Skip to main content

उपक्रम कुणाचा ? प्रदर्शन कुणाचे ...


उपक्रम कुणाचा ? प्रदर्शन कुणाचे ...

        B.Sc. करत असताना मधुकर बाचुलकर सरांचा स्लाईडशो आणि M.Sc. करताना एस. आर. यादव सर आणि टी. एम.  पाटील सर यांचे  स्लाईड-शो बघितल्यावर आपल्याकडे एस. एल. आर. कॅमेरा असावा आणि अशी फोटोग्राफी आपल्याला करता यावी अशी इच्छा मनात होती पण तेंव्हा ते शक्य नव्हते. पर्याय म्हणून कॅलेंडरवर प्रकाशित होणारी  वनस्पतींची छायाचित्रे गोळा करण्याचा छंद लागला.  पुढे या संग्रहात माझी आत्या माधुरी फाटक हिने गोळा केलेल्या छायाचित्रांची मोठी भर पडली. सुमारे दोनशे वनस्पतींची मोठ्या आकाराची पोस्टर्स गोळा झाली होती. 

        २००० साली ज्ञान प्रबोधिनी प्रशालेला एका स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल एक छान मोठा काचफलक मिळाला होता. या काचफलकात दर आठवड्याला एका वनस्पतीचे पोस्टर आणि एक पानभर त्या वनस्पतीची माहिती लावायला सुरुवात केली. काही आठवड्याने काही विद्यार्थिनी यासाठी मदत करू लागल्या. त्यावेळी नववीच्या वर्गासाठी मी गटकार्याचे तास घेत होतो. पुढे त्या वर्गालातील विद्यार्थिनींच्या जोड्या करून त्यांना काचफलक व्यवस्थापनाचे जोडी कार्य दिले.  दोन-तीन महिने नियमित हा उपक्रम चालू होता. एक दिवस वर्गात गप्पा मारताना अशी किती चित्रे माझ्याकडे आहेत असा प्रश्न कुणी तरी विचारला. साधारण दोनशे चित्रे आहेत  असे कळल्यानंतर ती सगळी चित्रे लावून लावून होई पर्यंत आमची दहावी होऊन जाईल असा वर्गाकडून प्रतिसाद मिळाला. मग आपण या संग्रहाचे प्रदर्शन योजावे असे ठरवले. वर्गासमोर प्रदर्शनाची कल्पना मांडली आणि विद्यार्थिनींचे गट करून त्यांना वनस्पती अभ्यासासाठी वाटून दिल्या . संदर्भ कसे बघायचे ते सांगितले.

        प्रदर्शनाच्या ठरवलेल्या तारखेच्या आधी दहा दिवस वर्गात आढावा घ्यायला गेलो. तर वर्गात माहिती गोळा करण्याचा आनंदच होता.  २० % पण माहिती  गोळा झाली नव्हती. संदर्भ शोधून माहिती काढणे, ती नेमकी करून टंकलिखित करणे, त्याच्या प्रिंट आऊट काढून लॅमिनेटेड करणे आणि मग प्रत्यक्ष प्रदर्शन कक्षाची उपासना मंदिरात उभारणी करणे अशी बरीच कामे राहिली होती. वर्गात कामाचा आढावा घेतल्यावर असे लक्षात आले की हे काम दहा दिवसात पूर्ण होणे अवघड आहे. अजून प्रदर्शनाची प्रसिद्धी केली नव्हती त्यामुळे आढावा घेतल्यावर वर्गातील मुलींना म्हंटले की आपण प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलू . मी पोंक्षे सरांशी बोलून नवीन तारीख मिळवतो.
        माझे बोलणे झाल्यावर काही मुली उभ्या राहिल्या आणि त्यांनी मागणी केली की प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलू नका.  परत एकदा समजुतीची तथ्यं वर्गासमोर ठेवली आणि पटवून दिले कि  हे काम वेळेत आणि अपेक्षित गुणवत्तेने  पूर्ण होणे अवघड आहे.  माझे बोलणे झाल्यानंतर वर्गातील विशेष प्रबोधकत्व असलेली एक कन्या उभी राहिली आणि म्हणाली, “ सर,  तुम्हाला पाहिजे तर तारीख पुढे ढकला पण आम्ही त्याच तारखेला प्रदर्शन भरवणार.” आणि मग सर्व वर्गानेच तिच्या सुरात सूर मिसळला. वर्गाचा सूर बघून त्यांना म्हंटले आता ठरवलेल्या दिवशी प्रदर्शन लागणे ही माझी जबाबदारी नाही तर तुमची जबाबदारी आहे आणि वर्गातून बाहेर पडलो.
आणि मग पुढचे आठ दिवस सकाळी आठ ते रात्री- नऊ पर्यंत विद्यार्थिनी गटागटाने येत होत्या. सलग काम चालू होते. आजही आठवते संगणक कक्षातील तो विशेष ‘वत्सला’ संगणक आणि डॉट मॅट्रिक्स प्रिंटर सतत आवाज करत असायचा.  मुलींनी ठरवून मला  सांगितल्याप्रमाणे त्याच दिवशी अतिशय नेटके प्रदर्शन उपासना मंदिरात उभारले होते.

