Skip to main content

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती


                      जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.

                 प्रशिक्षणादरम्यान शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांबद्दल  आणि अनुभवांबद्दल चर्चा घेत होतो. शाळेचे वैशिष्ट्य म्हणून त्यांनी आमच्या शाळेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी नाहीत. शाळेची सफाई आणि देखभाल विद्यार्थी-अध्यापक-कार्यकर्ते मिळून करतात असे सांगीतले. विद्यार्थ्यांच्यात  शाळेबद्दल आपलेपणा वाढावा  आणि श्रम संस्कार रुजावा म्हणून हि रचना विकसित केल्याचे त्यांनी सांगीतले. चार  दिवस मी रोज सकाळी शाळा भरताना आणि सुटताना पाहत होतो ....विद्यार्थी त्यांना दिलेला नियोजित भाग साफ करत होते शिवाय शाळेची पारस बाग , बागीच्या व शाळेचे आवर स्वतःहून स्वच्छ ठेवत होते. शिबिरासाठी आलेल्या अध्यापकांच्या जेवणानंतर सफाई करता होत.

                 आपण काय करतो ?
याचा मी दोन मुद्यांवर विचार करत होतो,  पहिला आपला शालेय स्वच्छतेतील सहभाग असतो आणि शाळेत कोणत्या गोष्टी आपण नियमित जाणीवपूर्वक करतो .

               आपले काम करताना आपण अस्वच्छता करतो आहोत याचे बरेचदा आपल्याला भानच नसते , सहज पेन्सील वा पेनाने बेंचवर गणित सोडवतो वा नोंदी करतो , कागद बेंचखाली टाकतो. सहज केलेल्या कृतीतून शालेय सौदर्य ; स्वच्छता बिघडते आहे याची जाणीव आपल्याला नसते. काहींच्या हातून तर जाणीवपूर्वक मोडतोड होते .वर्गात आल्यावर सहज पंखे सुरु केले जातात पण त्याच सहजतेने ते वर्गाबाहेर जाताना बंद केले जात नाहीत. अशा सध्या सध्या गोष्टीतून शाळा किती आपली आहे हे प्रतीत होत असते.

                      अजून एक असा प्रसंग आठवतो . १९९९ साली मी , पोंक्षेसर, प्रियव्रतदादा, अजेयदादा असममधील हाफलॉंग गावातील निवासी शाळा पाहण्यासाठी गेलो होतो . आमचा मुक्काम शाळेच्या आवारातील छात्रवासात होता. आम्ही गाडीतून उतरून तिथल्या प्रमुखांना भेटण्यासाठी गेलो , त्यांचाशी बोलून आम्ही आल्याचे त्यांना सांगेपर्यंत छात्रावासातील विद्यार्थ्यानी आमचे सामान गाडीतून उतरवले होते , १५ -२० मिनिटात त्यांनी मच्छरदाणीसह निवासाची व्यवस्था  केली. रात्री विद्यार्थ्यांबरोबर जेवणासाठी पंगतीत बसलो.  भोजन चालू असताना वीज गेली , ४०-५० विद्यार्थी भोजनगृहात असून देखील आरडाओरडा झाला नाही कि कोणी किंचाळले नाही. ज्या विद्यार्थांकडे मेणबत्ती आणि पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी होती फक्त त्यांनीच जागा सोडली आणि  मेणबत्या लावल्या. रात्री आम्ही या प्रसंगाबद्दल आश्चर्य व्यक्त करत आणि आपले विद्यार्थी वीज गेल्यावर कसे वागले असते यावर चर्चा करत झोपी गेलो. सकाळी याबद्दल तिथल्या अध्यापाकांशी आणि कार्यकर्त्यांशी बोललो तेव्हा शाळेतील सर्व कामे छात्रावासातील विद्यार्थी करतात अगदी स्वच्छतेपासून .....स्वयंपाकापर्यंत असे कळले. स्वयंपाक घरात रोज सकाळ संध्याकाळ विद्यार्थी अर्धातास काम करतात . विद्यार्थ्यांच्या वयानुसार धान्य निवडणे , भाजी चिरणे ,पदार्थ चुलीवर शिजवणे अशी कामे वाटून दिली होती .शाळेच्या सर्व कामात विद्यार्थ्यांचा सहभाग होता .विद्यार्थी आणि अध्यापाकांशी याबद्दल बोललो तेव्हा असे काम करण्यातून शाळेबद्दल निर्माण झालेला आपलेपणा , शाळेतील रचना माझ्यासाठी आहेत , त्या स्वच्छ राखणे आणि नीट ठेवणे हि आमची जबाबदारी आहे असे भान त्यांच्यात  निर्माण झाल्याचे  जाणवले.

