Skip to main content

मुझे जो जो चीज अच्छी आती हैं वो मैं सिखाऊंगा


                 
                        आसाममध्ये विवेकानंद केंद्राच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शोध परीक्षेसाठी अभ्यास वर्ग घेण्यासाठी मी आणि अमर परांजपे दिब्रुगडला गेलो होतो. अभ्यास वर्ग संपल्यानंतर विवेकानंद केंद्राच्या अरुणाचल प्रदेशमधील जयरामपूर येथील शाळेत केंद्रीय बोर्डाने नव्याने आणलेल्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेसमेंट या विषयासाठी शिक्षक आणि मुलांसाठी कार्यशाळा घेण्यासाठी जयरामपूरला गेलो होतो. 

              जयरामपूरजवळ पांगसू पास आहे. पांगसू पास ही खिंड भारत आणि म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेशाला जोडणारे सीमेवरचे ठिकाण आहे. भारत आणि म्यानमार याची सीमा निश्चित करणारा खुणेचा दगड या खिंडीच्या रस्त्यावर आहे.  येथे एक विशेष आठवडी बाजार भरतो.  बाजाराच्या दिवशी दोन्ही देशातील लोक परवाना काढून बाजारात येऊ शकतात आणि आपल्याला वस्तूंची खरेदी विक्री करू शकतात.  शासनाने  वस्तूंची एक यादी निश्चित केलेली आहे त्याची खरेदीविक्री होते. शेतमाल, भाजीपाला, स्थानिक कारागिरांच्या वस्तू देखील विक्रीसाठी असतात.   सीमेपलीकडील  लोकांना त्यांच्या देशातील मोठ्या बाजारात जायचे असेल तर काहीशे किलोमीटर प्रवास करावा लागतो, त्यापेक्षा त्यांना असा परवाना काढून भारतात येऊन खरेदी करणे सोयीचे जाते.  सीमेच्या दोन्ही बाजूंना अनेक गावांमध्ये एकमेकांचे नातेवाईक आहेत त्यांना पण त्या निमित्ताने एकमेकांना भेटत येते. 

              आम्ही जाणार होतो त्या दिवशी बाजार नसल्याने आम्हाला  परवाना मिळाला नाही.  पण आलोच आहोत तर बाजार नाहीतर किमान तो सीमा स्तंभ बघावा  म्हणून सकाळी लवकर उठलो आणि साडेचारच्या आसपास प्रवासाला सुरुवात केली.  आपल्याला माहिती आहे की आपण जसजसे पूर्वेकडेजावे  तसतसे लवकर उजाडते. अरुणाचलात उन्हाळ्यात सकाळी चारवाजता लख्ख उजाडलेले असते.  

                साधारण पाचसाडेपाच वाजले असतील पांगसू पासकडे जाताना वाटेतील नाम्पोंग लागले. ब्रह्मदेशाच्या सीमेजवळील हे शेवटचे मोठे गाव. गावातून जात असताना डाव्या बाजूला एक शाळा दिसली.  सरकारी शाळा होती. सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर  शाळेच्या व्हरांड्यात काही विद्यार्थी आणि एक शिक्षक योगासने करताना दिसली. शासकीय शाळेत एवढ्या सकाळी विद्यार्थी आणि शिक्षक काय करतात या उत्सुकतेपोटी गाडी थांबवली आणि  मागेवळून शाळेत गेलो. शिक्षक आणि त्यांचे पंधरावीस  विद्यार्थी योगासने करत होते. आम्हाला सुरुवातीला वाटले कुठल्यातरी स्वयंसेवी संस्थेचा कार्यकर्ता योगासने घेत असेल. सहज गप्पा माराव्यात म्हणून आम्ही शाळेच्या आवारात गेलो. आम्ही आल्याचे बघून त्या शिक्षकांनी त्यांचा  योगासनाचा  संच  पूर्ण केला आणि आमच्याशी बोलण्यासाठी पुढे आले. 

