Skip to main content

तंत्रस्नेही अध्यापकत्व : ४


तंत्रस्नेही अध्यापकत्व : ४

माणूस का शिकतो ? कशासाठी शिकतो ?  कसा शिकतो ?

हे तीन प्रश्न अध्यापकाने स्वतःला सतत विचारत राहिले पाहिजे. या प्रश्नांवरील चिंतनाने आणि आपण योजत असलेल्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा आढावा वरील प्रश्नांसंदर्भात घेत राहिल्याने अध्यापकाची अध्ययन प्रक्रियेबद्दलची जाणीव विस्तारत राहते. आपल्या अध्यापनाचे उद्दिष्ट ठरवण्यासाठी, अध्यापन पद्धती निश्चित करण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक शैक्षणिक साधनांची; रचनांची निर्मिती करण्यासाठी याचा निश्चित उपयोग होतो.

ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया कशी घडते ?



वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे ज्ञानग्रहणाची प्रक्रिया पाच टप्प्यात घडते.

१.      अध्ययन सिद्धता
२.      नवीन आशयाची ओळख
३.      अध्ययनाचे दृढीकरण
४.      अध्ययनाचे उपयोजन
५.      अध्ययनाचा आढावा

हे एक पाच टप्प्याचे अध्ययनचक्र आहे.

उत्सुकता, आवड, गरज यामुळे माणूस एखादी नवीन संकल्पना, कौशल्य शिकण्यास तयार होतो. अशी तयारी झाल्यानंतर मार्गदर्शक शोधून मार्गदर्शकाकडून नवीन आशयाची ओळख करून घेतो. नव्याने शिकलेला आशय स्वतःमध्ये रुजवण्यासाठी सराव करतो; त्या आशयाबद्दल जास्तीची माहिती मिळवतो.  नव्याने शिकलेली संकल्पना वापरून बघतो आणि मला नवीन ज्ञान वापरता आले की नाही याबद्दल विचार करतो. वापरता आले तर त्याला आनंद होतो आणि नाही वापरता आले तर काय चुकले? का जमले नाही? असा विचार करून त्या त्रुटी दूर करण्याचे ठरवून परत नवीन ज्ञान मिळवण्यास सिद्ध होतो. 

अगदी स्वयंपाकघरात एखादा नवीन पदार्थ करण्यास शिकतानासुद्धा वरील टप्प्यातून आपण कळत नकळत जात असतो. मुलाला रोज डब्यात काय द्यायचे, लग्नानंतर नवीन जबाबदारी म्हणून , एखाद्या रेसिपी शो नन्तर उत्सुकता म्हणून नवीन पदार्थ शिकण्यास सुरुवात होते. मग तो पदार्थ कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी आईची / रुचिराची / मधुराज् रेसिपी चॅनेलचे मार्गदर्शन घेवून नवीन पदार्थाची ओळख करून प्रत्यक्ष तो पदार्थ तयार केला जातो, घरात तो आवडला नाही आवडला तरी परत परत करून प्रक्रिया नेमकी केली जाते. मग घरी विशेष कार्यक्रम असेल,पाहुणे येणार असतील तर तो पदार्थ मुद्दाम केला जातो म्हणजे आधी जे शिकलो ते उपयोगाला आले. पाहुणे कौतुक करता वा काही वेळा पदार्थ फसतो तेव्हा काय छान झाले काय चुकले याबद्दल विचार करून पुढच्यावेळी परत तीच कृती नव्या कल्पनांसह केली जाते. हेच ते अध्ययन चक्र आहे.

शाळेसारख्या औपचारिक रचनेत हे अध्ययन चक्र अध्यापकाने योजायचे असते आणि घडवून आणायचे असते. हे घडवून आणण्यासाठी अध्यापकाला आपला विद्यार्थी, आपली शालेय रचना आणि उपलब्ध साधने यांचा विचार करून अध्ययन अनुभवाची योजना करावी लागते. याठिकाणी डिजिटल शैक्षणिक तंत्रज्ञान अध्यापकाच्या मदतीला येते.

पाच   प्रकारच्या डिजिटल तंत्रांचा वापर अध्यापकाला करता येणे महत्त्वाचे आहे.

