Skip to main content

इतिहास शिकता-शिकवताना ......भाग ३ : इतिहासातील भूगोल

 इतिहासातील भूगोल 

महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला जशी चौथीत शिवाजी महाराजांची ओळख होते, तशीच शिवचरित्राची ओळख खरंतर मलाही झाली. त्याचवर्षी वाईच्या गंगापुरी घाटावर कृष्णामाईच्या उत्सवात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची कथामाला ऐकायला मिळाली.  काय ऐकले ते आज आठवत नाही, पण घाटावरील लोकांची गर्दी, एक फळा आणि फळ्याशेजारी पांढऱ्या कपड्यातील दाढीवाल्या माणसाने काहीतरी भारी सांगितलं होतं एवढंच आठवतयं. पुढे पाचवी - सहावीत राजा शिवछत्रपती आणि श्रीमानयोगी ही दोन भारावून टाकणारी पुस्तके हातात पडली.

त्या तीन वर्षांत एक प्रश्न  मनात घोळत असलेला आठवतो. तो म्हणजे, राजगडावरून प्रतापगडाला जाताना वाटेत शिरवळ, वाई यासारखी आदिलशाही ठाणी असताना आणि वाईत खासा अफजलखान असताना त्याने महाराजांना रस्त्यातच का पकडलं नाही


कारण राजगडाहून  प्रतापगडला जायचे असेल तर नसरापूरला हायवेला लागायचे, मग शिरवळ-खंबाटकी घाट, जोशी विहीर, वाई, पाचगणी, महाबळेश्वर आणि प्रतापगड हा रस्ता पक्का डोक्यात होता.  आणखी एखादा  वेगळा रस्ता असू शकेल, हे गावीच नव्हते. पुढे कधीतरी नकाशा बघितल्यावर खरा उलगडा झाला. 

इतिहास अभ्यासताना 

स्थान आणि वेळ, स्थान आणि घटना, क्षेत्र आणि कालखंड 

या तीन जोड्यांचा विचार करून अर्थ लावता यावा लागतो.

यासाठी शैक्षणिक उपक्रम संशोधिकेद्वारा आयोजित ज्ञानवर्धन सादरीकरण व्याख्यानमालेत इतिहासातील भूगोलया विषयाची स्वतंत्र ओळख विद्यार्थ्यांना ओळख करून दिली जाते. आपण आपल्या शाळांमध्ये गणेशोत्सव, शारदोत्सव, क्रांती सप्ताहाच्या काळात इतिहासाच्या पाठक्रमातील आशयाला पूरक अशी विषयाची व्याप्ती विद्यार्थांसमोर मांडली जाईल अशा सत्रांची योजना करू शकू.  

हा अर्थ शोधण्यासाठी इतिहास अभ्यासकाने कायम स्वतःला दोन प्रश्न विचारावेत.

पहिला प्रश्न घटना कुठे घडली? आणि तिथेच का घडली ?

आणि

दुसरा प्रश्न घटना कधी घडली? आणि तेव्हाच का घडली?

मानवी संस्कृतीच्या विकासात स्थानमहात्म्य महत्त्वाचे आहे. एखाद्या भौगोलिक क्षेत्रातील भूआवरण आणि पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियेतून जमीन, माती तयार होते. त्यावर वनस्पती आणि प्राण्यांचे प्रकार अवलंबून असतात. त्यावर मानवाची उपजीविका कशी असणार हे निश्चित होते. त्यामुळे नदीच्या खोऱ्यातील मानवी जीवन, आचार आणि स्वभाव पर्वतरांगातील लोकांपेक्षा वेगळे असतात. नदीच्या खोऱ्यातील स्थिर ग्रामसंस्कृती, बंदरांजवळची व्यापारीसंस्कृती विकसित होण्यात त्यांचे ‘स्थान’ महत्त्वाचे आहे.

 मध्यपूर्वेतून भारतावर झालेल्या आक्रमणांनी भारतीय इतिहासाचा मोठा कालखंड व्यापला आहे.  हा इतिहास समजून घ्यायचा असेल तर या  टोळ्यांचे उष्ण वाळवंटी क्षेत्रातील (ग्रेट एरिड झोनमधील)  स्थान, त्यामुळे त्यांचे भटके पशुपालक जीवन समजून घेतले पाहिजे. स्थलांतराचा इतिहास हा मानवी भूगोलाचा इतिहास आहे. ग्रेट ब्रिटन आणि युरोपातील देश यांचा इतिहास समजून घेताना ते देश दर्यावर्दी असण्यात त्यांचे 'स्थानमहात्म्य' महत्त्वाची भूमिका बजावते.

