Skip to main content

मुझे जो जो चीज अच्छी आती हैं वो मैं सिखाऊंगा


                 
                        आसाममध्ये विवेकानंद केंद्राच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शोध परीक्षेसाठी अभ्यास वर्ग घेण्यासाठी मी आणि अमर परांजपे दिब्रुगडला गेलो होतो. अभ्यास वर्ग संपल्यानंतर विवेकानंद केंद्राच्या अरुणाचल प्रदेशमधील जयरामपूर येथील शाळेत केंद्रीय बोर्डाने नव्याने आणलेल्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेसमेंट या विषयासाठी शिक्षक आणि मुलांसाठी कार्यशाळा घेण्यासाठी जयरामपूरला गेलो होतो. 

              जयरामपूरजवळ पांगसू पास आहे. पांगसू पास ही खिंड भारत आणि म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेशाला जोडणारे सीमेवरचे ठिकाण आहे. भारत आणि म्यानमार याची सीमा निश्चित करणारा खुणेचा दगड या खिंडीच्या रस्त्यावर आहे.  येथे एक विशेष आठवडी बाजार भरतो.  बाजाराच्या दिवशी दोन्ही देशातील लोक परवाना काढून बाजारात येऊ शकतात आणि आपल्याला वस्तूंची खरेदी विक्री करू शकतात.  शासनाने  वस्तूंची एक यादी निश्चित केलेली आहे त्याची खरेदीविक्री होते. शेतमाल, भाजीपाला, स्थानिक कारागिरांच्या वस्तू देखील विक्रीसाठी असतात.   सीमेपलीकडील  लोकांना त्यांच्या देशातील मोठ्या बाजारात जायचे असेल तर काहीशे किलोमीटर प्रवास करावा लागतो, त्यापेक्षा त्यांना असा परवाना काढून भारतात येऊन खरेदी करणे सोयीचे जाते.  सीमेच्या दोन्ही बाजूंना अनेक गावांमध्ये एकमेकांचे नातेवाईक आहेत त्यांना पण त्या निमित्ताने एकमेकांना भेटत येते. 

              आम्ही जाणार होतो त्या दिवशी बाजार नसल्याने आम्हाला  परवाना मिळाला नाही.  पण आलोच आहोत तर बाजार नाहीतर किमान तो सीमा स्तंभ बघावा  म्हणून सकाळी लवकर उठलो आणि साडेचारच्या आसपास प्रवासाला सुरुवात केली.  आपल्याला माहिती आहे की आपण जसजसे पूर्वेकडेजावे  तसतसे लवकर उजाडते. अरुणाचलात उन्हाळ्यात सकाळी चारवाजता लख्ख उजाडलेले असते.  

                साधारण पाचसाडेपाच वाजले असतील पांगसू पासकडे जाताना वाटेतील नाम्पोंग लागले. ब्रह्मदेशाच्या सीमेजवळील हे शेवटचे मोठे गाव. गावातून जात असताना डाव्या बाजूला एक शाळा दिसली.  सरकारी शाळा होती. सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर  शाळेच्या व्हरांड्यात काही विद्यार्थी आणि एक शिक्षक योगासने करताना दिसली. शासकीय शाळेत एवढ्या सकाळी विद्यार्थी आणि शिक्षक काय करतात या उत्सुकतेपोटी गाडी थांबवली आणि  मागेवळून शाळेत गेलो. शिक्षक आणि त्यांचे पंधरावीस  विद्यार्थी योगासने करत होते. आम्हाला सुरुवातीला वाटले कुठल्यातरी स्वयंसेवी संस्थेचा कार्यकर्ता योगासने घेत असेल. सहज गप्पा माराव्यात म्हणून आम्ही शाळेच्या आवारात गेलो. आम्ही आल्याचे बघून त्या शिक्षकांनी त्यांचा  योगासनाचा  संच  पूर्ण केला आणि आमच्याशी बोलण्यासाठी पुढे आले. 