अ.      अध्यापनासाठी उपयुक्त तंत्रज्ञान
आ.     मूल्यमापनासाठी उपयुक्त तंत्रज्ञान
इ.       नोंदी, दस्तऐवजीकरण, माहितीच्या संग्रहासाठी उपयुक्त तंत्रज्ञान
ई.       व्यवस्थापनासाठी उपयुक्त तंत्रज्ञान
उ.      संपर्क-संवादासाठी उपयुक्त तंत्रज्ञान


नमुना तक्ता दिला आहे, त्यात भर घालवी 

तंत्रस्नेही अध्यापकासाठी आज अशी डिजिटल अॅप्लिकेशन्स उपलब्ध झाली आहेत. अशी अॅप्लिकेशन्स शोधून ती वापराची कशी यावर प्रभुत्व मिळवून, अॅप्लिकेशन्सची बलस्थाने आणि मर्यादा याचा विचार करून तो योजत असलेल्या अध्ययन प्रक्रियेत त्यांचा समावेश करण्याची योजना अध्यापकाला आखावी लागेल.

उदाहरणादाखल  अध्ययन चक्रातील पहिल्या पायरीसाठी वरील पाच प्रकारांपैकी कोणती डिजिटल अॅप्लिकेशन्स वापरता येतील, हे बघू.

अध्ययन सिद्धता :
                        उत्सुकता, आवड, गरज यामुळे विद्यार्थी एखादी नवीन संकल्पना, कौशल्य शिकण्यास तयार होतो. अर्थात शालेय वातावरणात नाईलाज म्हणून पण शिकत असतो. अशावेळ अध्यापक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्याची अध्ययन सिद्धता करून घेऊ शकतो आणि विद्यार्थ्याच्या अध्ययन सिद्धतेनुसार अध्यापनासाठी स्वतःची तयारी करू शकतो.

विद्यार्थ्याच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकते. युट्यूबवर उपलब्ध असलेले अनेक व्हिडीओ ,ज्यांची लांबी पाच मिनिटांपेक्षा कमी आहे, त्याचा वापर टीजर वा ट्रेलरसारखा करता येतो. मी परिसर अभ्यास,जीवशास्त्र, भूगोल  शिकवताना नॅशनल जिओग्राफिक, डिस्कवरी यासारख्या चॅनल्सवरील मालिकांच्या जाहिराती, नागरिकशास्त्र शिकवताना सो-सॉरी सारखी पॉलिटून्स यांचा वापर करतो. 

दूरस्थ शिक्षणात असे ऑडिओ-व्हिडीओ व्हाट्सअप सारख्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचवू शकतो  किंवा गुगल क्लासरूमसारख्या  आपल्या लर्निंग प्लॅटफॉर्मवर बघण्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतो.  

अध्ययन सिद्धतेतील अध्यापक  म्हणून महत्त्वाची गोष्ट म्हणजे; अध्यापक म्हणून आपल्याला विद्यार्थी ती संकल्पना शिकण्यासाठी आवश्यक त्या पूर्वज्ञानाच्या कोणत्या टप्प्यावर आहेत याचा अंदाज येणे आणि  त्यानुसार विद्यार्थ्याची उजळणी करून घेणे.

