Skip to main content

उस समय भी मजा आता था, अब भी मजा आता हैं।



            ... सात डोंगर आणि सात नद्या ओलांडून राजपुत्र राक्षसाच्या महालात पोचला आणि राक्षस बाहेर गेल्यावर त्याने पोपटाच्या डोळ्यातील राक्षसाचे प्राण हरण करून राजकन्येची सुटका केली.... परीकथेत हे वर्णन अनेकदा वाचलेले असते. पण असे एकात एक वसलेले सात डोंगर आणि सात नद्या हे वर्णन मला १९९९पर्यंत परीकथेत दुर्गमता सांगण्यासाठी केलेले वर्णन वाटत होते. मी पहिल्यांदा जेव्हा अरुणाचल प्रदेशला भेट दिली, तेव्हा परीकथेतील सात डोंगर, सात नद्या, सात दऱ्या हे प्रत्यक्षात एखाद्या प्रदेशात असू शकतात, याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. सात डोंगर, सात नद्या, सात दऱ्या ओलांडत प्रवास करणे किती अवघड, त्रासदायक आणि आव्हानात्मक असते, याचा अनुभव मी गेल्या वीस वर्षात अनेकदा त्या भागात प्रवास करताना घेतला आहे. ब्रह्मपुत्रेचा दर्या ओलांडून तिनसुकियाहून रोइंग, तेजूला पोचताना किंवा डोंगरामागून डोंगर ओलांडत तवांग, झीरोला पोचताना याचा अनुभव येतो. मला आठवतो २००५ मध्ये श्री. विजय स्वामींबरोबर केलेला मिश्मी टेकड्यांच्या प्रदेशातील रोइंग ते तेजू हा प्रवास. ते ६० किलोमीटरचे अंतर पार करायला सहा-सात तास लागले होते. अनेक नद्या ओलांडल्या. (काहीवेळा पात्राचा उतार बघून गाडी घातली , काहीवेळा चक्क गाडी बोटीवर चढवून...) वाटेतील एका नदीचे नाव पण मजेशीर होते ‘पगली’ अर्थात, तिला पाहिजे तशी वाहणारी.

           अरुणाचलमध्ये प्रवासाचे नियोजन करायचे म्हणजे सकाळी निघायचे आणि संध्याकाळी पोचू तेव्हा पोचू. संध्याकाळी इच्छित ठिकाणी पोचलो तर छान झाला प्रवास. एकदा मी आणि विवेकराव पोंक्षे सर तिनसुकियाहून रोइंगला जाण्यासाठी ब्रह्मपुत्रा ओलांडण्यासाठी फेरी बोट लागतात, त्या घाटावर तीन दिवस गेलो पण नदी ओलांडून पलीकडे अरुणाचलला जाता आले नाही.  एकंदरीत अरुणाचलातील प्रवास म्हणजे अनिश्चितता, काळजी आणि आव्हान. पण गेल्या पाच वर्षात चित्र झपाट्याने बदलते आहे. ब्रम्हपुत्रेवर नवीन पूल झाले आहेत आणि बोर्डर रोड ऑर्गनायझेशन ( BRO) सुंदर रस्ते बांधत आहेत.

