Skip to main content

शिक्षक दिन : आवाहन

 आज ५ सप्टेंबर ' शिक्षक दिन ' आपल्या  शिक्षक भूमिकेचे आवलोकन करण्याचा दिवस. ज्यांच्याकडे पाहत आपण शिक्षक म्हणून काम करण्यास शिकलो त्या कै. आ. विवेकराव पोंक्षे सरांचे  ‘प्र’शिक्षक मासिकातील  संपादकीयमधून संकलित केलेले शिक्षकांसाठीचे आवाहन आपणाबरोबर या ब्लॉगमध्ये  शेअर करत आहे. 

 आवाहन

सस्नेह नमस्कार, 

        गेली अनेक वर्षे तुम्ही-आम्ही शिकवण्याचं व्रत वगैरे घेऊन काम करतो आहोत. देशाच्या भावी शिल्पकारांना घडवायचा प्रयत्न करतो आहोत. विश्‍वास वाटावा अशी परिस्थिती चहुबाजूला दिसत नसताना समाज-जीवनात निर्माण झालेल्या अनेक प्रश्‍नांना एक व्यक्ती म्हणून आणि शिक्षक म्हणूनही तोंड द्यायचा प्रयत्न करतो आहोत. पण खरे तर हेही आपल्याला जाणवलं आहे की यातल्या बर्‍याच प्रश्‍नांचे मूळ बर्‍याचदा त्या 25 फूट × 25 फूट आकाराच्या वर्ग नावाच्या खोलीतच आहे. त्या खोलीत शिकवत असतानाच आपल्याला अनेक प्रश्‍न पडत असतात. ते प्रश्‍न सोडविण्याची धडपडही आपण करत असतो. या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी काही फार मोठ्या शिक्षणतज्ञांची गरज नसते. गरज असते ती आपल्या सारख्या धडपड करणार्‍या समानधर्मी सुहृदांची.

    तुमच्या सारख्या प्रयोगशील, धडपड्या अध्यापकांच्या दृष्टीने समोरचा तो वर्ग म्हणजे मनुष्यघडणीच्या प्रयोगांची जिवंत प्रयोगशाळा असते. वर्गात शिकवत असताना, मुलामुलींतल्या सुप्त क्षमता फुलवताना, त्यांच्यात प्रेरणा जागवताना अध्यापकांजवळ असायला लागते ती शास्त्रज्ञांची चिकाटी आणि सर्जनशील कलावंतांची प्रतिभा. ती आपल्याजवळ असते. पण मध्येच कधीतरी बदलत्या परिस्थितीचं वादळ येतं आणि आपलीच पणती विझते की काय अशी शंका मनात यायला लागते. उत्साह कमी व्हायला लागतो आणि पाटीबहाद्दरांत तर आपण जमा होत नाही ना असं वाटायला लागतं. मला माहिती आहे ही अवस्था क्षणिक असते. पुन्हा जोमानं नव्या परिस्थितीत, नव्या मनांना आपल्याजवळचं धन भरभरून द्यायला आपण सज्ज होतो. अशा शिक्षकांचे कौतुक आहे.

    वर्गातल्या वाढत्या संख्येपासून ते मार्काच्या जीवघेण्या स्पर्धेपर्यंत अनेक प्रश्‍न ‘आ’वासून आपल्यासमोर उभे आहेत. या सार्‍यांमुळे शिक्षण प्रक्रियेचा मूळ अर्थच हरवून जातो आहे, असे वाटायला लागले आहे. या बदलत्या परिस्थितीला नेमका व योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता शिक्षकांच्यात यायला हवी. विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे, त्यांचा परिपूर्ण विकास व्हावा यासाठी अध्यापक म्हणून आम्हाला जे जे करायला लागेल ते ते करण्याचे आमचे कर्तव्य आहे आणि म्हणूनच तो आमचा अधिकार आहे अशी भावना मनात असली पाहिजे. मग त्या उर्मीतून आम्हाला आवश्यक अशा अनेक छोट्या मोठ्या कृती सुचायला लागतील. विद्यार्थ्यांविषयी तीव्र प्रेम मनात असलं की वेळेच्या बंधनापलिकडे जाऊन अगदी ग्रामीण परिसरातील शाळेतही बरंच काही रूजवता येतं.

    ‘प्र’शिक्षक या शिक्षकांसाठीच्या मासिकाच्या जन्माच्या वेणा सुरू असतानाच एक प्रतिक्रिया उमटली होती. “अहो, आज सारा समाजच पोटार्थी झाला आहे! तर शिक्षक एकटे काय करणार? शिक्षकांकडून काहीसुद्धा घडणार नाही!” त्यावेळी ती प्रतिक्रिया कानाआड करताना मनात म्हटलं होतं की सेतूबंधनातला खारीचा वाटा तरी आम्ही उचलणार की नाही? आज त्यावर विचार करताना पुन्हा असे वाटते आहे की खारीच्या वाट्याने काय होणार आहे? ही फारच छोटी आकांक्षा झाली. आमचा वाटा तर हनुमंताचा असला पाहिजे. आज गरज आहे ती दीपस्तंभ होण्याची नव्हे तर प्रत्यक्ष आदित्य नारायण होण्याची, की ज्याच्या प्रकाशात सारे समाजजीवन उजळून निघेल.

    त्यासाठी अध्यापक अधिकाधिक संवेदनशील आणि समृद्ध व्हायला हवेत. धडपडणार्‍या शिक्षकांच्यात संवाद वाढायला हवा. धडपडणार्‍या शिक्षकांच कुटुंब विस्तारत जायला हवं, तरच शिक्षणाचं शिक्षणपण आपण टिकवून ठेवू शकू. आपण केलेले प्रयत्न एकमेकांना कळवायला हवेत. दुसर्‍यांनी केलेल्या प्रयोगांत आपल्याला आपल्या प्रश्‍नांची उत्तरे सापडतील.