उत्तर अटलांटिक समुद्रातील वाऱ्याची दिशा, सागरी प्रवाह समजून घेतल्याखेरीज ख्रिस्तोफर कोलंबसच्या  प्रवासाचा नीट उलगडा होत नाही.

आपण भारतीयांनी आपले जीवन मौसमी पावसाशी एवढे बांधून घेतले आहे, की आपल्या इतिहासात सैनिकी मोहिमा पावसाळा अर्थात शेतीची कामे संपल्यावर सुरू व्हायच्या. अर्थात पावसाळ्यातील तुडुंब वाहणाऱ्या, पूर आलेल्या नद्या हा अजून एक भौगोलिक घटक इतिहास घडवण्याला मर्यादा आणत असल्याने लष्करी मोहिमा या काळात टाळल्या जात. पौरसापासून पानिपतापर्यंतचा इतिहास, नदी- तिला आलेले पूर, तिचा उतार या भौगोलिक वैशिष्ट्यांच्या आकलनाशी निगडीत आहेत. 

इतिहासाचा अभ्यास करताना मानवी समाजावर पाणी, मृदा, हवामान, ऋतू यांसारख्या  भौतिक घटकांचा असलेला प्रभाव विचारता घेतला तरच  नागरीकरण, सभ्यता, वसाहतवाद आणि स्थलांतर यासारख्या ऐतिहासिक प्रक्रियांचे नीट आकलन होईल. नाहीतर ही इतिहासाची अभ्यासक्षेत्रे तारीख आणि घटना या दोन घटकांपुरती मर्यादित होतील. 'इतिहास म्हणजे मनुष्य, स्थान आणि पर्यावरण यांच्या बदलत्या संबंधांतून घडलेल्या घटनांचा अभ्यास' ; जसे मसाल्याच्या पदार्थांचे भौगोलिक स्थान हे त्याच्याशी निगडीत घटनांचे मूळ आहे. पर्यावरणातील खनिज तेलाच्या शोधाचा परिणाम म्हणजे गेल्या शंभर वर्षांचा इतिहास आहे. सामाजिक इतिहास, आर्थिक इतिहास आणि सांस्कृतिक इतिहास भौगोलिक घटकांशी घट्ट बांधलेले  आहेत.

भूगोलाने मानवी संस्कृती विकसित होण्याची दिशा जशी निश्चित केली,

त्याबरोबरच ऐतिहासिक कथानायकांनी देखील

घटना कुठे आणि तेथेच का याचा विचार केल्याने इतिहास घडला.

एक फार प्रसिद्ध नसलेलं उदाहरण अलीकडे वाचनात आले. दुसऱ्या महायुद्धात जपानने अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी बलूनबॉम्ब तयार करून सोडले होते. दोन खंडांच्या मधून वाहणाऱ्या 'जेट स्ट्रीम' वाऱ्यांच्या प्रवाहावर हे फुगे तरंगत- तरंगत अमेरिकेत पोहोचतील अशी योजना होती ; पण यातील काहीच फुगे पोचू  शकले आणि ते पकडले गेल्याने अपेक्षित नुकसान झाले नाही.


उंबरखिंडीतील कारतलबखानाबरोबरच्या लढाईचा अभ्यास करताना ऐतिहासिक संदर्भामधील  लढाईचे वर्णन वाचताना शिवाजी महाराजांचे घोड्यावर बसलेले, अंगावर पोलादी चिलखत घातलेले बहारदार वर्णन वाचायला मिळते

खानाचा वकील महाराजांकडे येण्यास झाडाझुडुपांतून वाट काढीत निघाला. लांबूनच त्याला घोड्यावर बसलेली महाराजांची अतिभव्य, अतिसुंदर अन् अतितेजस्वी मर्दानी मूर्ती दिसली.

 महाराजांनी अंगांत पोलादी चिलखत घातलें होतें व मस्तकावर पोलादी शिरस्त्राण घातले होते. मानेवर जाळीदार झालर रुळत होती. मनगटावर, छातीवर, पाठीवर व कमरेवर पोलादाच्या अत्यंत सुबक नक्षीच्या पोलादी पट्ट्या चिलखतांतच गुंफिलेल्या होत्या. पायांतल्या पांढऱ्या सुरवारीवर ते किंचित अंजिरी झाक असलेले चिलखत अन् शिरस्त्राण महाराजांस फारच शोभून दिसत होतें. त्यांनी कमरेवर पल्लेदार तरवार लटकावली होती. पाठीवर विशाल ढाल बांधली होती. कानात मोत्यांचे चौकडे हलत होते. भव्य कपाळ, गरुडासारखे घवघवीत नाक, चढणीदार भिवया, अत्यंत पाणीदार डोळे, काळीभोर अन् खुलून दिसणारी दाढी आणि मुखावर किंचित् स्मित-!’ (राजा शिवछत्रपती- मूळ संदर्भ  शिवभारत)