                दिब्रुगड ते ताफ्रागांव हा प्रवास. ज्या प्रवासाला किमान एक दिवस लागायचा, तो प्रवास दोन वर्षांपूर्वी मी, ज्ञान प्रबोधिनीच्या हराळी केंद्राचे केंद्रप्रमुख अभिजित कापरे आणि विवेकानंद केंद्र विद्यालयाचे ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर पी.के. पांडे सरांनी चार तासात केला. वाटेत प्रवासात पांडे सर गप्पांमध्ये त्यांचे विवेकानंद केंद्र विद्यालयातील आणि अरुणाचल प्रदेशातील अनुभव सांगत होते. पांडे सर गेली पस्तीस वर्षे विवेकानंद केंद्राच्या  अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागातील विद्यालयामध्ये अध्यापन करत आहेत. अध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. प्रवासातील  गप्पांमध्ये  त्यांनी त्यांचे असंख्य अनुभव आमच्याबरोबर शेअर केले. अरुणाचलातील दुर्गम भागातील प्रवास, दरडी कोसळून रस्ते बंद होणे, त्यामुळे शाळेला होणारा अन्न आणि वस्तू पुरवठा विस्कळीत होणे याबद्दल ते बोलत होते. तसेच या निवासी शाळात उत्तर भारतातून एवढ्या दूर येऊन सहकुटुंब निवास करणे, सहकुटुंब राहताना येणाऱ्या अडचणी, त्यातील आव्हाने, संपर्क आणि प्रवासाबद्दल बोलताना पांडे सरांनी बरेच अनुभव सांगितले. पांडे सर  विवेकानंद केंद्र विद्यालय, निउसा येथे अध्यापन करत होते तेव्हाचा अनुभव सांगताना ते म्हणाले, "माझा मुलगा उच्च शिक्षणासाठी बाहेर होता. त्याला एक फोन करण्यासाठी सकाळी शाळेतून निघून चालत निउसा गावात यायचे ,सकाळची बस पकडायची, तीन तासांचा प्रवास करून लोंगडींग या मोठ्या गावात यायचे, STD बूथ मधून फोन करून  पाचदहा  मिनिटे मुलाशी बोलायचं, तासाभराने जाणारी परतीची गाडी पकडायची, परत तीन तासाचा प्रवास आणि चालत शाळेत पोचायचे. पाच मिनिटं मुलाबरोबर फोनवर बोलण्यासाठी संपूर्ण दिवस खर्च करावा लागायचा"... पांडेजींचे अनुभव ऐकत संध्याकाळी दिब्रुगडहून निघालेलो आम्ही रात्री मुक्कामी ताफ्रागांवला पोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी विवेकानंद केंद्र विद्यालय, ताफ्रागांवची शाळा बघून रोइंगाला निघालो. बोर्डर रोड ऑर्गनायझेशनने बांधलेल्या सुंदर तुळतुळीत रस्त्याने तेजू ते रोइंग प्रवास दीड तासात पूर्ण केला. जे अंतर पार करायला पंधरा वर्षांपूर्वी दिवस लागला होता, तो प्रवास यावेळी दीड तासात केला.
           
तुळतुळीत रस्त्याने प्रवास करताना पांडे सरांना विचारले, ‘सर,आता अरुणाचलात राहताना छान वाटत असेल ना !  मोबाईल फोन आले, छान रस्ते झाले.’ नेहमीप्रमाणे प्रसन्न हसून पांडे सरांनी माझ्याकडे बघितले आणि म्हणाले, ‘प्रशांतजी उस समय भी मजा आता था अब भी मजा आता हैं।'

    खरंच, विवेकानंद केंद्राच्या शाळांमधील असे असंख्य प्रसंग आणि त्यांच्या न नोंदवलेल्या  कथा !!   
             विवेकांनंद केंद्राचे जीवनव्रती कार्यकर्ते असोत वा विवेकानंद केंद्र विद्यालयातील अध्यापक असोत त्यांच्या बरोबरच्या गप्पांच्या ओघात असे न नोंदवलेले प्रसंग, कथा अचानक पुढे येतात आणि    त्यांच्या कर्मयोगाचे अचानक अवचित दर्शन होते .









Comments

  1. खूपच छान प्रशांत...
    त्यावेळची मजा मी घेऊ शकलो असतो तर सरांना सुद्धा खूप आनंद झाला असता.
    जानेवारी फेरीमध्ये अजून प्रदेश समजला.

    ReplyDelete
  2. सियांग नदीच्या गार वाऱ्यात दिब्रुगड (सोनोरी घाट) ते पासीघाट (निमोती घाट) चार तासांचा पहिलाच प्रवास आठवला.

    ReplyDelete
  3. प्रशांत, फारच सुरेख वर्णन.अजून माझा आणि अरुणाचल प्रदेशाचा योग आलेला नाही पण हे वाचून लवकरच योग आणला पाहिजे असे आतून वाटायला लागले आहे.

    ReplyDelete
  4. 2015 मध्ये एका दिवसात इटानगर ते दिब्रूगड आणि पुढे तिनसुखीय मार्गे जयरामपूर असा आपण केलेला प्रवास आठवला. त्यावेळी ब्राह्मपुत्रेवर पूल तयार होत होता. ऊस समय की मजा ले चुके है.... आता परत एकदा जाऊन इस समय की मजा लेंनी चाहीये...असं वाटायला लागलंय

    ReplyDelete
  5. कोणालाही हेवा वाटावा असा अनुभव आहे सर हा!