                   सिंगसर.... सिंगसर त्या शाळेत गणित-विज्ञानाचे अध्यापक. एवढ्या सकाळी मुलांबरोबर योगासने करत असल्याबद्दल त्यांचे सुरुवातीला अभिनंदन केले. मला तर सुरुवातीला हा  योगदिन सिंड्रोम वाटलं. 😊
 सिंगसर म्हणाले मी गेली काही वर्षे शाळेच्या जवळपास राहणारे जे विद्यार्थी सकाळी शाळेत येऊ शकतात त्यांच्याबरोबर नियमित योगासने करतो. सरांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी काही योगासने करून दाखवली . सरांनी कोणताही आधार न घेता शीर्षासन,  मयूरासन यासारखी  अवघड आसने देखील करून दाखवली. 

          गप्पा मारताना सर म्हणाले गेली अनेक वर्ष मी  घरी नियमित योगासनं करतो. पण एक दिवस असे वाटले की निसर्गतःच उत्तम शारीरिक कौशल्य असलेल्या या मुलांना मी गणित-विज्ञानाचे बरोबर योगासनेपण  शिकवायला हवी.  आपल्याला माहिती आहे की आज मणिपूर सारखे ईशान्य भारतातील छोटे राज्य  खेळामध्ये भारतासाठी सर्वाधिक पदके मिळवते.  हि कल्पना मनात येताच मी शाळेच्या मुख्याध्यापकांना योगासने शिकवण्यासाठी परवानगी मागितली.  तर ते म्हणाले तुमचा विषय वेगळा, शारीरिक शिक्षणाचे शिक्षक बघून घेतील योगासनांचे काय करायचे.  एकदोनदा मी रीतसर परवानगी काढायचा प्रयत्न केला.  पण शाळेच्या रचनेत हे करता येणे अवघड आहे असे दिसल्यानंतर मी विचार केला की सगळ्या शाळेसाठी किंवा वर्गासाठी हे जमणार नसेल तर आपण शाळेच्या आसपास राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत  बोलवू  आणि घरी योगासने करण्याच्या ऐवजी शाळेच्या आवारात  योगासने करू. इच्छा असणारे विद्यार्थी येतील. 

'मुझे जो जो चीज अच्छी आती हैं  वो मैं सिखाऊंगा' 

 मला जे चांगले येते ते माझ्या विद्यार्थ्यांना शिकवायची इच्छा मला स्वस्थ बसू देत नव्हती त्यामुळे त्या दिवसापासून शाळेत सहज चालत येऊ शकतील अशी हि वीस-पंचवीस मुले आणि मी सकाळी शाळेच्या आवारात योगासने करतो आणि मैदानावर शारीरिक व्यायाम करतो. 

                 म्हटलं तर बिहारमधून अरुणाचलातील एका दुर्गम भागातील शासकीय शाळेतील अध्यापक.  पण त्याला आपल्या जवळ असलेले ज्ञान आणि कौशल्य ज्ञान मुलांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती अशी इच्छाच अध्यापकाची प्रेरणा आहे. 

              चांगला अध्यापक होण्यासाठी आपल्याला पाठपुस्तकापलीकडे जाऊन आपला विषय पोचवता आला पाहिजे. पण वर्गात आपण फक्त विषय शिक्षक म्हणून उभे नसतो एक व्यक्ती म्हणून आपल्या गुणदोषांसह उभे असतो. माझ्या व्यक्तिमत्त्वाचे विद्यार्थ्यांसमोर सर्वार्थाने प्रगटीकरण झाले पाहिजे हि इच्छा अध्यापकाची प्रेरणा आहे. 

        मला अनेक शिक्षक माहिती आहेत की ते उत्तम गायक असतात, वादक असतात, निवेदक असतात, छायाचित्रकार असतात पण शाळेत ते फक्त विषय शिक्षक असतात. असे कप्पे करून कसे राहता येत ? 