पण ज्या ठिकाणी युद्ध घडले, जी जागा त्यांनी युद्धासाठी निवडली तिचे वर्णन  'उंबरखिंडीखाली तुफान अरण्य होते. वाट अरुंद,नागमोडी होती. महाराजांच्या मदतीला संह्याद्री सदैव महारुद्रासारखा उभा होता.'  उंबरखिंडीचे एवढे त्रोटक वर्णन वाचायला मिळते. खरंतर उंबरखिंडीच्या  लढाईचे विशेष वेगळेपण  जोपर्यंत  उंबरखिंडीचा नकाशा आपण पाहत नाही तोपर्यंत कळत नाही.  तीच  जागा महाराजांनी का निवडली? ते नकाशा पहिल्याशिवाय  कळत नाही.  त्या पखालीसारख्या दोन बाजूंनी तोंड बंद करता येईल अशा युद्धस्थानाच्या निश्चितीने  विषम सैनिकी बळात महाराजांचा विजय कसा निश्चित केला ते नकाशा पाहिल्यावर लक्षात येते .

त्यामुळे इतिहास अध्ययनात नकाशाचे वाचन आणि अध्यापनात नकाशाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. आज तंत्रज्ञानाच्या साहाय्याने  नकाशावर सैनिकी हालचाली दाखवून लढाईच्या शाब्दिक वर्णनाच्या पुढे जावून इतिहास अधिक दृश्यमान करता येईल.


                                                        (  उंबरखिंडीतील लढाई व्हिडिओ ) 
                                                       

इतिहासातील अशा  घटना, प्रसंग समजून घ्यायचे असतील, तर प्रतिकृती तयार करणे हा एक वेगळा अध्ययन अनुभव आहे. 

काही वर्षांपूर्वी  ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्रात इतिहासप्रेमी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली पानिपतच्या लढाईची त्रिमितीय प्रतिकृती तयार केली होती. पानिपतच्या लढाईतील पराक्रमाची  गाथा कथा रूपात ऐकताना जे कल्पनाचित्र मनासमोर उभे राहिले होते, त्यापेक्षा सुस्पष्ट कल्पनाचित्र ती प्रतिकृती पाहत, कथा ऐकताना मनासमोर उभे राहिले.

     ( ज्ञान प्रबोधिनी, निगडी येथील पानिपत लढाई प्रतिकृती प्रदर्शन छायाचित्रे )

गेली सुमारे दहा वर्षे तरी न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागमधील मोहन शेटेसर दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग घेत अशा इतिहासातील लढायांच्या प्रतिकृती तयार करून घेत आहेत. दरवर्षी मी या प्रदर्शनास भेट दिली आहे व सरांशी आणि मुलांशी या अनुभवावर गप्पा मारल्या आहेत. खरंच, पुस्तकातील छापील वर्णन, भौगोलिक प्रतिकृतीवर ऐतिहासिक घटनांची मालिका दाखवत जिवंत करणे हा विशेष शैक्षणिक अनुभव आहे. आज प्रत्यक्ष प्रतिकृतीबरोबर संगणकावर वेगवेगळी अनिमेशन टूल्स वापरून तयार केलेली 'ग्राफिक्स' इतिहास अध्यापनाचे उत्तम शैक्षणिक साधन आहे.

इतिहास अध्यापकाने घटना आणि कालखंड या इतिहासातील संकल्पना स्थान आणि क्षेत्र या भूगोलातील संकल्पनांशी कशा अविभाज्यपणे जोडलेल्या आहेत हे उलगडून बघण्याची सवय लावली तर इतिहास अभ्यासक अभ्यासासाठी अधिक सक्षम बनेल.

इतिहास हा मानवी अनुभवांचे संचित असला,

तरी मानवी अनुभव ज्या ठिकाणी घडतात ते क्षेत्र भौगोलिक आहे.

त्यामुळे भूगोल हा केवळ इतिहातील नाटकाचा रंगमंच नाही,

तर ते नाटक घडवणारा सूत्रधार आहे.

प्रशांत दिवेकर

ज्ञान प्रबोधिनी,पुणे

टीप : 

१. इतिहास आणि भूगोल यांचे नाते सांगणाऱ्या अनेक घटना आहेत.  ब्लॉग वाचताना आपल्याला आठवलेली उदाहरणे जरूर कॉमेंटमध्ये शेअर करावीत. 