    ReplyDelete
    Replies
    1. परिस्थितीत बदल ऐकून खूप आनंद झाला आता संत्री, अननस, आले यांना मार्केट मिळेल पण वाईट गोष्टी पण घुस तील त्याला कुंपण घालावे लागेल विकास संस्कृती मधून यावर खूप भर. द्यावा लागेल तुमच्या प्रवासाचा पण नक्कीच प्रभाव झाला असेल आपल्याला कंबर कसून कामाला लागले पाहिजे
      प्रा थ ना

      Delete
  6. छान अनुभव 👌

    ReplyDelete
  7. आपण केलेले वर्णन वाचून प्रत्यक्ष तिथली परिस्थिती डोळ्यासमोरून गेल्यासारखे वाटले... धन्य ते विवेक पोंक्षे सर आणि पांडे सर आणि असेच सर्व जीवनव्रती कार्यकर्ते. माझा प्रणाम🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वंदे गुरु परंपरा

वंदे गुरु परंपरा गुरुपौर्णिमा   अर्थात   ज्ञानाच्या   परंपरांचे   पाईक   होण्याचा   दिवस इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) भगवद् गीतेत देखील श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना ज्ञानाच्या परंपरेचा दाखला दिला आहे. ते म्हणतात ‘ मी हा अव्यय ( अविनाशी ) योग सूर्याला सांगितला. सूर्याने मनुला सांगितला व मनूने  इक्ष्वाकू   सांगितला.  भारतीय परंपरेत नवीन ज्ञानतत्वाज्ञाच्या शाखांची मांडणी करताना देखील असा गुरु परंपरेचा वारसा सांगितला जातो. कारण ज्ञानाच्या परंपरेच्या संक्रमणातूनच ज्ञान वृद्धिगत होत जाते.                ज्ञान   प्रबोधिनीने   पथकाधिपती   म्हणून   समर्थ   रामदास ,  स्वामी   दयानंद ,  स्वामी   विवेकानंद   आणि   योगी   अरविंद या चार व्यक्तींचा स्वीकार केला आहे.   त्यापैकी एक म्हणजे समर्थ रामदास! कवि   वामन   पंडितांनी   समर्थांची ...

Vande Guru Parampara

  Vande Guru Parampara Guru Purnima – Honouring Our Gurus, Upholding the Tradition इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) In the Bhagavad Gita, while advising Arjuna, Lord Krishna gives an example of the tradition of knowledge. He says, “I imparted this indestructible Yoga to the Sun (Vivasvan), who passed it on to Manu, and Manu, in turn, passed it on to Ikshvaku.” In the Indian tradition, whenever new knowledge or philosophy is presented, the legacy of the Guru's tradition is also acknowledged—because knowledge flourishes only when its lineage is preserved and passed on. Jnana Prabodhini has accepted four great personalities—Samarth Ramdas, Swami Dayananda, Swami Vivekananda, and Yogi Arvind—as its visionaries, and pathfinders who have shaped Jnana Prabodhini ideals and direction. Today, let us learn about Samarth Ramdas. The poet Vaman Pandit praises him with the following verse. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे...

महाराष्ट्रधर्म

                                                                                       महाराष्ट्रधर्म १९९९ साली महिनाभराच्या ईशान्य भारत दौऱ्यात गुवाहाटी येथे केशवधाम कार्यालयात पूर्वांचलातील कामांचा परिचय करून घेण्यासाठी गेलो होतो. ज्यांना भेटायचे होते त्यांची वाट पाहत कार्यालयात बसलो होतो. एक आजोबा कार्यालयात डोकावले. बाहेरचे पाहुणे आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी , “ कुठून आलात ? किती दिवस प्रवास आहे ? काय काय पाहिले ?” अशी चौकशी केली. महाराष्ट्रातून आलो आहोत हे कळल्यावर त्यांनी आम्हाला विचारले , “ तुम्ही रायगडावर जाऊन आला आहात का ?” आम्ही “हो , रायगड पाहिला आहे ,” असे सांगितल्यावर त्या आजोबांनी एकदम आम्हाला साष्टांग नमस्कार केला. आम्ही गोंधळलो. “काय झाले ?” म्हणून त्यांना   विचारले. मग आमच्या शेजारी बसत फालूदा   म्...