. असं अनेक व्यक्ती बदलून आयुष्याचे ध्येय निश्चित करतात. मग तो वाल्याचा, वाल्मिकी झालेले देखील पाहिले. पण नेमके असे कोणत्या प्रसंगात माणूस बदलेल हे निश्चित करता येईल का? आणि काही व्यक्ती एखाद्या प्रसंगाने नकारात्मक देखील बनतात. एक गूढ वाटते सूक्ष्म विचार केल्यास.

    ReplyDelete
  3. प्रशांतजी आपले लिखाणातून नेहमी नव नवीन विषय कळतात. छान लिहिलंय.
    धन्यवाद...

    ReplyDelete
  4. फारच सुंदर ! हे पुस्तक आवर्जून वाचायला पाहिजे. आज पहिल्यांदाच या पुस्तकाबद्दल वाचलं. ब्लॉगची मांडणी पण छान !!

    ReplyDelete
  5. खूप सुंदर लिहिले आहेस....मनापासून आवडले

    ReplyDelete
  6. सर, खूप प्रेरणादायी लिखाण... पौंगडावस्थेतील आपल्या पाल्याला प्रत्येक पालकाने वाचायला लावावे असेच...आपल्या जवळ जी संसाधनं आहेत त्याचा विवेकपूर्ण वापर हेच मर्म मी आज माझ्या मुलांना सांगितले... धन्यवाद, सर

    ReplyDelete
  7. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी व्यक्ती, एखादा प्रसंग, एखादा विचार आयुष्य बदलवणारे ठरतात. ह्यालाच परिस स्पर्श म्हणतात वाटते

    ReplyDelete
  8. सुंदर प्रेरणादायी सुरुवात

    ReplyDelete
  9. सुंदर प्रेरणादायी सुरुवात

    ReplyDelete
  10. पुस्तक आवर्जून वाचलेच पाहिजे. खरच आहे अंतर्मनात उठलेला आवाज ऐकून स्वतः मध्ये बदल घडवला तर किलिंग नाईफ --हिलिंग नाईफ होऊ शकतो.
    खूप सुंदर लिखाण


    ReplyDelete
  11. खुप सुंदर... प्रेरणादायी

    ReplyDelete
  12. Chan lihilay aani sundar vichar kami shabdat pohachvlay. Thanku

    ReplyDelete
  13. Khupach sunder.
    Wishay mandani khup bhavli.
    Pustak wachaichi utsukta watte.....

    ReplyDelete
  14. प्रशांत.. खूप मस्त लिहिलय!!

    ReplyDelete
  15. खूप छान! प्रशांत

    ReplyDelete
  16. Woww!! Khupach Bharii lihilay

    ReplyDelete
  17. अतिशय सुंदर लिखाण. आपल्या विचारांची चिंतनाची शिदोरी आपण सर्वांसाठी खुली करून आपण जो मोठेपणा दाखवतात त्यास नमन.🙏🏻

    ReplyDelete
  18. खुप छान वाटले वाचुन आपण हि प्रयत्न केले तर जीवनात काही तरी बदल घडवू शकतो.एखादी प्रसंग आणि व्यक्ती आपल्या आयुष्यात नक्कीच बदल घडवु शकतात.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आ. कै. उषाताईंबद्दल .....

  आ. कै. उषाताईंबद्दल  लेखन : स्मरणिकेसाठी माझा आणि उषाताईंचा पहिला संबंध २००१ मध्ये   एका मुलाखतीच्या निमित्ताने आला. प्रबोधिनीतील कामाचे दुसरे-तिसरे वर्ष असेल ,   थोडे जास्तीचे मानधन मिळण्यासाठी   प्रज्ञा मानसमध्ये एका प्रकल्पात मी काम करावे अशा कल्पनेतून पोंक्षेसरांनी मला ती मुलाखत द्यायला सांगितली होती. गिरीशराव , उषाताई आणि एक-दोन तज्ज्ञ असे पॅनल होते. मुलाखतीनंतर काही दिवसांनी मला उषाताईंना भेटण्यास सांगण्यात आले. मग त्यांच्याबरोबर थोडी सविस्तर प्रश्नोत्तरे झाली. प्रश्नोत्तराच्या शेवटी त्यांनी सांगितले , " आता इथे काम करायचे असेल तर ट्रेक , सहली , शिबिरे यांना मनात आले की जाता येणार नाही. " त्यावेळी प्रशालेत   आणि इतर अनेक विभागांबरोबर माझे असे मजेचे उद्योग चालू होते. प्रज्ञा मानसच्या पाचव्या मजल्यावरून प्रशालेच्या तिसऱ्या मजल्यावर येईपर्यंत विचार केला आणि खाली आल्यावर पोंक्षेसरांना सांगितले निवड झाली असली तरी त्यांना नाही म्हणून कळवा. त्यानंतर उषाताईंचा संबंध आला तो थेट आठ-दहा वर्षांनी , त्यावेळी मी सोलापूर प्रबोधिनीत निवासी होतो आणि उषाताई सोलाप...

Nation in Image: Symbols that Shape Nations

                                                          Symbols that Shape Nations This activity introduces students to how nations use visual symbols and personifications to express identity, unity, and political values. By examining global examples and comparing them with Abanindranath Tagore’s Bharat Mata, learners explore how imagery shapes nationalism and deepen their understanding of the Bharatiya concept of Rāṣṭra. Identify images and by using references complete the table   (Support Independent Learning, Comparison & analysis) 2.  Compare the above images with Abanindranath Tagore’s image of Bharat Mata. How does it reflect Indian values? (Analysis & synthesis) 3.  How does the practice of personifying nations—often through female figures—shape our understandin...

तंत्रज्ञानी नवे सहस्रक…

  तंत्रज्ञानी नवे सहस्रक … ज्ञान प्रबोधिनीत अनेक समूहगीते म्हणली जातात. त्यातील एका पद्याचे धृवपद आठवते. तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसे अध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे मानवाच्या समूह विकसनात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगीवर नियंत्रण, चाकाचा शोध, लोह खनिजाचा वापर असे या प्रवासातील महत्त्वाचे ठळक टप्पे नोंदवता येतील. या सहस्रकातील गेल्या चार शतकांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा झपाट्याने विकसित झाल्या आहेत. मानवी समाजाच्या शैक्षणिक रचनांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण हा गाभाघटक बनला आहे.   स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून   विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना   तंत्रज्ञानाच्या अभ्यास शाखांची तोंडओळख व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या ज्ञान शाखांची निवड करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्यानुभव,   टेक्निकलसारखे विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आले. आजच्या गरजा ...