२. कृपया ब्लॉग शेअर करताना ब्लॉगची लिंक अग्रेषित करावी म्हणजे वाचक त्यांचे प्रतिसाद थेट लेखकापर्यंत पोचवू शकतील. 

Comments

  1. चपखल शीर्षक. थोरले बाजीराव पेशवे यांची निजामसोबतची 'पालखेड' ची लढाई सुद्धा अभ्यासण्याजोगी आहे.

    ReplyDelete
  2. एकूणातच लढायांचा इतिहास समजून घेणे मनोरंजक असते, आधुनिक तंत्रज्ञानाची जोस दिल्याने ते सुस्पष्ट होण्यास मदत होते.व्हिडीओची कल्पना छान

    ReplyDelete
  3. मला वर्गात एका मुलाने प्रश्न विचारला होता की इस्तानबुल मधून यायचा रस्ता बंद झाला तर युरोपीय व्यापारी जमिनीवरच दुसरा मार्ग शोधून भारतात का आले नाहीत? सागरी मार्ग शोधायची गरज का पडली? मग जगाचा physical map काढून इतिहास शिकवावा लागला.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Nation in Image: Symbols that Shape Nations

                                                          Symbols that Shape Nations This activity introduces students to how nations use visual symbols and personifications to express identity, unity, and political values. By examining global examples and comparing them with Abanindranath Tagore’s Bharat Mata, learners explore how imagery shapes nationalism and deepen their understanding of the Bharatiya concept of Rāṣṭra. Identify images and by using references complete the table   (Support Independent Learning, Comparison & analysis) 2.  Compare the above images with Abanindranath Tagore’s image of Bharat Mata. How does it reflect Indian values? (Analysis & synthesis) 3.  How does the practice of personifying nations—often through female figures—shape our understandin...

आ. कै. उषाताईंबद्दल .....

  आ. कै. उषाताईंबद्दल  लेखन : स्मरणिकेसाठी माझा आणि उषाताईंचा पहिला संबंध २००१ मध्ये   एका मुलाखतीच्या निमित्ताने आला. प्रबोधिनीतील कामाचे दुसरे-तिसरे वर्ष असेल ,   थोडे जास्तीचे मानधन मिळण्यासाठी   प्रज्ञा मानसमध्ये एका प्रकल्पात मी काम करावे अशा कल्पनेतून पोंक्षेसरांनी मला ती मुलाखत द्यायला सांगितली होती. गिरीशराव , उषाताई आणि एक-दोन तज्ज्ञ असे पॅनल होते. मुलाखतीनंतर काही दिवसांनी मला उषाताईंना भेटण्यास सांगण्यात आले. मग त्यांच्याबरोबर थोडी सविस्तर प्रश्नोत्तरे झाली. प्रश्नोत्तराच्या शेवटी त्यांनी सांगितले , " आता इथे काम करायचे असेल तर ट्रेक , सहली , शिबिरे यांना मनात आले की जाता येणार नाही. " त्यावेळी प्रशालेत   आणि इतर अनेक विभागांबरोबर माझे असे मजेचे उद्योग चालू होते. प्रज्ञा मानसच्या पाचव्या मजल्यावरून प्रशालेच्या तिसऱ्या मजल्यावर येईपर्यंत विचार केला आणि खाली आल्यावर पोंक्षेसरांना सांगितले निवड झाली असली तरी त्यांना नाही म्हणून कळवा. त्यानंतर उषाताईंचा संबंध आला तो थेट आठ-दहा वर्षांनी , त्यावेळी मी सोलापूर प्रबोधिनीत निवासी होतो आणि उषाताई सोलाप...

तंत्रज्ञानी नवे सहस्रक…

  तंत्रज्ञानी नवे सहस्रक … ज्ञान प्रबोधिनीत अनेक समूहगीते म्हणली जातात. त्यातील एका पद्याचे धृवपद आठवते. तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसे अध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे मानवाच्या समूह विकसनात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगीवर नियंत्रण, चाकाचा शोध, लोह खनिजाचा वापर असे या प्रवासातील महत्त्वाचे ठळक टप्पे नोंदवता येतील. या सहस्रकातील गेल्या चार शतकांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा झपाट्याने विकसित झाल्या आहेत. मानवी समाजाच्या शैक्षणिक रचनांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण हा गाभाघटक बनला आहे.   स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून   विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना   तंत्रज्ञानाच्या अभ्यास शाखांची तोंडओळख व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या ज्ञान शाखांची निवड करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्यानुभव,   टेक्निकलसारखे विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आले. आजच्या गरजा ...