Skip to main content

शिक्षक दिन : आवाहन

 आज ५ सप्टेंबर ' शिक्षक दिन ' आपल्या  शिक्षक भूमिकेचे आवलोकन करण्याचा दिवस. ज्यांच्याकडे पाहत आपण शिक्षक म्हणून काम करण्यास शिकलो त्या कै. आ. विवेकराव पोंक्षे सरांचे  ‘प्र’शिक्षक मासिकातील  संपादकीयमधून संकलित केलेले शिक्षकांसाठीचे आवाहन आपणाबरोबर या ब्लॉगमध्ये  शेअर करत आहे. 

 आवाहन

सस्नेह नमस्कार, 

        गेली अनेक वर्षे तुम्ही-आम्ही शिकवण्याचं व्रत वगैरे घेऊन काम करतो आहोत. देशाच्या भावी शिल्पकारांना घडवायचा प्रयत्न करतो आहोत. विश्‍वास वाटावा अशी परिस्थिती चहुबाजूला दिसत नसताना समाज-जीवनात निर्माण झालेल्या अनेक प्रश्‍नांना एक व्यक्ती म्हणून आणि शिक्षक म्हणूनही तोंड द्यायचा प्रयत्न करतो आहोत. पण खरे तर हेही आपल्याला जाणवलं आहे की यातल्या बर्‍याच प्रश्‍नांचे मूळ बर्‍याचदा त्या 25 फूट × 25 फूट आकाराच्या वर्ग नावाच्या खोलीतच आहे. त्या खोलीत शिकवत असतानाच आपल्याला अनेक प्रश्‍न पडत असतात. ते प्रश्‍न सोडविण्याची धडपडही आपण करत असतो. या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी काही फार मोठ्या शिक्षणतज्ञांची गरज नसते. गरज असते ती आपल्या सारख्या धडपड करणार्‍या समानधर्मी सुहृदांची.

    तुमच्या सारख्या प्रयोगशील, धडपड्या अध्यापकांच्या दृष्टीने समोरचा तो वर्ग म्हणजे मनुष्यघडणीच्या प्रयोगांची जिवंत प्रयोगशाळा असते. वर्गात शिकवत असताना, मुलामुलींतल्या सुप्त क्षमता फुलवताना, त्यांच्यात प्रेरणा जागवताना अध्यापकांजवळ असायला लागते ती शास्त्रज्ञांची चिकाटी आणि सर्जनशील कलावंतांची प्रतिभा. ती आपल्याजवळ असते. पण मध्येच कधीतरी बदलत्या परिस्थितीचं वादळ येतं आणि आपलीच पणती विझते की काय अशी शंका मनात यायला लागते. उत्साह कमी व्हायला लागतो आणि पाटीबहाद्दरांत तर आपण जमा होत नाही ना असं वाटायला लागतं. मला माहिती आहे ही अवस्था क्षणिक असते. पुन्हा जोमानं नव्या परिस्थितीत, नव्या मनांना आपल्याजवळचं धन भरभरून द्यायला आपण सज्ज होतो. अशा शिक्षकांचे कौतुक आहे.

    वर्गातल्या वाढत्या संख्येपासून ते मार्काच्या जीवघेण्या स्पर्धेपर्यंत अनेक प्रश्‍न ‘आ’वासून आपल्यासमोर उभे आहेत. या सार्‍यांमुळे शिक्षण प्रक्रियेचा मूळ अर्थच हरवून जातो आहे, असे वाटायला लागले आहे. या बदलत्या परिस्थितीला नेमका व योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता शिक्षकांच्यात यायला हवी. विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे, त्यांचा परिपूर्ण विकास व्हावा यासाठी अध्यापक म्हणून आम्हाला जे जे करायला लागेल ते ते करण्याचे आमचे कर्तव्य आहे आणि म्हणूनच तो आमचा अधिकार आहे अशी भावना मनात असली पाहिजे. मग त्या उर्मीतून आम्हाला आवश्यक अशा अनेक छोट्या मोठ्या कृती सुचायला लागतील. विद्यार्थ्यांविषयी तीव्र प्रेम मनात असलं की वेळेच्या बंधनापलिकडे जाऊन अगदी ग्रामीण परिसरातील शाळेतही बरंच काही रूजवता येतं.