                     कामात सहभाग आणि कामातील नियमितता या दोन गोष्टी वरील शाळांतील  विद्यार्थांच्या वृत्ती घडणीत महत्वाच्या  आहेत असे जाणवले .

                        झारखंड वरून परत आल्यावर या दोन प्रसंगावर विचार करत होतो आणि संदर्भ म्हणून विनोबांचे साहित्य चाळत होतो कारण विनोबांनी शिक्षणाची व्यापक भूमिका मंडली आहे  आणि श्रम संस्कारावर बरेच प्रयोग केले आहेत.
                विद्यार्थाचे दोन गोष्टीसाठी शिक्षण व्हावे असे विनोबा म्हणतात पहिली म्हणजे विद्या आणि दुसरी व्रत. विनोबांनी यासाठी ‘ विद्यास्नातक ’ आणि ‘ व्रतस्नातक ’ हे शब्द वापरले आहेत.

                      प्रबोधिनीत आपण विद्यास्नातक होण्यासाठी विषयाध्यन करतो , प्रकल्प करतो , एखाद्या विषयाचा  अभ्यास करून प्रार्थनेच्या वेळी भाषण करतो , विद्या कशी ग्रहण करायची यासाठी स्वयं अध्ययन कौशल्ये आणि अभ्यास तंत्रे शिकतो , व्यक्तिमत्व  विकसनासाठी विविध शिबिरातून गट कार्ये शिकतो , दलावर वेगवेगळे खेळ खेळतो , राखी विक्री करतो ,दिवाळीत फराळ  विकतो , गड किल्ल्यांवर साहस सहलींना जातो अशा अनेकविध गोष्टीतून आपण विद्यास्नातक होण्यासाठीची कौशल्ये आणि पात्रता सध्या करतो.

                     व्रतस्नातक होण्यासाठी आपण काय करतो , वर्षारंभी संकल्प करतो. वैयक्तिक संकल्प करतो तसेच सामूहिक वर्गशः संकल्प करतो . वर्षान्ताला संकल्पातील  किती साध्य झाले; किती नाही, का साध्य झाले का नाही जमले याबद्दल विचार करतो . सहा वर्ष ‘ ठरवायचे आणि प्रयत्न करायचा आणि किती जमले त्याचा आढावा घ्यायचा ’  ही सवय थोडीतरी अंगी मुरते . ही कृती म्हणजे व्रतस्नातक होण्यासाठीचे शिक्षण. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी नियमबद्ध होणे म्हणजे व्रत घेणे.

आपण विद्याव्रत घेतो म्हणजे आपण ‘ विद्यास्नातक ’ आणि ‘ व्रतस्नातक ’ होण्याचे ठरवतो.

                प्रबोधिनीत विद्याव्रताच्यावेळी आपण   विदया  म्हणजे काय ? विद्या कशी मिळवायची ? प्राप्त ज्ञानाचा वापर कसा आणि कशासाठी करायचा याचे अध्यायन करण्यास सुरुवात करतो म्हणजे आपण विद्यार्थी होतो .

                         उत्तम माणूस होण्यासाठी स्वतःला ओळखणे , स्वतः मध्ये बदल घडवण्यासाठी निश्चयपूर्वक प्रयत्न करण्यास सुरुवात करणे म्हणजे आपण व्रतार्थी होणे .

 विद्यार्थी आणि व्रतार्थी होणे म्हणजे विद्याव्रती होणे. 

                    श्री श्री विदया मंदिर आणि हाफलॉंग छात्रावासातील विद्यार्थी एखादे काम उत्तम कसे करायचे हे शिकली म्हणजे विद्यार्थी होण्याचा त्यांनी प्रयत्न केला . शाळेतील कामे नियमित करणे ,  शालेय स्वच्छता आणि सौंदर्य माझी जबाबदारी आहे अशी भावना  या नियमित कृतीतून निर्माण होणे म्हणजे त्यांनी व्रतार्थी होण्याचा प्रयत्न करणे होय.

