Skip to main content

तंजावर : श्री समर्थ रामदास स्वामी मठाच्या भेटीचा योग



              सन २०१५, दिवाळीच्या सुट्टीत आम्ही दिवेकर, पायगुडे,  नाईक सपरिवार पाँडिचेरी ते कन्याकुमारी सहलीला गेलो होतो.  या सहलीमध्ये दोन दिवस तंजावरमध्ये होतो. दुपारी तंजावरमध्ये  पोचलो. संध्याकाळी  तंजावरमधील प्रख्यात बृहदेश्वर मंदिर पाहिले.  मंदिर पाहून झाल्यावर रात्रीच्या टिफिनला काही पर्याय मिळतो का किंवा बरे टिफिन कुठे मिळेल यासाठी एका चौकात चौकशीसाठी थांबलो होतो. ( दक्षिणेत रात्री जेवण मिळत नाही टिफीनवरच भागवावे लागते. 😊)

              आमचे बोलणे ऐकून एक गृहस्थ आमच्याकडे आले आणि त्यांनी आमची चौकशी केली, "तुम्ही पुण्याहून आला आहेत का? तुम्ही गद्रे आहात का ?"
 "आम्ही पुण्याहून आलोय,  पण गद्रे नाही. " मी उत्तरलो.

             तंजावरमध्ये मराठी बोलणारी व्यक्ती भेटल्याने आपसूकच गप्पा सुरू झाल्या. ते सद्गृहस्थ पुण्यात शिक्षणासाठी राहिलेले असल्याने त्यांना पुण्याची माहिती होती. ते गृहस्थ तंजावरचेच राहाणारे आहेत हे कळल्यावर त्यांच्याकडून संध्याकाळच्या टिफिनबद्दल मुद्द्याची माहिती काढून घेतली. आमची चौकशी करताना त्यांनी तंजावरमध्ये आज काय काय बघितले, उद्या  काय बघणार आहोत, याची चौकशी केली आणि काही ठिकाणे सुचवली.

           निरोप घेताना त्यांनी विचारले की तंजावरमध्ये श्री रामदास स्वामींचा मठ आहे.  तो तुम्ही  पाहणार आहात का ? या मठाबद्दल ऐकले होते पण इंटरनेटवर त्याचा पत्ता मिळाला नव्हता व आल्यापासून तंजावरमध्ये ज्यांना विचारले त्यांच्याकडून काही माहिती मिळाली नाही. त्यामुळे उद्याच्या यादीत श्रीरामदास स्वामी मठ नाही असे त्यांना सांगितले.

         निरोप घेताना आमच्याकडे हसून बघत ते म्हणाले,"तुम्हाला जर मठाला भेट द्यायची असेल तर उद्या सकाळी या. हा माझा पत्ता, मी त्या मठाचा वारसदार स्वामी आहे.  मी सकाळी आठ वाजता कामावर जाणार आहे, पण तुम्ही मठात येऊन दर्शन घेऊ शकता."  असे सांगून त्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक दिला.

         दुसऱ्या दिवशी तंजावरचा राजवाडा, सरस्वती ग्रंथालय बघायचे होते आणि संध्याकाळी पुढच्या ठिकाणासाठी रेल्वे पकडायची होती, तेव्हा दिवसभराच्या कार्यक्रमात वेळ मिळाला तर जाऊ मठात असा विचार केला.  सकाळी राजवाडा, सरस्वती ग्रंथालय बघण्यासाठी आठ वाजता आवरून तयार झालो होतो.  तेवढ्यात गोस्वामी रामदासी यांचा फोन आला,"पोहोचतायना ना मठात ?  तुम्ही येणार असाल तर तुमच्यासाठी थोडावेळ थांबून उशीरा दहा वाजता बाहेर जाईन."  आवरून तयार असल्याने आम्ही तातडीने त्यांनी सांगितलेल्या पत्त्याचा शोध घेत मठात पोचलो.

         प्रथम दर्शनी श्रीरामदास स्वामी मठ एक छोटेखानी निवासवजा मंदिर होते.  मठात गेल्यावर श्री रामरायाचे दर्शन घेतले आणि गोस्वामी रामदासीं  बरोबर गप्पा मारायला सुरुवात केली. त्यांनी सांगितले की हे राममंदिरातील जे पंचायतन आहे, त्या मूर्ती सज्जनगडाच्या मंदिरातील मूर्ती घडवण्यापूर्वीच्या नमुना मूर्ती आहेत.

