Skip to main content

अभ्यास सहली योजताना ....







            परवा सहज जुन्या वह्या, कागदपत्रे पाहात असताना एक जुने सहलवृत्त सापडले. दहा वर्षांपूर्वीच्या आमच्या सहलीच्या वेळी केलेल्या डायरीतील नोंदी चाळता चाळता मन आठवणीत मागे गेले.

            मे महिन्यातील दहावीचे जादा तास चालू झाले. तेव्हा, एके दिवशी रत्नागिरीच्या 'गोगटे जोगळेकर महाविद्यालया' चे प्रा. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांचा 'कोकणातील भौगोलिक वैशिष्ट्ये' या विषयावर स्लाईड शो होता. स्लाईड शोनंतरच्या प्रश्नोत्तर व गप्पांत पाठ्यपुस्तकात अभ्यासलेली समुद्र, खाडी,पुळण आदी भौगोलिक वैशिष्ट्ये, जी सरांनी स्लाईडमधून दाखवली होती ती पाहण्यासाठी सुरेंद्र सरांबरोबर कोकण अभ्यास सहलीला जायचे ठरवले. 'सहलीची तयारी तुमची तुम्ही करणार असाल तर सहलीला परवानगी आहे', असे प्राचार्यांनी सांगितले.

            मग काय, रोज सहलीविषयीच चर्चा! किती दिवस जायचे? केव्हा? कोणत्या मार्गाने ? बरोबर काय काय न्यायचे? खर्च किती ? मुक्काम कुठे करायचा? असे अनेक प्रश्न निर्माण झाले. शेवटी  एक बैठक घेऊन कामांच्या यादया केल्या व  गट करून कामे वाटून दिली. संपर्काचे फोन करणे, भेटींच्या वेळा ठरवणे इ. ट्रॅव्हल एजंटना भेटून कमी दरात चांगली गाडी कोणाकडे मिळेल, यासाठी हेलपाटे घालून बस ठरवली. सर्व उरकता उरकता सहलीचा दिवस जवळ येत होता.

            पहिल्या दिवशी ताम्हिणी घाटातून कोकणात उतरताना वाटेत ताम्हिणीचे सुंदर जंगल लागले. या घाटात एक प्रचंड घळई (गॉर्ज) आहे. घाट उतरत असताना सह्याद्री पर्वतरांगा, लाव्हाचा थर, खडकांचे विविध प्रकार पाहायला मिळाले.

            कुडावळ्याला जाताना वाटेत सावित्री नदीची खाडी व मंडणगडचे पर्वतांतर्गत पठार लागले. कुडावळे येथे निसर्ग अभ्यासक दिलीप कुलकर्णी यांच्याबरोबर त्यांच्या घराजवळ असलेली देवराई पाहिली. निसर्ग संवर्धन व पर्यावरण समस्यांवर त्यांच्याशी झालेल्या गप्पांमुळे मजा आली. देवराईत निटम (अनावृत्तबीजी वनस्पती), हिरडा, बेहडा, सावर, कुडा, ऑर्किड, नेचे, दगडफूल, ब्राकेट फंगस यांसारख्या विविध वनस्पती, प्रचंड वेली पाहता आल्या. जंगल परिसंस्थेची ओळख झाली. वाटेत आम्ही पन्हाळे (काजी) येथील प्राचीन लेणी पाहण्यास गेलो, तो एक लेण्यांचा समूह आहे व त्यावर बौद्ध पंथ, नाथ पंथ, गणेश पंथ आदींचा प्रभाव जाणवतो. दापोली येथील श्री. विष्णू सोमण यांच्यासोबत लेण्यांचे वास्तुशास्त्र अभ्यासण्यात, लेण्यातील विविध शिल्पांत कोरलेले महाभारत, रामायण आदीतले प्रसंग ओळखण्यात आम्ही रंगून गेलो होतो. 

            या लेण्यांजवळून कोटजाई नदी वाहते. तिच्या काठाने हिंडताना नदीच्या अवस्था, खनन, संचयन कार्य आदींचा अभ्यास करता आला.

        रात्री विश्रांतीपूर्वी दिवसभरात पाहिलेल्या गोष्टींची उजळणी, टिपणे / नोंदी, नकाशे, रेखाटने पूर्ण करणे, गोळा केलेले नमुने योग्य प्रकारे साठविणे आदी कामे तितक्याच उत्साहात केली.

        दुसऱ्या दिवशी पानवळ येथील कोकण रेल्वेचा पूल पाहिला. आधुनिक वास्तुशास्त्राचा हा अप्रतिम नमुना आहे. गाडी जाताना पूल हादरताना अनुभवले आणि भौतिकशास्त्रातील नियम पहिल्यांदाच समजला. नंतर वाटेत लोटे परशुराम येथील मंदिर पाहिले. वाटेत वासिष्ठी नदीची खाडी लागली. खारफुटी वनस्पती, भरती-ओहोटीचा खाडीवर होणारा परिणाम आदी गोष्टींची माहिती झाली. गणेशगुळ्याच्या पुळणीवर हिंडताना किनाऱ्यांचे प्रकार, समुद्रकडा, तरंगघर्षित मंच, लाटा, समुद्राचे संचयन, विविध समुद्री प्राणी व वनस्पती इ. गोष्टी पाहिल्या.