                    आपण प्रबोधिनीत शिक्षण घेत असताना  ‘ विद्यार्थी + व्रतार्थी  = विद्याव्रती ’ होण्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न केल्यास आपणास ‘ विद्यास्नातक ’आणि ‘व्रतस्नातक ’ होणे शक्य आहे. 

                    उपासना म्हणजे ‘ विद्यास्नातक ’ आणि ‘ व्रतस्नातक ’ होण्यासाठी स्वतःकडे पाहण्याचे साधन आहे. पुढील आठवड्यात चिंतनाच्या वेळी विद्यार्थी आणि व्रतार्थी म्हणून मी कसा आहे , कसे असायला हवे यावर विचार करा असे सुचवतो.

( प्रशांत दिवेकर . १८ ऑगस्ट २०१२ ,ज्ञान प्रबोधिनी , सोलापूर उपासानेनंतरचे प्रगट चिंतन )

Comments

Popular posts from this blog

Nation in Image: Symbols that Shape Nations

                                                          Symbols that Shape Nations This activity introduces students to how nations use visual symbols and personifications to express identity, unity, and political values. By examining global examples and comparing them with Abanindranath Tagore’s Bharat Mata, learners explore how imagery shapes nationalism and deepen their understanding of the Bharatiya concept of Rāṣṭra. Identify images and by using references complete the table   (Support Independent Learning, Comparison & analysis) 2.  Compare the above images with Abanindranath Tagore’s image of Bharat Mata. How does it reflect Indian values? (Analysis & synthesis) 3.  How does the practice of personifying nations—often through female figures—shape our understandin...

आ. कै. उषाताईंबद्दल .....

  आ. कै. उषाताईंबद्दल  लेखन : स्मरणिकेसाठी माझा आणि उषाताईंचा पहिला संबंध २००१ मध्ये   एका मुलाखतीच्या निमित्ताने आला. प्रबोधिनीतील कामाचे दुसरे-तिसरे वर्ष असेल ,   थोडे जास्तीचे मानधन मिळण्यासाठी   प्रज्ञा मानसमध्ये एका प्रकल्पात मी काम करावे अशा कल्पनेतून पोंक्षेसरांनी मला ती मुलाखत द्यायला सांगितली होती. गिरीशराव , उषाताई आणि एक-दोन तज्ज्ञ असे पॅनल होते. मुलाखतीनंतर काही दिवसांनी मला उषाताईंना भेटण्यास सांगण्यात आले. मग त्यांच्याबरोबर थोडी सविस्तर प्रश्नोत्तरे झाली. प्रश्नोत्तराच्या शेवटी त्यांनी सांगितले , " आता इथे काम करायचे असेल तर ट्रेक , सहली , शिबिरे यांना मनात आले की जाता येणार नाही. " त्यावेळी प्रशालेत   आणि इतर अनेक विभागांबरोबर माझे असे मजेचे उद्योग चालू होते. प्रज्ञा मानसच्या पाचव्या मजल्यावरून प्रशालेच्या तिसऱ्या मजल्यावर येईपर्यंत विचार केला आणि खाली आल्यावर पोंक्षेसरांना सांगितले निवड झाली असली तरी त्यांना नाही म्हणून कळवा. त्यानंतर उषाताईंचा संबंध आला तो थेट आठ-दहा वर्षांनी , त्यावेळी मी सोलापूर प्रबोधिनीत निवासी होतो आणि उषाताई सोलाप...

तंत्रज्ञानी नवे सहस्रक…

  तंत्रज्ञानी नवे सहस्रक … ज्ञान प्रबोधिनीत अनेक समूहगीते म्हणली जातात. त्यातील एका पद्याचे धृवपद आठवते. तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसे अध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे मानवाच्या समूह विकसनात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगीवर नियंत्रण, चाकाचा शोध, लोह खनिजाचा वापर असे या प्रवासातील महत्त्वाचे ठळक टप्पे नोंदवता येतील. या सहस्रकातील गेल्या चार शतकांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा झपाट्याने विकसित झाल्या आहेत. मानवी समाजाच्या शैक्षणिक रचनांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण हा गाभाघटक बनला आहे.   स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून   विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना   तंत्रज्ञानाच्या अभ्यास शाखांची तोंडओळख व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या ज्ञान शाखांची निवड करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्यानुभव,   टेक्निकलसारखे विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आले. आजच्या गरजा ...