Skip to main content

उस समय भी मजा आता था, अब भी मजा आता हैं।



            ... सात डोंगर आणि सात नद्या ओलांडून राजपुत्र राक्षसाच्या महालात पोचला आणि राक्षस बाहेर गेल्यावर त्याने पोपटाच्या डोळ्यातील राक्षसाचे प्राण हरण करून राजकन्येची सुटका केली.... परीकथेत हे वर्णन अनेकदा वाचलेले असते. पण असे एकात एक वसलेले सात डोंगर आणि सात नद्या हे वर्णन मला १९९९पर्यंत परीकथेत दुर्गमता सांगण्यासाठी केलेले वर्णन वाटत होते. मी पहिल्यांदा जेव्हा अरुणाचल प्रदेशला भेट दिली, तेव्हा परीकथेतील सात डोंगर, सात नद्या, सात दऱ्या हे प्रत्यक्षात एखाद्या प्रदेशात असू शकतात, याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. सात डोंगर, सात नद्या, सात दऱ्या ओलांडत प्रवास करणे किती अवघड, त्रासदायक आणि आव्हानात्मक असते, याचा अनुभव मी गेल्या वीस वर्षात अनेकदा त्या भागात प्रवास करताना घेतला आहे. ब्रह्मपुत्रेचा दर्या ओलांडून तिनसुकियाहून रोइंग, तेजूला पोचताना किंवा डोंगरामागून डोंगर ओलांडत तवांग, झीरोला पोचताना याचा अनुभव येतो. मला आठवतो २००५ मध्ये श्री. विजय स्वामींबरोबर केलेला मिश्मी टेकड्यांच्या प्रदेशातील रोइंग ते तेजू हा प्रवास. ते ६० किलोमीटरचे अंतर पार करायला सहा-सात तास लागले होते. अनेक नद्या ओलांडल्या. (काहीवेळा पात्राचा उतार बघून गाडी घातली , काहीवेळा चक्क गाडी बोटीवर चढवून...) वाटेतील एका नदीचे नाव पण मजेशीर होते ‘पगली’ अर्थात, तिला पाहिजे तशी वाहणारी.

           अरुणाचलमध्ये प्रवासाचे नियोजन करायचे म्हणजे सकाळी निघायचे आणि संध्याकाळी पोचू तेव्हा पोचू. संध्याकाळी इच्छित ठिकाणी पोचलो तर छान झाला प्रवास. एकदा मी आणि विवेकराव पोंक्षे सर तिनसुकियाहून रोइंगला जाण्यासाठी ब्रह्मपुत्रा ओलांडण्यासाठी फेरी बोट लागतात, त्या घाटावर तीन दिवस गेलो पण नदी ओलांडून पलीकडे अरुणाचलला जाता आले नाही.  एकंदरीत अरुणाचलातील प्रवास म्हणजे अनिश्चितता, काळजी आणि आव्हान. पण गेल्या पाच वर्षात चित्र झपाट्याने बदलते आहे. ब्रम्हपुत्रेवर नवीन पूल झाले आहेत आणि बोर्डर रोड ऑर्गनायझेशन ( BRO) सुंदर रस्ते बांधत आहेत.