           समर्थ १६७७ साली रामेश्वरी तीर्थयात्रेला गेले होते. वाटेत  तंजावरला श्री रामदास स्वामी आणि व्यंकोजी महाराजांची भेट झाली. त्यावेळी समर्थांबरोबर असलेल्या भीम महाराजांना समर्थांनी तंजावर मठाच्या स्थापनेसाठी तंजावरला थांबवले व दक्षिण भारतातील कामाची सूत्रे दिली. कोणतीही दक्षिणी भाषा येत नसताना भीम महाराजांनी दक्षिणेत रामदासी कार्याचा प्रसार केला.

          दर्शनानंतर मंदिरात बसलो आहोत तर दरवर्षी विद्याव्रत शिबिरात सज्जनगडावर किंवा शिवथर घळीत  जी भजने म्हणतो ती  म्हणूया अशी कल्पना पुढे आली. मग प्रवीण आणि रागिणीने काही भजने आणि धुनी सांगितल्या. आमची भजने आणि धुनी ऐकल्यावर गोस्वामींना आनंद झाला. ते म्हणाले की थांबा अजून थोडावेळ. तुम्हाला काही विशेष दाखवतो. असे सांगून ते सोवळे नेसून आले. त्यांच्या हातात सोवळ्यात गुंडाळलेली एक पोथी होती आणि बरोबर काही तसबिरी होत्या.

                नमस्कार करून त्यांनी पोथीभोवती गुंडाळलेली सोवळ्याची आवरणे उलगडण्यास सुरुवात केली.  एकातएक सात-आठ वस्त्रांत बांधलेला तो ग्रंथ म्हणजे मठाचे संस्थापक भीम महाराज यांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेली दासबोधाची प्रत होती. समर्थांनी अक्षर कसे असावे याचे जे निकष सांगणारे जे श्लोक लिहिले आहेत त्याप्रमाणे....

वाटोळे सरळ मोकळे वोतले मसीचे काळे

कुळकुळीत वळीत चालिल्या मुक्तमाळा जैशा

अक्षरमात्र तितुके नीट नेमस्त पैस काने नीट

आडव्या मात्र त्याही नीट आर्कुलीं वेलांड्या

पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपेतो पाहात गेले

येका टाकेचि लिहिले ऐसे वाटे.....


         याप्रमाणे अक्षराच्या सर्व निकषांची पूर्तता करणारे हस्ताक्षर आणि उत्तम सजावट असलेला तो ग्रंथराज होता.

            गोस्वामींनी मग दासबोधाची छापील प्रत दिली आणि ताडून बघण्यास सांगितले. जणू त्याच लक्षणांतील... 'कोठे शोधासी आडेना चुकी पाहता सापडेना' हे समर्थांनी सांगितलेले लिखाणाचे लक्षण तपासून बघण्यास  सांगितले.

         नंतर त्यांनी मठाचे संस्थापक भीम महाराज यांनी काढलेली दोन चित्रे दाखवली. त्यातील एक चित्र समर्थांचे होते.  आज समर्थांची एका बाजूने दर्शन  देणारी जी चित्रे काढली जातात ती चित्रे या भीम महाराजांच्या चित्राच्या नक्कली आहेत. त्या चित्रांमधील दुसरे चित्र तर मजेशीर होते. ती  एक 'सेल्फी' होती होती. हे सेल्फी चित्र म्हणजे भीम महाराजांनी काढलेले स्वतःचे पोर्ट्रेट होते.

         गप्पांमध्ये भीम महाराजांपासून ते आजच्या मठाच्या जीर्णोद्धारापर्यंतच्या अनेक कथा त्यांनी सांगितल्या . काही कथा चाफळच्या उत्सवाच्या वेळी जसा चमत्कार होऊन उत्सव निर्विघ्न पार पडला, या स्वरूपाच्या साक्षात्काराच्या कथा होत्या, प्रचितीचा महिमा सांगणाऱ्या कथा होत्या. 

        नियोजनाच्या, विचाराच्या कक्षेत नसताना ही दोन तासांची भेट अचानक घडून आली.  समर्थांच्या मठाचे दर्शन घडले, ऐतिहासिक वस्तू, कागदपत्रे पाहता आली. अनेक मिथक कथा ऐकता आल्या. ३५० वर्ष  एक ऐतिहासिक ठेवा बघता आला.

        आदल्या दिवशी संध्याकाळी तंजावरच्या चौकात मठाधिपती गोस्वामी भेटले, सकाळी त्यांनी दूरभाष करून आम्हाला बोलावून घेतले, म्हणून  हे दर्शन झाले .