        उपासना मंदिरातील ते प्रदर्शन आजही आठवते. अतिशय नेटकेपणाने लॅमिनेट करून  दोनशेपेक्षा जास्त वनस्पतींची पोस्टर्स आणि प्रत्येकाबद्दल माहितीपत्रक योग्य पद्धतीने मांडले होते. प्रशालेच्या शैक्षणिक साधनात या संग्रहाने एक मोठी  भर पडली होती.
        या वर्गातील काही मुली या प्रदर्शनात एवढ्या गुंतल्या होत्या की , त्यांनी बारावी झाल्यानंतर  एकत्र येऊन हे प्रदर्शन पुन्हा भरवले आणि आता त्या प्रदर्शनात त्यांनी गोळा केलेल्या चित्रांची भर घातली होती.

        त्यावेळी त्या विद्यार्थिनीचे “ सर, तुम्हाला पाहिजे तर तारीख पुढे ढकला पण आम्ही त्याच तारखेला प्रदर्शन भरवणार.”  हे उत्तर थोडे आगाऊपणाचे वाटले होते. पण आज अनेक उपक्रम, सहली, अभ्यास दौरे यांच्या आयोजनानंतर लक्षात येते कि कोणता शैक्षणिक उपक्रम यशस्वी झाला हे कसे ठरवायचे ? तर जेंव्हा तो उपक्रम माझा न राहता विद्यार्थ्यांचा झाला तेंव्हा.

        शैक्षणिक उपक्रम योजताना उद्दिष्टांची मांडणी, नेटके नियोजन या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. पण उपक्रम कधी यशस्वी  होऊ शकतो तर, जेंव्हा हा उपक्रम शाळेने किंवा शिक्षकाने योजलेला आहे असं न रहाता हा उपक्रम शाळेने माझ्यासाठी योजला आहे नव्हे हा माझाच उपक्रम आहे हा भाव आपण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करू शकतो तेंव्हा. खरंतर त्यावेळी तो उपक्रम खरा शिकण्याचा अनुभव बनतो.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे





Comments

  1. सुंदर लेख.सर्वाना प्रेरणा दिल्यामुळे संघटनेनी काम छान झाले.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आ. कै. उषाताईंबद्दल .....

  आ. कै. उषाताईंबद्दल  लेखन : स्मरणिकेसाठी माझा आणि उषाताईंचा पहिला संबंध २००१ मध्ये   एका मुलाखतीच्या निमित्ताने आला. प्रबोधिनीतील कामाचे दुसरे-तिसरे वर्ष असेल ,   थोडे जास्तीचे मानधन मिळण्यासाठी   प्रज्ञा मानसमध्ये एका प्रकल्पात मी काम करावे अशा कल्पनेतून पोंक्षेसरांनी मला ती मुलाखत द्यायला सांगितली होती. गिरीशराव , उषाताई आणि एक-दोन तज्ज्ञ असे पॅनल होते. मुलाखतीनंतर काही दिवसांनी मला उषाताईंना भेटण्यास सांगण्यात आले. मग त्यांच्याबरोबर थोडी सविस्तर प्रश्नोत्तरे झाली. प्रश्नोत्तराच्या शेवटी त्यांनी सांगितले , " आता इथे काम करायचे असेल तर ट्रेक , सहली , शिबिरे यांना मनात आले की जाता येणार नाही. " त्यावेळी प्रशालेत   आणि इतर अनेक विभागांबरोबर माझे असे मजेचे उद्योग चालू होते. प्रज्ञा मानसच्या पाचव्या मजल्यावरून प्रशालेच्या तिसऱ्या मजल्यावर येईपर्यंत विचार केला आणि खाली आल्यावर पोंक्षेसरांना सांगितले निवड झाली असली तरी त्यांना नाही म्हणून कळवा. त्यानंतर उषाताईंचा संबंध आला तो थेट आठ-दहा वर्षांनी , त्यावेळी मी सोलापूर प्रबोधिनीत निवासी होतो आणि उषाताई सोलाप...

Nation in Image: Symbols that Shape Nations

                                                          Symbols that Shape Nations This activity introduces students to how nations use visual symbols and personifications to express identity, unity, and political values. By examining global examples and comparing them with Abanindranath Tagore’s Bharat Mata, learners explore how imagery shapes nationalism and deepen their understanding of the Bharatiya concept of Rāṣṭra. Identify images and by using references complete the table   (Support Independent Learning, Comparison & analysis) 2.  Compare the above images with Abanindranath Tagore’s image of Bharat Mata. How does it reflect Indian values? (Analysis & synthesis) 3.  How does the practice of personifying nations—often through female figures—shape our understandin...

तंत्रज्ञानी नवे सहस्रक…

  तंत्रज्ञानी नवे सहस्रक … ज्ञान प्रबोधिनीत अनेक समूहगीते म्हणली जातात. त्यातील एका पद्याचे धृवपद आठवते. तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसे अध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे मानवाच्या समूह विकसनात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगीवर नियंत्रण, चाकाचा शोध, लोह खनिजाचा वापर असे या प्रवासातील महत्त्वाचे ठळक टप्पे नोंदवता येतील. या सहस्रकातील गेल्या चार शतकांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा झपाट्याने विकसित झाल्या आहेत. मानवी समाजाच्या शैक्षणिक रचनांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण हा गाभाघटक बनला आहे.   स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून   विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना   तंत्रज्ञानाच्या अभ्यास शाखांची तोंडओळख व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या ज्ञान शाखांची निवड करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्यानुभव,   टेक्निकलसारखे विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आले. आजच्या गरजा ...