    ‘प्र’शिक्षक या शिक्षकांसाठीच्या मासिकाच्या जन्माच्या वेणा सुरू असतानाच एक प्रतिक्रिया उमटली होती. “अहो, आज सारा समाजच पोटार्थी झाला आहे! तर शिक्षक एकटे काय करणार? शिक्षकांकडून काहीसुद्धा घडणार नाही!” त्यावेळी ती प्रतिक्रिया कानाआड करताना मनात म्हटलं होतं की सेतूबंधनातला खारीचा वाटा तरी आम्ही उचलणार की नाही? आज त्यावर विचार करताना पुन्हा असे वाटते आहे की खारीच्या वाट्याने काय होणार आहे? ही फारच छोटी आकांक्षा झाली. आमचा वाटा तर हनुमंताचा असला पाहिजे. आज गरज आहे ती दीपस्तंभ होण्याची नव्हे तर प्रत्यक्ष आदित्य नारायण होण्याची, की ज्याच्या प्रकाशात सारे समाजजीवन उजळून निघेल.

    त्यासाठी अध्यापक अधिकाधिक संवेदनशील आणि समृद्ध व्हायला हवेत. धडपडणार्‍या शिक्षकांच्यात संवाद वाढायला हवा. धडपडणार्‍या शिक्षकांच कुटुंब विस्तारत जायला हवं, तरच शिक्षणाचं शिक्षणपण आपण टिकवून ठेवू शकू. आपण केलेले प्रयत्न एकमेकांना कळवायला हवेत. दुसर्‍यांनी केलेल्या प्रयोगांत आपल्याला आपल्या प्रश्‍नांची उत्तरे सापडतील.

    गेल्याच आठवड्यात एका विद्यार्थी-शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. उघड्या माळावर. तोरणा किल्ल्याच्या कुशीत, राहुट्यांमधील वस्ती आणि दिवसभर अनौपचारिक शिक्षण होईल असा भरगच्च कार्यक्रम ही त्या शिबिराची काही वैशिष्ट्ये. पण त्या सार्‍यांत काही अद्भूत, दुर्मिळ असे पाहायला सापडले. त्या सार्‍या विद्यार्थीगटात मुलाहून मूल झालेले आणि तरीही अध्यापकत्वाची जबाबदारी सांभाळणारे शिक्षक दिसले. ते शिक्षक पहाटे मुलांसोबत काकडत्या थंडीत उठत होते. सकाळी त्यांच्याबरोबरीने धावत होते. मुलांना बरोबर भोजनाची व्यवस्था लावत होते. तंबूंची स्वच्छता ठेवत होते. दुपारी पाण्यात डुंबत होते. संध्याकाळी मैदानावर मुलांशी मस्तीही करत होते. हे सारे करत असताना कळत नकळत मुलांना शिकवत होते. मनात आले असे १० हजार शिक्षक आपल्या देशात उभे राहिले तर आपला देश नक्की विश्वाचे नेतृत्व करेल.

सस्नेह,

विवेक पोंक्षे


‘प्र’शिक्षक  संपादकीयमधून संकलित -वर्ष1 अंक1 (डिसें95/जाने.96) + प्र’शिक्षक-वर्ष1 अंक 2 (फेबु‘-मार्च 1996) + ‘प्र’शिक्षक वर्ष 2अंक 5 ऑगस्ट-सप्टेंबर1997

संकलन : मृण्मयी वैशंपायन

Comments

  1. पोंक्षे सरांना अपेक्षित शिक्षक जेव्हा प्रत्येक शाळेत तयार होईल तेव्हा मूल सज्ञान नाही तर सुजाण बनेल