          गेली वीस वर्षे मी, मिलिंद, प्रवीण विद्याव्रत शिबिरासाठी सज्जनगड वा  शिवथरघळीत नियमित जात आहोत. त्यामुळे आमचा दर्शनाचा योग होता असें म्हणताना, थोडी श्रद्धा कमी पडते का चिकित्सा आड येते माहीत नाही... पण ही भेट घडावी, ही श्री समर्थांचीच इच्छा होती!




प्रशांत दिवेकर 
ज्ञान प्रबोधिनी, पुणे


श्री समर्थ रामदासस्वामी मठ, तंजावर

श्री समर्थ रामदासस्वामी मठ, तंजावर
                          


दासबोध प्रत, श्री समर्थ रामदासस्वामी मठ, तंजावर


Comments

  1. समर्थांची इच्छा असणार

    ReplyDelete
  2. खूप छान भेट ! कधी कधी आपण तिकडे जाऊ कि नाही असा विचार देखील केलेला नसतो पण ते घडते. हि भेट अशीच म्हणावी लागेल. तुमची श्रद्धा आहे कि नाही हा प्रश्नच येत नाही. ती शक्ती सर्व घडवून आणते यावर मात्र विश्वास वाढतो.

    ReplyDelete
  3. अप्रतिम सर!आमच्या इतिहास अभ्यास शिबिरात आपण हा किस्सा सांगितलेला..तेव्हाही आणि आत्तही अंगावर काटा आला !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वंदे गुरु परंपरा

वंदे गुरु परंपरा गुरुपौर्णिमा   अर्थात   ज्ञानाच्या   परंपरांचे   पाईक   होण्याचा   दिवस इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) भगवद् गीतेत देखील श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना ज्ञानाच्या परंपरेचा दाखला दिला आहे. ते म्हणतात ‘ मी हा अव्यय ( अविनाशी ) योग सूर्याला सांगितला. सूर्याने मनुला सांगितला व मनूने  इक्ष्वाकू   सांगितला.  भारतीय परंपरेत नवीन ज्ञानतत्वाज्ञाच्या शाखांची मांडणी करताना देखील असा गुरु परंपरेचा वारसा सांगितला जातो. कारण ज्ञानाच्या परंपरेच्या संक्रमणातूनच ज्ञान वृद्धिगत होत जाते.                ज्ञान   प्रबोधिनीने   पथकाधिपती   म्हणून   समर्थ   रामदास ,  स्वामी   दयानंद ,  स्वामी   विवेकानंद   आणि   योगी   अरविंद या चार व्यक्तींचा स्वीकार केला आहे.   त्यापैकी एक म्हणजे समर्थ रामदास! कवि   वामन   पंडितांनी   समर्थांची ...

Vande Guru Parampara

  Vande Guru Parampara Guru Purnima – Honouring Our Gurus, Upholding the Tradition इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) In the Bhagavad Gita, while advising Arjuna, Lord Krishna gives an example of the tradition of knowledge. He says, “I imparted this indestructible Yoga to the Sun (Vivasvan), who passed it on to Manu, and Manu, in turn, passed it on to Ikshvaku.” In the Indian tradition, whenever new knowledge or philosophy is presented, the legacy of the Guru's tradition is also acknowledged—because knowledge flourishes only when its lineage is preserved and passed on. Jnana Prabodhini has accepted four great personalities—Samarth Ramdas, Swami Dayananda, Swami Vivekananda, and Yogi Arvind—as its visionaries, and pathfinders who have shaped Jnana Prabodhini ideals and direction. Today, let us learn about Samarth Ramdas. The poet Vaman Pandit praises him with the following verse. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे...

In Search of History

  In Search of History “Forests are encroaching on human settlements…” “The forest swallowed up the city in a few years…” We often read such phrases in novels, but few years back, during my visit to Ross Island in the Andaman and Nicobar Islands, I saw this happening in real life. Ross Island, now called Netaji Subhash Chandra Bose Island , has a fascinating history. Once, it was the administrative capital of the British in the Andaman and Nicobar Islands. Named after Captain Daniel Ross, a marine surveyor, this island was a powerful symbol of British dominance. The British took control of Ross Island in the 1850s and ruled it for almost 80 years. They built luxurious buildings like the Chief Commissioner’s bungalow, a bakery, a church, a tennis court, and more, earning it the title “Paris of the East.” But nature has reclaimed its place. Today, the grand buildings are overrun by roots and vines, swallowed by trees like banyan tress and many varieties of Ficus family membe...