                   सिंगसर.... सिंगसर त्या शाळेत गणित-विज्ञानाचे अध्यापक. एवढ्या सकाळी मुलांबरोबर योगासने करत असल्याबद्दल त्यांचे सुरुवातीला अभिनंदन केले. मला तर सुरुवातीला हा  योगदिन सिंड्रोम वाटलं. 😊
 सिंगसर म्हणाले मी गेली काही वर्षे शाळेच्या जवळपास राहणारे जे विद्यार्थी सकाळी शाळेत येऊ शकतात त्यांच्याबरोबर नियमित योगासने करतो. सरांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी काही योगासने करून दाखवली . सरांनी कोणताही आधार न घेता शीर्षासन,  मयूरासन यासारखी  अवघड आसने देखील करून दाखवली. 

          गप्पा मारताना सर म्हणाले गेली अनेक वर्ष मी  घरी नियमित योगासनं करतो. पण एक दिवस असे वाटले की निसर्गतःच उत्तम शारीरिक कौशल्य असलेल्या या मुलांना मी गणित-विज्ञानाचे बरोबर योगासनेपण  शिकवायला हवी.  आपल्याला माहिती आहे की आज मणिपूर सारखे ईशान्य भारतातील छोटे राज्य  खेळामध्ये भारतासाठी सर्वाधिक पदके मिळवते.  हि कल्पना मनात येताच मी शाळेच्या मुख्याध्यापकांना योगासने शिकवण्यासाठी परवानगी मागितली.  तर ते म्हणाले तुमचा विषय वेगळा, शारीरिक शिक्षणाचे शिक्षक बघून घेतील योगासनांचे काय करायचे.  एकदोनदा मी रीतसर परवानगी काढायचा प्रयत्न केला.  पण शाळेच्या रचनेत हे करता येणे अवघड आहे असे दिसल्यानंतर मी विचार केला की सगळ्या शाळेसाठी किंवा वर्गासाठी हे जमणार नसेल तर आपण शाळेच्या आसपास राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत  बोलवू  आणि घरी योगासने करण्याच्या ऐवजी शाळेच्या आवारात  योगासने करू. इच्छा असणारे विद्यार्थी येतील. 

'मुझे जो जो चीज अच्छी आती हैं  वो मैं सिखाऊंगा' 

 मला जे चांगले येते ते माझ्या विद्यार्थ्यांना शिकवायची इच्छा मला स्वस्थ बसू देत नव्हती त्यामुळे त्या दिवसापासून शाळेत सहज चालत येऊ शकतील अशी हि वीस-पंचवीस मुले आणि मी सकाळी शाळेच्या आवारात योगासने करतो आणि मैदानावर शारीरिक व्यायाम करतो. 

                 म्हटलं तर बिहारमधून अरुणाचलातील एका दुर्गम भागातील शासकीय शाळेतील अध्यापक.  पण त्याला आपल्या जवळ असलेले ज्ञान आणि कौशल्य ज्ञान मुलांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती अशी इच्छाच अध्यापकाची प्रेरणा आहे. 

              चांगला अध्यापक होण्यासाठी आपल्याला पाठपुस्तकापलीकडे जाऊन आपला विषय पोचवता आला पाहिजे. पण वर्गात आपण फक्त विषय शिक्षक म्हणून उभे नसतो एक व्यक्ती म्हणून आपल्या गुणदोषांसह उभे असतो. माझ्या व्यक्तिमत्त्वाचे विद्यार्थ्यांसमोर सर्वार्थाने प्रगटीकरण झाले पाहिजे हि इच्छा अध्यापकाची प्रेरणा आहे. 

        मला अनेक शिक्षक माहिती आहेत की ते उत्तम गायक असतात, वादक असतात, निवेदक असतात, छायाचित्रकार असतात पण शाळेत ते फक्त विषय शिक्षक असतात. असे कप्पे करून कसे राहता येत ? 

