Skip to main content

उपक्रम कुणाचा ? प्रदर्शन कुणाचे ...


उपक्रम कुणाचा ? प्रदर्शन कुणाचे ...

        B.Sc. करत असताना मधुकर बाचुलकर सरांचा स्लाईडशो आणि M.Sc. करताना एस. आर. यादव सर आणि टी. एम.  पाटील सर यांचे  स्लाईड-शो बघितल्यावर आपल्याकडे एस. एल. आर. कॅमेरा असावा आणि अशी फोटोग्राफी आपल्याला करता यावी अशी इच्छा मनात होती पण तेंव्हा ते शक्य नव्हते. पर्याय म्हणून कॅलेंडरवर प्रकाशित होणारी  वनस्पतींची छायाचित्रे गोळा करण्याचा छंद लागला.  पुढे या संग्रहात माझी आत्या माधुरी फाटक हिने गोळा केलेल्या छायाचित्रांची मोठी भर पडली. सुमारे दोनशे वनस्पतींची मोठ्या आकाराची पोस्टर्स गोळा झाली होती. 

        २००० साली ज्ञान प्रबोधिनी प्रशालेला एका स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल एक छान मोठा काचफलक मिळाला होता. या काचफलकात दर आठवड्याला एका वनस्पतीचे पोस्टर आणि एक पानभर त्या वनस्पतीची माहिती लावायला सुरुवात केली. काही आठवड्याने काही विद्यार्थिनी यासाठी मदत करू लागल्या. त्यावेळी नववीच्या वर्गासाठी मी गटकार्याचे तास घेत होतो. पुढे त्या वर्गालातील विद्यार्थिनींच्या जोड्या करून त्यांना काचफलक व्यवस्थापनाचे जोडी कार्य दिले.  दोन-तीन महिने नियमित हा उपक्रम चालू होता. एक दिवस वर्गात गप्पा मारताना अशी किती चित्रे माझ्याकडे आहेत असा प्रश्न कुणी तरी विचारला. साधारण दोनशे चित्रे आहेत  असे कळल्यानंतर ती सगळी चित्रे लावून लावून होई पर्यंत आमची दहावी होऊन जाईल असा वर्गाकडून प्रतिसाद मिळाला. मग आपण या संग्रहाचे प्रदर्शन योजावे असे ठरवले. वर्गासमोर प्रदर्शनाची कल्पना मांडली आणि विद्यार्थिनींचे गट करून त्यांना वनस्पती अभ्यासासाठी वाटून दिल्या . संदर्भ कसे बघायचे ते सांगितले.

        प्रदर्शनाच्या ठरवलेल्या तारखेच्या आधी दहा दिवस वर्गात आढावा घ्यायला गेलो. तर वर्गात माहिती गोळा करण्याचा आनंदच होता.  २० % पण माहिती  गोळा झाली नव्हती. संदर्भ शोधून माहिती काढणे, ती नेमकी करून टंकलिखित करणे, त्याच्या प्रिंट आऊट काढून लॅमिनेटेड करणे आणि मग प्रत्यक्ष प्रदर्शन कक्षाची उपासना मंदिरात उभारणी करणे अशी बरीच कामे राहिली होती. वर्गात कामाचा आढावा घेतल्यावर असे लक्षात आले की हे काम दहा दिवसात पूर्ण होणे अवघड आहे. अजून प्रदर्शनाची प्रसिद्धी केली नव्हती त्यामुळे आढावा घेतल्यावर वर्गातील मुलींना म्हंटले की आपण प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलू . मी पोंक्षे सरांशी बोलून नवीन तारीख मिळवतो.
        माझे बोलणे झाल्यावर काही मुली उभ्या राहिल्या आणि त्यांनी मागणी केली की प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलू नका.  परत एकदा समजुतीची तथ्यं वर्गासमोर ठेवली आणि पटवून दिले कि  हे काम वेळेत आणि अपेक्षित गुणवत्तेने  पूर्ण होणे अवघड आहे.  माझे बोलणे झाल्यानंतर वर्गातील विशेष प्रबोधकत्व असलेली एक कन्या उभी राहिली आणि म्हणाली, “ सर,  तुम्हाला पाहिजे तर तारीख पुढे ढकला पण आम्ही त्याच तारखेला प्रदर्शन भरवणार.” आणि मग सर्व वर्गानेच तिच्या सुरात सूर मिसळला. वर्गाचा सूर बघून त्यांना म्हंटले आता ठरवलेल्या दिवशी प्रदर्शन लागणे ही माझी जबाबदारी नाही तर तुमची जबाबदारी आहे आणि वर्गातून बाहेर पडलो.
आणि मग पुढचे आठ दिवस सकाळी आठ ते रात्री- नऊ पर्यंत विद्यार्थिनी गटागटाने येत होत्या. सलग काम चालू होते. आजही आठवते संगणक कक्षातील तो विशेष ‘वत्सला’ संगणक आणि डॉट मॅट्रिक्स प्रिंटर सतत आवाज करत असायचा.  मुलींनी ठरवून मला  सांगितल्याप्रमाणे त्याच दिवशी अतिशय नेटके प्रदर्शन उपासना मंदिरात उभारले होते.