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बौद्धिक विकसनासाठी वाचन

  बौद्धिक विकसनासाठी वाचन ‘वाचन कर’ असे सुचवल्यावर काहीजणांना आनंद होतो तर अनेकजणांच्या कपाळावर आठ्या उमटतात. का वाचायचे ! कसे वाचायचे ! कशासाठी वाचायचे ! वाचताना काय करायचे ! वाचून झाल्यावर काय करायचे ! वाचून काय होणारें !!     असे अनेक प्रश्न , प्रतिक्रिया अनेकांच्या मनात डोकावत असतात. त्याची उत्तरे शोधण्याचा जो प्रयत्न करतो त्याला ‘वाचन कर’ सुचवल्यावर आनंद होण्याची शक्यता जास्त असते. वाचकाचा   पहिला सामना होतो तो वाचनाच्या तंत्राशी. अक्षरे, जोडाक्षरे , विरामचिन्हे अशा सांकेतिक लिपीतील चिन्हांशी मैत्री करत वाचक अर्थापर्यंत म्हणजेच शब्दापर्यंत येऊन   पोचतो आणि इथे खरे वाचन सुरू होते. अनेक वाचक या सांकेतिक चित्रांच्या जंजाळातच गुरफटतात. चिन्हांशी मैत्री झाली की अर्थाच्या खोलात डुबी मारण्यासाठी वाचक,   शब्द आणि शब्दांच्या अर्थछटा,   समानार्थी, विरुद्धअर्थी शब्द, वाक्प्रचार, वाक्य अशा टप्प्यात प्रवेश करतो. वाक्याला समजून घेत परिच्छेद, निबंध अशा शब्दसमूहात वाचक प्रवेश करतो. शब्दाच्या, वाक्याच्या अर्थछटा समजून घेत पूर्वज्ञानाशी सांगड घालत आपल्...

Talk on Indian Knowledge Systems in Curriculum @ Samvit Sangam

  Talk on Indian Knowledge Systems in Curriculum @ Samvit Sangam Namaste to all. I feel honoured to speak on Indian Knowledge Systems in Education at Samvit Sangam , organized by Samvit Research Foundation. I had the privilege to represent Jnana Prabodhini and speak at Samvit Sangam — a one-day symposium on the integration of Indian Knowledge Systems (IKS) in school education. I’ll keep to the time and share a few key points and practices from Jnana Prabodhini, so we can stay on track with the schedule. In the inaugural session, Anuragji raised important questions regarding the term Indian Knowledge System —its acronym IKS, and whether we ought to replace it with Bhartiya Gyan Parampara . For clarity, I will continue to refer to it as IKS-Parampara . The distinction between “ Indian Knowledge System ” and “Bhartiya Gyan Parampara” is significant. The English term “system” invokes several dimensions: What is the foundation of this system? What are the sources of its knowl...

बोलतो मराठी !....वाचतो मराठी !!

  बोलतो मराठी ! ....वाचतो मराठी  !! या महिन्यात तीन वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचनात आली. त्यातील ग्रंथालयात आलेले एक नवीन पुस्तक   ‘मी कधीही माफी मागणार नाही !’ एका व्यक्तीला झालेले ध्येय दर्शन आणि त्या ध्येय दर्शनातून कळलेला जीवन उद्देश साध्य करण्यासाठी , आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर स्वतः समोर ठेवलेली उद्दिष्टे ... मग ती उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी मिळवलेल्या शारीरिक , मानसिक , बौद्धिक क्षमता आणि प्रयत्नांची पराकाष्ठा ! प्रयत्नांच्या यशापयशातून धडपडत पण समाधानाने केलेला जीवन प्रवास !!..            ‘ मी कधीही माफी मागणार नाही!’ हे श्री. पांडुरंग खानखोजे यांचे चरित्र वाचत असताना मनात विचार येत होता की , जीवनाच्या पाठशाळेत अशा ‘स्व’ च्या शोधाचा प्रवास काहींनाच पूर्ण करता येतो. जीवनाच्या पाठशाळेत ‘स्व’च्या शोधाचा मार्ग ज्यांना सापडला त्यांच्या जीवनाचे सार सांगणारी   सूत्रं कोणती ? आणि   कठीण काळात देखील अशा व्यक्तींची इच्छा कशी प्रबळ राहते ?            दुसरे ...