       ज्याला हे कप्पे जोडता येतात आणि आपल्या जवळ जे जे उत्तम आहे ते प्रकट करता येते त्याच्या बाबतीत दोन गोष्टी नक्की होतात एक आपल्या शिक्षकाला काहीतरी येते आणि आपले शिक्षक 'भारी' आहेत हा भाव विद्यार्थांच्या मनात तयार होतो. असा प्रभाव अध्यापकाची  परिणामकारकता नक्कीच वाढवतो. 

                                                                                                                     प्रशांत दिवेकर ,
                                                                                                                    ज्ञान प्रबोधीनी,पुणे
                                                                                                                     



अमर परांजपे यांच्या बरोबर पांगसू पास येथील सीमा स्तंभाजवळ



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वंदे गुरु परंपरा

वंदे गुरु परंपरा गुरुपौर्णिमा   अर्थात   ज्ञानाच्या   परंपरांचे   पाईक   होण्याचा   दिवस इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) भगवद् गीतेत देखील श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना ज्ञानाच्या परंपरेचा दाखला दिला आहे. ते म्हणतात ‘ मी हा अव्यय ( अविनाशी ) योग सूर्याला सांगितला. सूर्याने मनुला सांगितला व मनूने  इक्ष्वाकू   सांगितला.  भारतीय परंपरेत नवीन ज्ञानतत्वाज्ञाच्या शाखांची मांडणी करताना देखील असा गुरु परंपरेचा वारसा सांगितला जातो. कारण ज्ञानाच्या परंपरेच्या संक्रमणातूनच ज्ञान वृद्धिगत होत जाते.                ज्ञान   प्रबोधिनीने   पथकाधिपती   म्हणून   समर्थ   रामदास ,  स्वामी   दयानंद ,  स्वामी   विवेकानंद   आणि   योगी   अरविंद या चार व्यक्तींचा स्वीकार केला आहे.   त्यापैकी एक म्हणजे समर्थ रामदास! कवि   वामन   पंडितांनी   समर्थांची ...

Vande Guru Parampara

  Vande Guru Parampara Guru Purnima – Honouring Our Gurus, Upholding the Tradition इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) In the Bhagavad Gita, while advising Arjuna, Lord Krishna gives an example of the tradition of knowledge. He says, “I imparted this indestructible Yoga to the Sun (Vivasvan), who passed it on to Manu, and Manu, in turn, passed it on to Ikshvaku.” In the Indian tradition, whenever new knowledge or philosophy is presented, the legacy of the Guru's tradition is also acknowledged—because knowledge flourishes only when its lineage is preserved and passed on. Jnana Prabodhini has accepted four great personalities—Samarth Ramdas, Swami Dayananda, Swami Vivekananda, and Yogi Arvind—as its visionaries, and pathfinders who have shaped Jnana Prabodhini ideals and direction. Today, let us learn about Samarth Ramdas. The poet Vaman Pandit praises him with the following verse. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे...

महाराष्ट्रधर्म

                                                                                       महाराष्ट्रधर्म १९९९ साली महिनाभराच्या ईशान्य भारत दौऱ्यात गुवाहाटी येथे केशवधाम कार्यालयात पूर्वांचलातील कामांचा परिचय करून घेण्यासाठी गेलो होतो. ज्यांना भेटायचे होते त्यांची वाट पाहत कार्यालयात बसलो होतो. एक आजोबा कार्यालयात डोकावले. बाहेरचे पाहुणे आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी , “ कुठून आलात ? किती दिवस प्रवास आहे ? काय काय पाहिले ?” अशी चौकशी केली. महाराष्ट्रातून आलो आहोत हे कळल्यावर त्यांनी आम्हाला विचारले , “ तुम्ही रायगडावर जाऊन आला आहात का ?” आम्ही “हो , रायगड पाहिला आहे ,” असे सांगितल्यावर त्या आजोबांनी एकदम आम्हाला साष्टांग नमस्कार केला. आम्ही गोंधळलो. “काय झाले ?” म्हणून त्यांना   विचारले. मग आमच्या शेजारी बसत फालूदा   म्...