पारंपरिक रूढ अध्यापनात वेळेच्या मर्यादेमुळे या दोन्हीसाठी पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. आदर्श स्थितीत नैदानिक चाचणी तयार करून मग ती मुलांकडून सोडवून घेऊन मग तपासून त्याचे विश्लेषण करणे अपेक्षित आहे. पण यासाठी वेळ काढणे खरंच अवघड आहे. मग आपण वर्गात काही प्रश्न विचारून वर्गाचा अंदाज घेतो आणि आपली अध्यापनाची योजना  आखतो. पण आज तंत्रस्नेही अध्यापनाच्या युगात आपण संकल्पनेवर आधारित पाच बहुपर्यायी  प्रश्नांची पूर्वज्ञान चाचणी तयार करून त्याचा गुगल फॉर्म तयार करू शकतो, तो आपल्या गुगल क्लासरूममध्ये विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतो वा त्याची लिंक व्हाट्सअॅप, ई-मेलने पाठवू शकतो. विद्यार्थ्यांनी चाचणी सोडवून जमा केली की, चाचणी तपासणे, त्याचे विश्लेषण करणे आणि चाचणीचा विश्लेषण अहवाल तयार करणे ही कामे तंत्रज्ञानावर सोपवून आपण गुगलफॉर्मच्या  निकालाचा वापर आपल्या पाठ नियोजनसाठी करू शकतो. जे काम करण्यासाठी आपल्याला काही दिवस लागले असते; ते काम क्षणात आपल्यासाठी करणारी डिजिटल अॅप्लिकेशन्स आज ओपन सोर्समध्ये मोफत उपलब्ध आहेत. 
मी गेल्या वर्षभरात काही शिक्षक प्रशिक्षण वर्गात गुगल फॉर्मचा वापर करून प्रशिक्षणापूर्वी आणि प्रशिक्षणानंतर पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी घेतली प्रशिक्षणाचा आशय नेमका करण्यासाठी आणि प्रशिक्षणाची परिणामकारकता तपासण्यासाठी गुगल फॉर्ममधून जे आलेख तात्काळ उपलब्ध झाले, याचा नक्कीच उपयोग झाला.
अध्ययन चक्रातील पहिल्या पायरीचा जसा तपशिलात विचार केला त्या प्रमाणे प्रत्येक पायरीसाठीच्या उद्दिष्टांचा विचार करून कोणत्या शैक्षणिक उद्दिष्टांसाठी आपल्याला तंत्रज्ञान लागणार आहे हे नक्की करून त्यासाठीची अॅप्लिकेशन्स शोधून ती वापरण्याचे कौशल्य मिळवावे लागेल.
खालील तक्त्यात वरील अध्ययन पायऱ्यांसाठी  कोणती अॅप्लिकेशन्स उपयोगी पडतील याचे नमुना दिला आहे. यात जरूर भर घालावी. 


नमुना तक्ता दिला आहे, त्यात भर घालवी 




आंतरजालावर अशा डिजिटल अॅप्लिकेशन्सचा शोध घेऊन त्यांची अध्ययनचक्राशी  सांगड घालता येणे म्हणजे तंत्रस्नेही अध्यापकत्व.

                                                                                        प्रशांत दिवेकर
                                                                                ज्ञान प्रबोधिनी, पुणे

Comments

  1. खूपच छान सर👍नवीन पदार्थ शिकताना होणार्‍या प्रक्रियेचे उदाहरण अगदी छान समर्पक!

    ReplyDelete
  2. Nice information for ..everyone as make life interested and enjoying ..new things .. experience💐

    ReplyDelete
  3. Prashant sir, thanks for the informative yet crisp article.

    ReplyDelete
  4. अतिशय माहितीपूर्ण लेख प्रशांत जी

    ReplyDelete
  5. Khup upyouqt mahiti dilit sir thanks.

    ReplyDelete
  6. खूपच मार्गदर्शक लेख, धन्यवाद सर

    ReplyDelete
  7. सखोल आणि शास्त्रशुद्ध मांडणी छान

    ReplyDelete
  8. Good information sir, we can use Microsoft word,conva calendar,sir it's four A activities. Acquire, Absorb, Apply,Act.

    ReplyDelete
  9. खूप छान व उपयुक्त माहिती मिळाली त्याचा आम्ही अध्ययन प्रक्रियेत नक्कीच वापर करू धन्यवाद 🙏

    ReplyDelete
  10. सध्या च्या काळात अतिशय उपयुक्त व प्रेरक असाच हा घटक आहे.आपण नवीन घटका ची ओळख करून देणे साठी Live Board हे app ही वापरून संपर्क सत्र घेऊ शकतो.
    माझ्या नेहमीच्या अध्ययन अध्यापन मध्ये मी नेहमीच वरील सर्व च अप्लिकेशनस चा वापर करत असते.मी माझ्या इयत्ता सातवीतील सर्वच विद्यार्थ्यांना डिजिटल प्रकल्प दिलेले आहेत, माझ्या विद्यार्थ्यांनी आकर्षक अशा ppt स्वतः बनवून त्या चे वर्गात सादरीकरण केले.पानिपत इतिहास, महाराष्ट्रातील संत, नैसर्गिक प्रदेश, मृदा,इत्यादी विषय घेऊन अगदी सहज मुलांनी सादरीकरण केलं.
    पाठ्य पुस्तकातील qr code वापरून विद्यार्थी त्या घटका ची संदर्भ माहिती संकलित करतात, you tub वर एखद्या संकल्पना शोधून वर्गात चर्चा करतात.
    मी गूगल फॉर्म द्वारे अनेक घरी करता येतील अशा सराव चाचणी परीक्षा तयार करून या lock down मधे ही माझ्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रक्रियेत सक्रिय ठेवलेले आहे.या शिवाय test moz द्वारे ही आपण चाचण्या बनवू शकतो.
    आपल्या या लेखामुळे या तंत्रज्ञान युगात मी अजून मजल मारून माझ्या विद्यार्थ्यांना नेहमीच गतीशील ठेवू शकेन.
    या लेखासाठी आभारी आहे.