                दिब्रुगड ते ताफ्रागांव हा प्रवास. ज्या प्रवासाला किमान एक दिवस लागायचा, तो प्रवास दोन वर्षांपूर्वी मी, ज्ञान प्रबोधिनीच्या हराळी केंद्राचे केंद्रप्रमुख अभिजित कापरे आणि विवेकानंद केंद्र विद्यालयाचे ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर पी.के. पांडे सरांनी चार तासात केला. वाटेत प्रवासात पांडे सर गप्पांमध्ये त्यांचे विवेकानंद केंद्र विद्यालयातील आणि अरुणाचल प्रदेशातील अनुभव सांगत होते. पांडे सर गेली पस्तीस वर्षे विवेकानंद केंद्राच्या  अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागातील विद्यालयामध्ये अध्यापन करत आहेत. अध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. प्रवासातील  गप्पांमध्ये  त्यांनी त्यांचे असंख्य अनुभव आमच्याबरोबर शेअर केले. अरुणाचलातील दुर्गम भागातील प्रवास, दरडी कोसळून रस्ते बंद होणे, त्यामुळे शाळेला होणारा अन्न आणि वस्तू पुरवठा विस्कळीत होणे याबद्दल ते बोलत होते. तसेच या निवासी शाळात उत्तर भारतातून एवढ्या दूर येऊन सहकुटुंब निवास करणे, सहकुटुंब राहताना येणाऱ्या अडचणी, त्यातील आव्हाने, संपर्क आणि प्रवासाबद्दल बोलताना पांडे सरांनी बरेच अनुभव सांगितले. पांडे सर  विवेकानंद केंद्र विद्यालय, निउसा येथे अध्यापन करत होते तेव्हाचा अनुभव सांगताना ते म्हणाले, "माझा मुलगा उच्च शिक्षणासाठी बाहेर होता. त्याला एक फोन करण्यासाठी सकाळी शाळेतून निघून चालत निउसा गावात यायचे ,सकाळची बस पकडायची, तीन तासांचा प्रवास करून लोंगडींग या मोठ्या गावात यायचे, STD बूथ मधून फोन करून  पाचदहा  मिनिटे मुलाशी बोलायचं, तासाभराने जाणारी परतीची गाडी पकडायची, परत तीन तासाचा प्रवास आणि चालत शाळेत पोचायचे. पाच मिनिटं मुलाबरोबर फोनवर बोलण्यासाठी संपूर्ण दिवस खर्च करावा लागायचा"... पांडेजींचे अनुभव ऐकत संध्याकाळी दिब्रुगडहून निघालेलो आम्ही रात्री मुक्कामी ताफ्रागांवला पोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी विवेकानंद केंद्र विद्यालय, ताफ्रागांवची शाळा बघून रोइंगाला निघालो. बोर्डर रोड ऑर्गनायझेशनने बांधलेल्या सुंदर तुळतुळीत रस्त्याने तेजू ते रोइंग प्रवास दीड तासात पूर्ण केला. जे अंतर पार करायला पंधरा वर्षांपूर्वी दिवस लागला होता, तो प्रवास यावेळी दीड तासात केला.
           
तुळतुळीत रस्त्याने प्रवास करताना पांडे सरांना विचारले, ‘सर,आता अरुणाचलात राहताना छान वाटत असेल ना !  मोबाईल फोन आले, छान रस्ते झाले.’ नेहमीप्रमाणे प्रसन्न हसून पांडे सरांनी माझ्याकडे बघितले आणि म्हणाले, ‘प्रशांतजी उस समय भी मजा आता था अब भी मजा आता हैं।'

    खरंच, विवेकानंद केंद्राच्या शाळांमधील असे असंख्य प्रसंग आणि त्यांच्या न नोंदवलेल्या  कथा !!   
             विवेकांनंद केंद्राचे जीवनव्रती कार्यकर्ते असोत वा विवेकानंद केंद्र विद्यालयातील अध्यापक असोत त्यांच्या बरोबरच्या गप्पांच्या ओघात असे न नोंदवलेले प्रसंग, कथा अचानक पुढे येतात आणि    त्यांच्या कर्मयोगाचे अचानक अवचित दर्शन होते .









Comments

  1. खूपच छान प्रशांत...
    त्यावेळची मजा मी घेऊ शकलो असतो तर सरांना सुद्धा खूप आनंद झाला असता.
    जानेवारी फेरीमध्ये अजून प्रदेश समजला.

    ReplyDelete
  2. सियांग नदीच्या गार वाऱ्यात दिब्रुगड (सोनोरी घाट) ते पासीघाट (निमोती घाट) चार तासांचा पहिलाच प्रवास आठवला.