    गेल्याच आठवड्यात एका विद्यार्थी-शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. उघड्या माळावर. तोरणा किल्ल्याच्या कुशीत, राहुट्यांमधील वस्ती आणि दिवसभर अनौपचारिक शिक्षण होईल असा भरगच्च कार्यक्रम ही त्या शिबिराची काही वैशिष्ट्ये. पण त्या सार्‍यांत काही अद्भूत, दुर्मिळ असे पाहायला सापडले. त्या सार्‍या विद्यार्थीगटात मुलाहून मूल झालेले आणि तरीही अध्यापकत्वाची जबाबदारी सांभाळणारे शिक्षक दिसले. ते शिक्षक पहाटे मुलांसोबत काकडत्या थंडीत उठत होते. सकाळी त्यांच्याबरोबरीने धावत होते. मुलांना बरोबर भोजनाची व्यवस्था लावत होते. तंबूंची स्वच्छता ठेवत होते. दुपारी पाण्यात डुंबत होते. संध्याकाळी मैदानावर मुलांशी मस्तीही करत होते. हे सारे करत असताना कळत नकळत मुलांना शिकवत होते. मनात आले असे १० हजार शिक्षक आपल्या देशात उभे राहिले तर आपला देश नक्की विश्वाचे नेतृत्व करेल.

सस्नेह,

विवेक पोंक्षे


‘प्र’शिक्षक  संपादकीयमधून संकलित -वर्ष1 अंक1 (डिसें95/जाने.96) + प्र’शिक्षक-वर्ष1 अंक 2 (फेबु‘-मार्च 1996) + ‘प्र’शिक्षक वर्ष 2अंक 5 ऑगस्ट-सप्टेंबर1997

संकलन : मृण्मयी वैशंपायन

Comments

  1. पोंक्षे सरांना अपेक्षित शिक्षक जेव्हा प्रत्येक शाळेत तयार होईल तेव्हा मूल सज्ञान नाही तर सुजाण बनेल

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Nation in Image: Symbols that Shape Nations

                                                          Symbols that Shape Nations This activity introduces students to how nations use visual symbols and personifications to express identity, unity, and political values. By examining global examples and comparing them with Abanindranath Tagore’s Bharat Mata, learners explore how imagery shapes nationalism and deepen their understanding of the Bharatiya concept of Rāṣṭra. Identify images and by using references complete the table   (Support Independent Learning, Comparison & analysis) 2.  Compare the above images with Abanindranath Tagore’s image of Bharat Mata. How does it reflect Indian values? (Analysis & synthesis) 3.  How does the practice of personifying nations—often through female figures—shape our understandin...

आ. कै. उषाताईंबद्दल .....

  आ. कै. उषाताईंबद्दल  लेखन : स्मरणिकेसाठी माझा आणि उषाताईंचा पहिला संबंध २००१ मध्ये   एका मुलाखतीच्या निमित्ताने आला. प्रबोधिनीतील कामाचे दुसरे-तिसरे वर्ष असेल ,   थोडे जास्तीचे मानधन मिळण्यासाठी   प्रज्ञा मानसमध्ये एका प्रकल्पात मी काम करावे अशा कल्पनेतून पोंक्षेसरांनी मला ती मुलाखत द्यायला सांगितली होती. गिरीशराव , उषाताई आणि एक-दोन तज्ज्ञ असे पॅनल होते. मुलाखतीनंतर काही दिवसांनी मला उषाताईंना भेटण्यास सांगण्यात आले. मग त्यांच्याबरोबर थोडी सविस्तर प्रश्नोत्तरे झाली. प्रश्नोत्तराच्या शेवटी त्यांनी सांगितले , " आता इथे काम करायचे असेल तर ट्रेक , सहली , शिबिरे यांना मनात आले की जाता येणार नाही. " त्यावेळी प्रशालेत   आणि इतर अनेक विभागांबरोबर माझे असे मजेचे उद्योग चालू होते. प्रज्ञा मानसच्या पाचव्या मजल्यावरून प्रशालेच्या तिसऱ्या मजल्यावर येईपर्यंत विचार केला आणि खाली आल्यावर पोंक्षेसरांना सांगितले निवड झाली असली तरी त्यांना नाही म्हणून कळवा. त्यानंतर उषाताईंचा संबंध आला तो थेट आठ-दहा वर्षांनी , त्यावेळी मी सोलापूर प्रबोधिनीत निवासी होतो आणि उषाताई सोलाप...

तंत्रज्ञानी नवे सहस्रक…

  तंत्रज्ञानी नवे सहस्रक … ज्ञान प्रबोधिनीत अनेक समूहगीते म्हणली जातात. त्यातील एका पद्याचे धृवपद आठवते. तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसे अध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे मानवाच्या समूह विकसनात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगीवर नियंत्रण, चाकाचा शोध, लोह खनिजाचा वापर असे या प्रवासातील महत्त्वाचे ठळक टप्पे नोंदवता येतील. या सहस्रकातील गेल्या चार शतकांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा झपाट्याने विकसित झाल्या आहेत. मानवी समाजाच्या शैक्षणिक रचनांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण हा गाभाघटक बनला आहे.   स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून   विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना   तंत्रज्ञानाच्या अभ्यास शाखांची तोंडओळख व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या ज्ञान शाखांची निवड करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्यानुभव,   टेक्निकलसारखे विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आले. आजच्या गरजा ...