    ReplyDelete
  11. सौ. मनिषा थोरात सांगली मनपाJune 29, 2020 at 2:00 AM

    खुप छान माहिती दिली सर यातील विविध ॲपचा वापर मी नेहमी करत असते कारण मुलांना सतत वेगवेगळे शैक्षणिक अनुभव देण्यासाठी तंत्रज्ञान वापराशिवाय सध्यातरी दुसरा पर्याय नाही.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वंदे गुरु परंपरा

वंदे गुरु परंपरा गुरुपौर्णिमा   अर्थात   ज्ञानाच्या   परंपरांचे   पाईक   होण्याचा   दिवस इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) भगवद् गीतेत देखील श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना ज्ञानाच्या परंपरेचा दाखला दिला आहे. ते म्हणतात ‘ मी हा अव्यय ( अविनाशी ) योग सूर्याला सांगितला. सूर्याने मनुला सांगितला व मनूने  इक्ष्वाकू   सांगितला.  भारतीय परंपरेत नवीन ज्ञानतत्वाज्ञाच्या शाखांची मांडणी करताना देखील असा गुरु परंपरेचा वारसा सांगितला जातो. कारण ज्ञानाच्या परंपरेच्या संक्रमणातूनच ज्ञान वृद्धिगत होत जाते.                ज्ञान   प्रबोधिनीने   पथकाधिपती   म्हणून   समर्थ   रामदास ,  स्वामी   दयानंद ,  स्वामी   विवेकानंद   आणि   योगी   अरविंद या चार व्यक्तींचा स्वीकार केला आहे.   त्यापैकी एक म्हणजे समर्थ रामदास! कवि   वामन   पंडितांनी   समर्थांची ...

Vande Guru Parampara

  Vande Guru Parampara Guru Purnima – Honouring Our Gurus, Upholding the Tradition इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) In the Bhagavad Gita, while advising Arjuna, Lord Krishna gives an example of the tradition of knowledge. He says, “I imparted this indestructible Yoga to the Sun (Vivasvan), who passed it on to Manu, and Manu, in turn, passed it on to Ikshvaku.” In the Indian tradition, whenever new knowledge or philosophy is presented, the legacy of the Guru's tradition is also acknowledged—because knowledge flourishes only when its lineage is preserved and passed on. Jnana Prabodhini has accepted four great personalities—Samarth Ramdas, Swami Dayananda, Swami Vivekananda, and Yogi Arvind—as its visionaries, and pathfinders who have shaped Jnana Prabodhini ideals and direction. Today, let us learn about Samarth Ramdas. The poet Vaman Pandit praises him with the following verse. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे...

महाराष्ट्रधर्म

                                                                                       महाराष्ट्रधर्म १९९९ साली महिनाभराच्या ईशान्य भारत दौऱ्यात गुवाहाटी येथे केशवधाम कार्यालयात पूर्वांचलातील कामांचा परिचय करून घेण्यासाठी गेलो होतो. ज्यांना भेटायचे होते त्यांची वाट पाहत कार्यालयात बसलो होतो. एक आजोबा कार्यालयात डोकावले. बाहेरचे पाहुणे आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी , “ कुठून आलात ? किती दिवस प्रवास आहे ? काय काय पाहिले ?” अशी चौकशी केली. महाराष्ट्रातून आलो आहोत हे कळल्यावर त्यांनी आम्हाला विचारले , “ तुम्ही रायगडावर जाऊन आला आहात का ?” आम्ही “हो , रायगड पाहिला आहे ,” असे सांगितल्यावर त्या आजोबांनी एकदम आम्हाला साष्टांग नमस्कार केला. आम्ही गोंधळलो. “काय झाले ?” म्हणून त्यांना   विचारले. मग आमच्या शेजारी बसत फालूदा   म्...