Skip to main content

शिक्षक दिन : आवाहन

 आज ५ सप्टेंबर ' शिक्षक दिन ' आपल्या  शिक्षक भूमिकेचे आवलोकन करण्याचा दिवस. ज्यांच्याकडे पाहत आपण शिक्षक म्हणून काम करण्यास शिकलो त्या कै. आ. विवेकराव पोंक्षे सरांचे  ‘प्र’शिक्षक मासिकातील  संपादकीयमधून संकलित केलेले शिक्षकांसाठीचे आवाहन आपणाबरोबर या ब्लॉगमध्ये  शेअर करत आहे. 

 आवाहन

सस्नेह नमस्कार, 

        गेली अनेक वर्षे तुम्ही-आम्ही शिकवण्याचं व्रत वगैरे घेऊन काम करतो आहोत. देशाच्या भावी शिल्पकारांना घडवायचा प्रयत्न करतो आहोत. विश्‍वास वाटावा अशी परिस्थिती चहुबाजूला दिसत नसताना समाज-जीवनात निर्माण झालेल्या अनेक प्रश्‍नांना एक व्यक्ती म्हणून आणि शिक्षक म्हणूनही तोंड द्यायचा प्रयत्न करतो आहोत. पण खरे तर हेही आपल्याला जाणवलं आहे की यातल्या बर्‍याच प्रश्‍नांचे मूळ बर्‍याचदा त्या 25 फूट × 25 फूट आकाराच्या वर्ग नावाच्या खोलीतच आहे. त्या खोलीत शिकवत असतानाच आपल्याला अनेक प्रश्‍न पडत असतात. ते प्रश्‍न सोडविण्याची धडपडही आपण करत असतो. या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी काही फार मोठ्या शिक्षणतज्ञांची गरज नसते. गरज असते ती आपल्या सारख्या धडपड करणार्‍या समानधर्मी सुहृदांची.

    तुमच्या सारख्या प्रयोगशील, धडपड्या अध्यापकांच्या दृष्टीने समोरचा तो वर्ग म्हणजे मनुष्यघडणीच्या प्रयोगांची जिवंत प्रयोगशाळा असते. वर्गात शिकवत असताना, मुलामुलींतल्या सुप्त क्षमता फुलवताना, त्यांच्यात प्रेरणा जागवताना अध्यापकांजवळ असायला लागते ती शास्त्रज्ञांची चिकाटी आणि सर्जनशील कलावंतांची प्रतिभा. ती आपल्याजवळ असते. पण मध्येच कधीतरी बदलत्या परिस्थितीचं वादळ येतं आणि आपलीच पणती विझते की काय अशी शंका मनात यायला लागते. उत्साह कमी व्हायला लागतो आणि पाटीबहाद्दरांत तर आपण जमा होत नाही ना असं वाटायला लागतं. मला माहिती आहे ही अवस्था क्षणिक असते. पुन्हा जोमानं नव्या परिस्थितीत, नव्या मनांना आपल्याजवळचं धन भरभरून द्यायला आपण सज्ज होतो. अशा शिक्षकांचे कौतुक आहे.

    वर्गातल्या वाढत्या संख्येपासून ते मार्काच्या जीवघेण्या स्पर्धेपर्यंत अनेक प्रश्‍न ‘आ’वासून आपल्यासमोर उभे आहेत. या सार्‍यांमुळे शिक्षण प्रक्रियेचा मूळ अर्थच हरवून जातो आहे, असे वाटायला लागले आहे. या बदलत्या परिस्थितीला नेमका व योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता शिक्षकांच्यात यायला हवी. विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे, त्यांचा परिपूर्ण विकास व्हावा यासाठी अध्यापक म्हणून आम्हाला जे जे करायला लागेल ते ते करण्याचे आमचे कर्तव्य आहे आणि म्हणूनच तो आमचा अधिकार आहे अशी भावना मनात असली पाहिजे. मग त्या उर्मीतून आम्हाला आवश्यक अशा अनेक छोट्या मोठ्या कृती सुचायला लागतील. विद्यार्थ्यांविषयी तीव्र प्रेम मनात असलं की वेळेच्या बंधनापलिकडे जाऊन अगदी ग्रामीण परिसरातील शाळेतही बरंच काही रूजवता येतं.

    ‘प्र’शिक्षक या शिक्षकांसाठीच्या मासिकाच्या जन्माच्या वेणा सुरू असतानाच एक प्रतिक्रिया उमटली होती. “अहो, आज सारा समाजच पोटार्थी झाला आहे! तर शिक्षक एकटे काय करणार? शिक्षकांकडून काहीसुद्धा घडणार नाही!” त्यावेळी ती प्रतिक्रिया कानाआड करताना मनात म्हटलं होतं की सेतूबंधनातला खारीचा वाटा तरी आम्ही उचलणार की नाही? आज त्यावर विचार करताना पुन्हा असे वाटते आहे की खारीच्या वाट्याने काय होणार आहे? ही फारच छोटी आकांक्षा झाली. आमचा वाटा तर हनुमंताचा असला पाहिजे. आज गरज आहे ती दीपस्तंभ होण्याची नव्हे तर प्रत्यक्ष आदित्य नारायण होण्याची, की ज्याच्या प्रकाशात सारे समाजजीवन उजळून निघेल.