        सकाळी लवकर उठून खास कोकणात असतात अशा देवळात उपासना केली व नंतर नारळी, पोफळी, आंबा, मिरी, लवंग, दालचिनी, जाम, रातांबा आदी वनस्पती पाहिल्या. रत्नागिरी येथे रत्नदुर्ग येथील सागरी गुहा पाहिली. रत्नागिरीच्या पुळणीवरून हिंडताना समुद्रामुळे होणारी धूप रोखण्यासाठी मानवाने केलेले विविध प्रयत्न समुद्राने कसे विफल केले हे जाणवत होते. 

        नंतर आम्ही लावगण येथील बंदर पाहण्यास गेलो. बंदरात नांगरलेल्या मोठ्या बोटीवर छोट्या होडीतून जाऊन दोराच्या शिडीच्या साहाय्याने बोटीवर चढलो. बोटीवर इंजिन रूम, , डेक, रडार यंत्रणा आदी गोष्टी बघितल्या. नंतर लावगण बंदराच्या निर्मितीसाठी झटणारे व्यवस्थापनप्रमुख श्री. दिलीप भटकर यांच्याशी झालेल्या गप्पांतून आम्हाला एका ध्येयवेड्या व्यक्तीचा परिचय झाला. लावगण हे एक खाजगी बंदर असून या बंदराचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे भारतातील एकमेव बंदर आहे की जेथे मुलीदेखील जहाज दुरुस्तीचे काम करतात.

           सहल संपवून पुण्यात आल्यावर आमचा पुढचा आठवडा सहलीचा अहवाल लिहिणे, अध्यापक, वर्गमैत्रिणींसमोर सहलीचे फोटो दाखवून माहिती सांगणे यात कसा संपला, हे कळलेच नाही. खरंच, या तीन दिवसांच्या सहलीत नियोजन कसे करायचे, निसर्गात हिंडत असताना कोणत्या गोष्टी बघायच्या, कशा बघायच्या, नोंदी कशा ठेवायच्या आदी गोष्टींची तोंडओळख झाली.

आजही एखादया सहलीचं नियोजन करताना या गोष्टी नकळत उपयोगी पडतात.

                                                              प्रशांत दिवेकर

                                                                              ज्ञान प्रबोधिनी,  पुणे 
प्रशिक्षक एप्रिल २००२ मध्ये प्रकाशित (अपरांत अभ्यास सहल ) 

Comments

Popular posts from this blog

आ. कै. उषाताईंबद्दल .....

  आ. कै. उषाताईंबद्दल  लेखन : स्मरणिकेसाठी माझा आणि उषाताईंचा पहिला संबंध २००१ मध्ये   एका मुलाखतीच्या निमित्ताने आला. प्रबोधिनीतील कामाचे दुसरे-तिसरे वर्ष असेल ,   थोडे जास्तीचे मानधन मिळण्यासाठी   प्रज्ञा मानसमध्ये एका प्रकल्पात मी काम करावे अशा कल्पनेतून पोंक्षेसरांनी मला ती मुलाखत द्यायला सांगितली होती. गिरीशराव , उषाताई आणि एक-दोन तज्ज्ञ असे पॅनल होते. मुलाखतीनंतर काही दिवसांनी मला उषाताईंना भेटण्यास सांगण्यात आले. मग त्यांच्याबरोबर थोडी सविस्तर प्रश्नोत्तरे झाली. प्रश्नोत्तराच्या शेवटी त्यांनी सांगितले , " आता इथे काम करायचे असेल तर ट्रेक , सहली , शिबिरे यांना मनात आले की जाता येणार नाही. " त्यावेळी प्रशालेत   आणि इतर अनेक विभागांबरोबर माझे असे मजेचे उद्योग चालू होते. प्रज्ञा मानसच्या पाचव्या मजल्यावरून प्रशालेच्या तिसऱ्या मजल्यावर येईपर्यंत विचार केला आणि खाली आल्यावर पोंक्षेसरांना सांगितले निवड झाली असली तरी त्यांना नाही म्हणून कळवा. त्यानंतर उषाताईंचा संबंध आला तो थेट आठ-दहा वर्षांनी , त्यावेळी मी सोलापूर प्रबोधिनीत निवासी होतो आणि उषाताई सोलाप...

Nation in Image: Symbols that Shape Nations

                                                          Symbols that Shape Nations This activity introduces students to how nations use visual symbols and personifications to express identity, unity, and political values. By examining global examples and comparing them with Abanindranath Tagore’s Bharat Mata, learners explore how imagery shapes nationalism and deepen their understanding of the Bharatiya concept of Rāṣṭra. Identify images and by using references complete the table   (Support Independent Learning, Comparison & analysis) 2.  Compare the above images with Abanindranath Tagore’s image of Bharat Mata. How does it reflect Indian values? (Analysis & synthesis) 3.  How does the practice of personifying nations—often through female figures—shape our understandin...

तंत्रज्ञानी नवे सहस्रक…

  तंत्रज्ञानी नवे सहस्रक … ज्ञान प्रबोधिनीत अनेक समूहगीते म्हणली जातात. त्यातील एका पद्याचे धृवपद आठवते. तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसे अध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे मानवाच्या समूह विकसनात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगीवर नियंत्रण, चाकाचा शोध, लोह खनिजाचा वापर असे या प्रवासातील महत्त्वाचे ठळक टप्पे नोंदवता येतील. या सहस्रकातील गेल्या चार शतकांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा झपाट्याने विकसित झाल्या आहेत. मानवी समाजाच्या शैक्षणिक रचनांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण हा गाभाघटक बनला आहे.   स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून   विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना   तंत्रज्ञानाच्या अभ्यास शाखांची तोंडओळख व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या ज्ञान शाखांची निवड करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्यानुभव,   टेक्निकलसारखे विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आले. आजच्या गरजा ...