    ReplyDelete
  3. प्रशांत, फारच सुरेख वर्णन.अजून माझा आणि अरुणाचल प्रदेशाचा योग आलेला नाही पण हे वाचून लवकरच योग आणला पाहिजे असे आतून वाटायला लागले आहे.

    ReplyDelete
  4. 2015 मध्ये एका दिवसात इटानगर ते दिब्रूगड आणि पुढे तिनसुखीय मार्गे जयरामपूर असा आपण केलेला प्रवास आठवला. त्यावेळी ब्राह्मपुत्रेवर पूल तयार होत होता. ऊस समय की मजा ले चुके है.... आता परत एकदा जाऊन इस समय की मजा लेंनी चाहीये...असं वाटायला लागलंय

    ReplyDelete
  5. कोणालाही हेवा वाटावा असा अनुभव आहे सर हा!

    ReplyDelete
    Replies
    1. परिस्थितीत बदल ऐकून खूप आनंद झाला आता संत्री, अननस, आले यांना मार्केट मिळेल पण वाईट गोष्टी पण घुस तील त्याला कुंपण घालावे लागेल विकास संस्कृती मधून यावर खूप भर. द्यावा लागेल तुमच्या प्रवासाचा पण नक्कीच प्रभाव झाला असेल आपल्याला कंबर कसून कामाला लागले पाहिजे
      प्रा थ ना

      Delete
  6. छान अनुभव 👌

    ReplyDelete
  7. आपण केलेले वर्णन वाचून प्रत्यक्ष तिथली परिस्थिती डोळ्यासमोरून गेल्यासारखे वाटले... धन्य ते विवेक पोंक्षे सर आणि पांडे सर आणि असेच सर्व जीवनव्रती कार्यकर्ते. माझा प्रणाम🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

The Healing Knife!!

The Healing Knife!! Seventeen-year-old George, was a lieutenant in the White Russian Navy. He was sent on an open front against a group of Bolshevik soldiers. Upon landing on the coast, his detachment was ordered to attack the Bolshevik trench.  George led his detachment and launched a fierce attack on the ditch. The war gun firing storms. Descending into the ditch, bayonets and the swords began to ring. Wounded soldiers were sent back to the base and replaced by new soldiers. One of George's friends got a bullet shot while fighting. As soon as he saw the hit, George sent help to his place, sending his friend back to the basecamp for medical aid. In the evening, the intensity of the battle subsided. Both sides retreated at appropriate distances and secured their respective fronts. That night after returning to the basecamp, George while interrogating wounded soldiers, found his friend in a makeshift treatment centre lit by torches and fires.  The friend was badly injured...

Technology Enhanced Teaching

  Technology Enhanced Teaching                                                                                                                  Prashant Divekar                                                                                           Jnana Prabodhini, Pune The Need for Digital Teacher Training Despi...

Nurturing the Sankalpshakti i.e. Power of Resolution

  Nurturing the Sankalpshakti i.e. Power of Resolution through Varsharambha and Varshant Upasana   Dear DAV Teachers, I trust this letter finds you in good health and flourishing in your noble mission of shaping the minds and hearts of our students. I am compelled to express my deepest appreciation on behalf of team Jnana Prabodhini for your dedicated efforts in organizing and facilitating Varshant Upasana at DAV. To conclude this year-long journey from Varsharambha Upasana to Varshant Upasana , we reflect on our conviction regarding the indispensable role of this process in cultivating the Power of resolution ( Sankalpshakti ) among our students. As we continue to uphold the rich tradition of educational samskara rituals pioneered by Jnana Prabodhini, such as the Vidyarambh, Varsharambh, Varshant, and Vidyavrat , they embody the essence of Bharatiya educational philosophy. Through these ceremonies, we seek to imbue our students with a sense of purpose and dir...