        उपासना मंदिरातील ते प्रदर्शन आजही आठवते. अतिशय नेटकेपणाने लॅमिनेट करून  दोनशेपेक्षा जास्त वनस्पतींची पोस्टर्स आणि प्रत्येकाबद्दल माहितीपत्रक योग्य पद्धतीने मांडले होते. प्रशालेच्या शैक्षणिक साधनात या संग्रहाने एक मोठी  भर पडली होती.
        या वर्गातील काही मुली या प्रदर्शनात एवढ्या गुंतल्या होत्या की , त्यांनी बारावी झाल्यानंतर  एकत्र येऊन हे प्रदर्शन पुन्हा भरवले आणि आता त्या प्रदर्शनात त्यांनी गोळा केलेल्या चित्रांची भर घातली होती.

        त्यावेळी त्या विद्यार्थिनीचे “ सर, तुम्हाला पाहिजे तर तारीख पुढे ढकला पण आम्ही त्याच तारखेला प्रदर्शन भरवणार.”  हे उत्तर थोडे आगाऊपणाचे वाटले होते. पण आज अनेक उपक्रम, सहली, अभ्यास दौरे यांच्या आयोजनानंतर लक्षात येते कि कोणता शैक्षणिक उपक्रम यशस्वी झाला हे कसे ठरवायचे ? तर जेंव्हा तो उपक्रम माझा न राहता विद्यार्थ्यांचा झाला तेंव्हा.

        शैक्षणिक उपक्रम योजताना उद्दिष्टांची मांडणी, नेटके नियोजन या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. पण उपक्रम कधी यशस्वी  होऊ शकतो तर, जेंव्हा हा उपक्रम शाळेने किंवा शिक्षकाने योजलेला आहे असं न रहाता हा उपक्रम शाळेने माझ्यासाठी योजला आहे नव्हे हा माझाच उपक्रम आहे हा भाव आपण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करू शकतो तेंव्हा. खरंतर त्यावेळी तो उपक्रम खरा शिकण्याचा अनुभव बनतो.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे





Comments

  1. सुंदर लेख.सर्वाना प्रेरणा दिल्यामुळे संघटनेनी काम छान झाले.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती                       जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.     ...

सहपुस्तक चाचणी

  सहपुस्तक चाचणी                मार्च महिन्यात शालांत परीक्षा सुरु झाल्यावर वर्तमानपत्रे ; दूरचित्रवाणीवर दहावी , बारावीच्या परीक्षेत चालू असलेल्या कॉपी पुरवठ्याची छायाचित्रे , बातम्या , चित्रफिती दिसू लागतात. माध्यमात चर्चा सुरु होते आणि आपण कशासाठी शिकवतो ? असा प्रश्न पडतो. त्याला प्रतिसाद म्हणून कॉपी मुक्ती अभियान सुरु केले जाते आणि हळूहळू त्याचाच अभिमान वाटायला लागतो. परीक्षा कशासाठी... ? वर्गात शिक्षक पुस्तकातील पाठ वाचून दाखवतात , स्पष्टीकरण म्हणून वाक्य बोलीभाषेत रुपांतर करून मांडतात , पाठाचा सारांश सांगतात. परीक्षेत पाठाखालील सरावासाठी दिलेलेच प्रश्न विचारतात. पाठाखालच्या सरावातील प्रश्नच विचारायचे असतील तर परीक्षा कशासाठी... ?              माझे एक मित्र वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. गप्पा मारताना ते मला म्हणाले , ' अमुक सालानंतर डॉक्टर झालेल्यांकडून उपचार करून घेऊ नका. ' मी विचारले , का ? काय झाले ? म्हणाले - "त्यावर्षी मला पहिल्या...

सत्यं च स्वाध्यायप्रवचने च।

  सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। प्रकृति के सानिध्य में रहकर उसके साथ एकत्व का अनुभव करना , स्वाध्याय का प्रथम सूत्र है , जो हमें ब्रह्मांड के निर्माण और उसके रहस्यों को जानने की प्रेरणा देता है। जड़-चेतन धारणाओं से जुड़ी मूलकण , वंशसूत्र , गुणसूत्र जैसी सूक्ष्मतम चीज़ों के अध्ययन से लेकर ब्रह्मांड के विस्तार के अध्ययन तक का व्यापक आयाम हमें प्रकृति के गहनतम रहस्यों में प्रवेश करने का मार्ग प्रदान करता हैं। ब्रह्मांड के विशाल विस्तार और उसकी अनंतता को समझने का प्रयास करने के लिए पहला उपनिषदिक अध्ययन सूत्र है "ऋतं च स्वाध्याय प्रवचने च।" ऋतम् का अध्ययन ब्रह्मांड के नियमों और संरचनात्मक सिद्धांतों को समझने की कुंजी है। ऋतम् का अध्ययन   केवल दार्शनिक धारणा नहीं है , बल्कि यह ब्रह्मांड की रचना और उसके संचालन में निहित नियमों को   वैज्ञानिक दृष्टिकोणद्वारा गहराई से समझना है। यह हमें   सिखाता है कि ब्रह्मांड किस प्रकार संतुलित और सुव्यवस्थित रूप से कार्य करता है। ऋतम् का स्वाध्याय करते समय हम अपने परिवेश को गहराई से समझने लगते हैं। प्रकृति के रहस्यों की खोज और उन...