       ज्याला हे कप्पे जोडता येतात आणि आपल्या जवळ जे जे उत्तम आहे ते प्रकट करता येते त्याच्या बाबतीत दोन गोष्टी नक्की होतात एक आपल्या शिक्षकाला काहीतरी येते आणि आपले शिक्षक 'भारी' आहेत हा भाव विद्यार्थांच्या मनात तयार होतो. असा प्रभाव अध्यापकाची  परिणामकारकता नक्कीच वाढवतो. 

                                                                                                                     प्रशांत दिवेकर ,
                                                                                                                    ज्ञान प्रबोधीनी,पुणे
                                                                                                                     



अमर परांजपे यांच्या बरोबर पांगसू पास येथील सीमा स्तंभाजवळ



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती                       जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.     ...

सहपुस्तक चाचणी

  सहपुस्तक चाचणी                मार्च महिन्यात शालांत परीक्षा सुरु झाल्यावर वर्तमानपत्रे ; दूरचित्रवाणीवर दहावी , बारावीच्या परीक्षेत चालू असलेल्या कॉपी पुरवठ्याची छायाचित्रे , बातम्या , चित्रफिती दिसू लागतात. माध्यमात चर्चा सुरु होते आणि आपण कशासाठी शिकवतो ? असा प्रश्न पडतो. त्याला प्रतिसाद म्हणून कॉपी मुक्ती अभियान सुरु केले जाते आणि हळूहळू त्याचाच अभिमान वाटायला लागतो. परीक्षा कशासाठी... ? वर्गात शिक्षक पुस्तकातील पाठ वाचून दाखवतात , स्पष्टीकरण म्हणून वाक्य बोलीभाषेत रुपांतर करून मांडतात , पाठाचा सारांश सांगतात. परीक्षेत पाठाखालील सरावासाठी दिलेलेच प्रश्न विचारतात. पाठाखालच्या सरावातील प्रश्नच विचारायचे असतील तर परीक्षा कशासाठी... ?              माझे एक मित्र वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. गप्पा मारताना ते मला म्हणाले , ' अमुक सालानंतर डॉक्टर झालेल्यांकडून उपचार करून घेऊ नका. ' मी विचारले , का ? काय झाले ? म्हणाले - "त्यावर्षी मला पहिल्या...

सत्यं च स्वाध्यायप्रवचने च।

  सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। प्रकृति के सानिध्य में रहकर उसके साथ एकत्व का अनुभव करना , स्वाध्याय का प्रथम सूत्र है , जो हमें ब्रह्मांड के निर्माण और उसके रहस्यों को जानने की प्रेरणा देता है। जड़-चेतन धारणाओं से जुड़ी मूलकण , वंशसूत्र , गुणसूत्र जैसी सूक्ष्मतम चीज़ों के अध्ययन से लेकर ब्रह्मांड के विस्तार के अध्ययन तक का व्यापक आयाम हमें प्रकृति के गहनतम रहस्यों में प्रवेश करने का मार्ग प्रदान करता हैं। ब्रह्मांड के विशाल विस्तार और उसकी अनंतता को समझने का प्रयास करने के लिए पहला उपनिषदिक अध्ययन सूत्र है "ऋतं च स्वाध्याय प्रवचने च।" ऋतम् का अध्ययन ब्रह्मांड के नियमों और संरचनात्मक सिद्धांतों को समझने की कुंजी है। ऋतम् का अध्ययन   केवल दार्शनिक धारणा नहीं है , बल्कि यह ब्रह्मांड की रचना और उसके संचालन में निहित नियमों को   वैज्ञानिक दृष्टिकोणद्वारा गहराई से समझना है। यह हमें   सिखाता है कि ब्रह्मांड किस प्रकार संतुलित और सुव्यवस्थित रूप से कार्य करता है। ऋतम् का स्वाध्याय करते समय हम अपने परिवेश को गहराई से समझने लगते हैं। प्रकृति के रहस्यों की खोज और उन...