    त्यासाठी अध्यापक अधिकाधिक संवेदनशील आणि समृद्ध व्हायला हवेत. धडपडणार्‍या शिक्षकांच्यात संवाद वाढायला हवा. धडपडणार्‍या शिक्षकांच कुटुंब विस्तारत जायला हवं, तरच शिक्षणाचं शिक्षणपण आपण टिकवून ठेवू शकू. आपण केलेले प्रयत्न एकमेकांना कळवायला हवेत. दुसर्‍यांनी केलेल्या प्रयोगांत आपल्याला आपल्या प्रश्‍नांची उत्तरे सापडतील.

    गेल्याच आठवड्यात एका विद्यार्थी-शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. उघड्या माळावर. तोरणा किल्ल्याच्या कुशीत, राहुट्यांमधील वस्ती आणि दिवसभर अनौपचारिक शिक्षण होईल असा भरगच्च कार्यक्रम ही त्या शिबिराची काही वैशिष्ट्ये. पण त्या सार्‍यांत काही अद्भूत, दुर्मिळ असे पाहायला सापडले. त्या सार्‍या विद्यार्थीगटात मुलाहून मूल झालेले आणि तरीही अध्यापकत्वाची जबाबदारी सांभाळणारे शिक्षक दिसले. ते शिक्षक पहाटे मुलांसोबत काकडत्या थंडीत उठत होते. सकाळी त्यांच्याबरोबरीने धावत होते. मुलांना बरोबर भोजनाची व्यवस्था लावत होते. तंबूंची स्वच्छता ठेवत होते. दुपारी पाण्यात डुंबत होते. संध्याकाळी मैदानावर मुलांशी मस्तीही करत होते. हे सारे करत असताना कळत नकळत मुलांना शिकवत होते. मनात आले असे १० हजार शिक्षक आपल्या देशात उभे राहिले तर आपला देश नक्की विश्वाचे नेतृत्व करेल.

सस्नेह,

विवेक पोंक्षे


‘प्र’शिक्षक  संपादकीयमधून संकलित -वर्ष1 अंक1 (डिसें95/जाने.96) + प्र’शिक्षक-वर्ष1 अंक 2 (फेबु‘-मार्च 1996) + ‘प्र’शिक्षक वर्ष 2अंक 5 ऑगस्ट-सप्टेंबर1997

संकलन : मृण्मयी वैशंपायन

Comments

  1. पोंक्षे सरांना अपेक्षित शिक्षक जेव्हा प्रत्येक शाळेत तयार होईल तेव्हा मूल सज्ञान नाही तर सुजाण बनेल

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती                       जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.     ...

सहपुस्तक चाचणी

  सहपुस्तक चाचणी                मार्च महिन्यात शालांत परीक्षा सुरु झाल्यावर वर्तमानपत्रे ; दूरचित्रवाणीवर दहावी , बारावीच्या परीक्षेत चालू असलेल्या कॉपी पुरवठ्याची छायाचित्रे , बातम्या , चित्रफिती दिसू लागतात. माध्यमात चर्चा सुरु होते आणि आपण कशासाठी शिकवतो ? असा प्रश्न पडतो. त्याला प्रतिसाद म्हणून कॉपी मुक्ती अभियान सुरु केले जाते आणि हळूहळू त्याचाच अभिमान वाटायला लागतो. परीक्षा कशासाठी... ? वर्गात शिक्षक पुस्तकातील पाठ वाचून दाखवतात , स्पष्टीकरण म्हणून वाक्य बोलीभाषेत रुपांतर करून मांडतात , पाठाचा सारांश सांगतात. परीक्षेत पाठाखालील सरावासाठी दिलेलेच प्रश्न विचारतात. पाठाखालच्या सरावातील प्रश्नच विचारायचे असतील तर परीक्षा कशासाठी... ?              माझे एक मित्र वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. गप्पा मारताना ते मला म्हणाले , ' अमुक सालानंतर डॉक्टर झालेल्यांकडून उपचार करून घेऊ नका. ' मी विचारले , का ? काय झाले ? म्हणाले - "त्यावर्षी मला पहिल्या...

सत्यं च स्वाध्यायप्रवचने च।

  सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। प्रकृति के सानिध्य में रहकर उसके साथ एकत्व का अनुभव करना , स्वाध्याय का प्रथम सूत्र है , जो हमें ब्रह्मांड के निर्माण और उसके रहस्यों को जानने की प्रेरणा देता है। जड़-चेतन धारणाओं से जुड़ी मूलकण , वंशसूत्र , गुणसूत्र जैसी सूक्ष्मतम चीज़ों के अध्ययन से लेकर ब्रह्मांड के विस्तार के अध्ययन तक का व्यापक आयाम हमें प्रकृति के गहनतम रहस्यों में प्रवेश करने का मार्ग प्रदान करता हैं। ब्रह्मांड के विशाल विस्तार और उसकी अनंतता को समझने का प्रयास करने के लिए पहला उपनिषदिक अध्ययन सूत्र है "ऋतं च स्वाध्याय प्रवचने च।" ऋतम् का अध्ययन ब्रह्मांड के नियमों और संरचनात्मक सिद्धांतों को समझने की कुंजी है। ऋतम् का अध्ययन   केवल दार्शनिक धारणा नहीं है , बल्कि यह ब्रह्मांड की रचना और उसके संचालन में निहित नियमों को   वैज्ञानिक दृष्टिकोणद्वारा गहराई से समझना है। यह हमें   सिखाता है कि ब्रह्मांड किस प्रकार संतुलित और सुव्यवस्थित रूप से कार्य करता है। ऋतम् का स्वाध्याय करते समय हम अपने परिवेश को गहराई से समझने लगते हैं। प्रकृति के रहस्यों की खोज और उन...